शिवसंत लक्ष्मण महाराजांची अभंगगाथा
डॉ. अशोक कामत
प्राध्यापक व प्रमुख,
संत नामदेव अध्यासन व संशोधन केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
***
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात आष्टी हे छोटेसे गाव, धोतरजोड्यासाठी आणि वीरशैव संत लक्ष्मण महाराज यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे महाराजांनी पाच हजारावर मराठी भक्तिरचना करून समाजजागरणाचे थोर कार्य केले. ‘श्री लक्ष्मण गाथा’ लोकसहकार्याने मोठ्या थाटामाटात २१ मे २००१ रोजी आष्टी येथे दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत प्रकाशित झाली. या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक वीरशैव मठांचे अधिपती उपस्थित होते. वीरशैव वाङ्मयाचे वीस अभ्यासक चर्चा-संवादासाठी एकत्र आले होते. त्यांनी भाविक-उपासक-साधक-गावकरी समाजाला ‘लक्ष्मणगाथे’चे पारमार्थिक वैभव, वाङ्मयीन सौंदर्य आणि सामाजिक नीति-विशेष उलगडून दाखविले.
या प्रकाशनासाठी आष्टीचे मूळ रहिवासी आणि पुण्यातील नामवंत सुवर्णकार श्री. कृष्णकांत राजाराम अष्टेकर हे दानशूर हिंदू दत्त-विठ्ठलभक्त-उपासक आणि प्रा. डॉ. शेषनारायण देवाप्पा पसारकर हे शिवभक्त वीरशैव संशोधक-अभ्यासक एकत्र आले. त्यांनी संतसाहित्य सेवाकार्याचा एक नवा प्रेरक वस्तुपाठ सर्वांसमोर समन्वयशील दृष्टीने ठेवलेला आहे. त्या निमित्ताने ...
***
मराठी संतपरंपरा आणि वीरशैव
महाराष्ट्राच्या समन्वयशील संतपरंपरेत वीरशैव संतमंडळाचे कार्य लक्षणीय आहे. नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इत्यादी धर्मसंप्रदायांबरोबरच वीरशैव मराठी संतकवींनीही मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी चांगला हातभार लावला आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी (११३२-११६७) मूळच्या उदारमतवादी वीरशैव संप्रदायाची पुनर्बांंधणी मोठ्या उत्साहाने केली. ते स्वत: ब्राह्मण, व्युत्पन्न पंडित आणि राजदरबारीही प्रतिष्ठित. आपल्या शिवानुभव मंटपात विविध ज्ञातिसमाजांच्या स्त्री-पुरुषांना एकवटून त्यांनी देह हेच देवाचे मंदिर आणि ‘कायकवे कैलास’ अर्थात श्रमपूजा हीच ईश्वरसाधना हा सिद्धान्त मांडला. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. भक्तीचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध करीत लिहिण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष आचारातून भक्तीचे सामर्थ्य स्पष्ट केले. त्यानंतर विसाखेचरकृत ‘शडुस्छळि’ हा मराठी ग्रंथ वीरशैव-दर्शनावर प्रकाश टाकणारा दिसतो.
तुकारामांचे ज्येष्ठ समकालीन मन्मथस्वामी हे आद्य वीरशैव अभंगकार. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा लाभली. शिवलिंंग, लिंगेश्वर, बसवलिंग, महादेव, लक्ष्मण महाराज, शिवदास, गुरुदास, चन्ना, बाळाबुवा कबाडी, शंकर मृगेंद्र, शिवगुरुदास, बसवदास, भावंडीबाई अशी एक मोठी परंपराच वीरशैव मराठी रचनाकारांची आहे. या परंपरेत लक्ष्मण महाराज हे आंग्लाईच्या आरंभी विपुल, वैविध्यसंपन्न आणि मुख्यत: समन्वयशील मराठी रचना करणारे म्हणून सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात.
लक्ष्मण महाराज
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडनजिकच्या साखरखेर्डा मठाचे पलसिद्ध महाराज यांचा लक्ष्मण महाराजांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यामुळे रचनेसाठी प्रेरणा मिळाली, अशी पारंपरिकांची श्रद्धा आहे. पलसिद्धांच्या संजीवन समाधीचे वर्ष इ. स. १०५८ मानले जाते. त्यांना जगद्गुरू, परमहंस, मरुळाचार्य, भूरुद्र अशी चार विशेषणे लावली जातात. प्रत्येकासाठी काही ऐतिहासिक कारण-प्रमाणही मिळते. साखरखेडर्याच्या मठाची परंपरा किमान हजार वर्षांमागे जाते. तो मठ उज्जयिनी पीठाची एक शाखा मानला जातो. उज्जयिनीचे मूळ आचार्य ‘मरुळाराध्य’. त्यांच्या हाती पलाश दंड दाखविला जातो. लक्ष्मण महाराजांनी पलसिद्ध चरित्र लिहिले. त्यातून बसवपूर्व काळातही महाराष्ट्रात वीरशैव प्रभाव मिळू शकतात.
कृष्णाप्पा रऊळगावकर आणि बजाबाई हे लक्ष्मण महाराजांचे आईवडील. ते लिंगायत. शके १७३० मध्ये महाराज जन्मले. बालभक्त होते. अंगाला रक्षा फासून दगडधोंड्यांची पानाफुलांनी पूजा करण्याचा खेळ खेळत. शाळाशिक्षणाकडे लक्ष नसे. ‘ओम् नम: शिवाय’ जप सतत करीत. काही काळ घरचा दुकानदारी व्यापार सांभाळला. विवाह केला. मग विरक्त होऊन साखरखेर्डा येथे प्राचीन श्रीपलसिद्ध मठात जाऊन आध्यात्मिक अध्ययनसाधनेत निमग्न झाले. गुरुकृपेमुळे कवी झाले. नंतर तीर्थयात्रा करून उदंड अनुभव संपादन केला. ओवीबद्ध सिद्धेश्वर चरित्र-- पलसिद्धचरित्राची-- रचना केली. पुढे वडील गेले. आष्टीहून आई, पत्नी, बंधु असे परिवारजन भेटीला आले. त्यांनी सुखदु:खाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा उत्तरादाखल ‘शोक करावा कोणाचा? अवघा बाजार मायेचा। लक्ष्मणा आप्त शिव। परब्रह्म महादेव॥’ असा अभंग त्यांनी सर्वांना ऐकविला. त्यांची ती विरक्त दशा सर्वांनाच बोध देणारी ठरली. सार्यांनी आष्टीला येण्याचा आग्रह केला. लक्ष्मण महाराज शके १८०० भाद्रपद वद्य दशमी समाधीतिथी पर्यंत आष्टीस राहिले.
काव्यसंपदा
अभंग, पदे, कथात्मक रचना, भूपाळ्या, लोककाव्य मिळून त्यांची ४२५६ अभंगरचना मिळते. १२५३ ओव्या आहेत. १०८ हिंदी पदे मिळतात. या हिंदी कवितेवर अर्थात्च मराठवाडी दक्षिणी हिंदीचा प्रभाव आढळतो. हिंदु-मुसलमानांचे ऐक्य साधणारी ही रचना आहे.
लक्ष्मण महाराजांच्या या प्रासादिक अभंगकाव्यात आपल्या वीरशैव धर्मसंप्रदायाच्या वैशिष्ट्यांचे जतन त्यांनी केले. पण इतर मतांविषयी, अन्य उपासकांच्या आराध्याविषयी देखील उत्कट शब्दांत आदरभाव व्यक्त केला आहे. परस्परांच्या मतांतील आणि पर्यायाने अनेकत्वातील एकत्वाचा बोध घडविणे हे संतकर्तव्य त्यांनी दृष्टीपुढे ठेवले. त्यांनी वारकरी संतांचे काव्य आणि वारकरी आचारविचार अभ्यासला. त्यातील काळानुरूप वैशिष्ट्ये स्वीकारली. अन्य प्रदेशांतील पंथसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वीरशैव आणि वारकरी अथवा अन्य पंथांतील सौहार्द लक्षणीय ठरले ते लक्ष्मण महाराजांसारख्या आणि एकनाथ महाराजांसारख्यांच्या समतोल दृष्टीमुळे! म्हणूनच असे म्हटले गेले:--
जगी झाले होतील अनंत। पंत महंत बुद्धिमंत। परि लक्ष्मणाऐसा संत। विरळाचि असे॥
गाथेची व्याप्ती
‘श्री लक्ष्मण गाथे’चे संपादक डॉ. शे. दे. पसारकर यांनी आपले संपादन-कार्य अतिशय नेटकेपणाने केले आहे. अभ्यासपूर्ण आणि साक्षेपी प्रस्तावना हे या संपादनाचे ठळक वैशिष्ट्य होय. मंगलाचरण, सद्गुरू, शिव, आत्मनिवेदन, उपदेश, गंगामाहात्म्य, स्तुतिपर अभंग, कथात्मक, स्फुट, ओवीबद्ध सिद्धेश्वर माहात्म्य आणि सिद्ध-गुरू-परमेश्वर इत्यादी स्तोत्रे अशी अभंगांची पद्धतशीर विभागणी केलेली आहे. एकूण अभंगांचे क्रमांक सलग असून अखेरीस सर्व अभंगांची प्रथमचरणसूत्री शास्त्रीय पद्धतीने करून ती जोडलेली आहे. त्यामुळे गाथेतील कोणताही अभंग पटकन मिळू शकतो.
भवानी, अंबामाता, रुद्र, विश्वनाथ, शिवशंकर, भीमाशंकर, सिद्धेश्वर, खंडेश्वर, नगरेश्वर, घृष्णेश्वर, दत्तात्रेय, वीरभद्र, व्यंकटेश, मल्हारी, हनुमंत, नरसिंह अशा विविध देवदेवतांच्या शंभरावर आरत्या इथे आहेत. त्यात शंभुमहादेवाच्या अधिक आहेत. संतसज्जनांच्या आहेत. शैव आणि वैष्णव अशा दोहोंना प्रिय असणार्या देवदैवतांच्या आहेत.
आरत्याखेरीज भूपाळ्या, अष्टके, आर्या, ज्योतिर्लिंगविषयक पदे, कथात्मक पदे आणि कापडी-बाळसंतोष-पिंगळा-वासुदेव- जोगवा-गोंधळ अशी लोककाव्यात्मक स्फुट अभंगरचना गाथेत (३३११--४१६०) सुमारे साडेआठशे आहे.
शिवमहिमा, शिवपाठ, शिवगण, शिवयोगी इत्यादी शिववर्णन व प्रशंसापर अभंग (अ. २५२-७३५) पावणेपाचशेच्या घरात आहेत. कथात्मक अभंग, स्फुट रचना, स्तुतिपर अभंग, इत्यादीत शिवविषयक अभंग येतात. उपदेशपर रचनेतही शिवभक्ती दिसते.
आत्मनिवेदनपर रचनेत ईश्वरदर्शनाची उत्कंठा, करुणा, सलगी, प्रेमकलह, प्रेमनिष्ठा, शिवजीवैक्य, अद्वैत (अ. ७३६-१३०५) असे सुमारे पावणेपाचशे अभंग आहेत.
म. बसवेश्वर-वंदना
महात्मा बसवेश्वरांनी वीरशैव पंथाची पायाभरणी केली असे एक मत आहे, तर पंचाचार्यांनी ती फार पूर्वीच केली आणि मूळच्या उदारमतवादी संप्रदायाची पुन्हा एकदा कालानुरूप उभारणी करण्याचे ऐतिहासिक कार्य बसवेश्वरांनी केले, असे दुसरे एक संतुलित मत आहे.
बसेवश्वर मंगळवेढ्यात वावरले. त्यांची कर्मभूमी पंढरीनजिक राहिली. त्यांचा काळ आणि कार्य ध्यानी घेता त्यांचा प्रभाव महानुभावपंथीय चक्रधरस्वामी आणि नाथपंथीय योगीराज ज्ञानदेव यांचेवर पडला असे मानण्यास अडचण असू नये. पण बसवेश्वरांना समकालीन राजदरबारी स्वकीयांनी, कर्मठ-धर्मठांनी विरोध केला. पुढेही त्यांची उपेक्षा झाली. मराठी परंपरेत साधा बसवेश्वरनिर्देशही कुठे दिसून येत नाही. मराठी वीरशैव संतवाङ्मय मन्मथोत्तरकालीन आढळते. त्यातही बसवेश्वरांचा उल्लेख ओझरता येतो. लक्ष्मण महाराजांनी पूर्वसंतांचे स्तुतिपर वर्णन केलेले आहे. त्यात सिद्धपुरुष म्हणून आचार्य रेवणसिद्ध (अ. २४३६-२४४६), आचार्य पंडिताराध्य (अ. २४४७-२४५७), आपले परमगुरू पलसिद्ध (अ. २४८०, ९८ चरण), अल्लमप्रभू (अ. २४८१-२४९१) या थोर वंदनीय शैव वीरांची प्रशंसा त्यांनी गायिलेली आहे. पुढे बसवेश्वरविषयक अभंग क्र. २४९२ ते २५३८ असे तब्बल सेहेचाळीस आहेत.
‘बसव’ अक्षर जपाने पापसंहार होतो, कारण ‘बकार’ हा शब्द बद्धउद्धारक तर ‘सकार अंतरी कार्य साधे’ असे आहे. ‘बकार’ शब्दात वासनेचे मूळ मिळते. त्यामुळे बसव-जप ‘मायापापविमोचक, कार्यसिद्धीदायक’ असा आहे. (अ. २४९२)
शिवयोगी ध्याती बसवलिंगाप्रती। मायापाश भ्रांती नुरे तेथे॥
लक्ष्मण म्हणे ब्रह्मरूप होती। बसवलिंगाप्रती शरण व्हा हो॥ (अ. २४९३)
बसवेश्वर हे शिवाचे आत्मा, अनादी प्रभुत्व आहेत, साक्षात् शिवच आहेत, ‘बसवेश्वर तोचि ईश्वर’ आहेत, ‘वीरशैवामाजी शूर। आहे शैवांचे माहेर’, ‘कृपामूर्ती आणि सिद्धांचे माहेर’ आहेत, अशी स्तुतिसुमनांजली परोपरीने उधळतात.
‘कल्याणी अवतार घेतला प्रभोने। धर्मरक्षण केले ताते।’ हे बहुधा ते ‘बसवपुराणी प्रसिद्ध हो।’ म्हणून जाणतात. ‘बसवण्णाचे भक्त सर्वदा विजयी’ किंवा ‘बसव गणांचा अधिकारी जाणा’ म्हणणारे लक्ष्मण महाराज बसवेश्वरांनी ‘अनुभवमंटपा’द्वारे समाजजागरण कसे केले, ‘कायकवे कैलास’ असे अभूतपूर्व भक्तिदर्शन प्रकट करून त्यांनी शिवशरण-शरणसिंह क्रांतिप्रयत्न कसे केले, त्याचे परिणाम काय झाले, याबद्दल काही लिहीत नाहीत. हे असे का व्हावे? उलगडा होत नाही.
असेच सोलापूरच्या श्रीसिद्धरामेश्वरांचे भक्तवर्णन (अ. २५३९-२५६२) विस्ताराने ते करतात. त्यातही ‘सोलापुरी सिद्धराम। केवळ परमात्मा निष्काम’ शिवयोगी, शिवज्ञानी - केवळ स्वानंदाची खाणी, ज्ञानाचे आगर, स्वानंदधाम, ज्ञाननिधी -- राबतात सर्व सिद्धी, योगामाजी प्रवीण अशी प्रशंसा नानाप्रकारे मिळते. पण सिद्धरामांच्या सामाजिक कार्याचे वर्णन मिळत नाही.
मन्मथस्वामीविषयक जाण
‘ब्रह्मज्ञानी मन्मथस्वामी’ हे ‘वीरशैव सिद्धपुरुष’. त्यांनी ‘सखा केला नीलकंठ’. ‘शुद्ध बुद्ध नित्य मुक्त’ राहून ‘निवांत मन्मथस्वामींनी ‘पावन करितो दीनाला।’ असा ‘भक्तिपंथ स्थापिला’ (अ. २५८० ते २५९०) इत्यादी लक्ष्मण महाराजांनी केलेले अनेक उल्लेख त्यांची वीरशैव सांप्रदायिक अचूक जाण आणि निष्ठाही व्यक्त करतात.
कर्नाटक-महाराष्ट्रातील परिस्थितीत असणारे अंतर आणि एकूण मराठी समाजाचे प्रश्न ध्यानी घेऊन मन्मथस्वामींनी स्वधर्मबांधवांना ‘निजू नका जागा जागा। आपुल्या स्वधर्माने जागा।’ असे निक्षून सांगून ‘सोडोनि शिवातें दुजियाते ध्याती। त्यांचे तोंडी माती जन्मोजन्मी।’ असा खणखणीत इशारा दिला. त्यांनी कन्नड वचनपरंपरा न स्वीकारता वारकरी पंथीयांप्रमाणे ओवी-अभंगांतून शिवभक्तीची अभिव्यक्ती केली. कीर्तनपरंपरा जोपासली. भजनीमंडळे उभी केली. हरिपाठाप्रमाणे ‘शिवपाठ’ तयार केले. एक प्रकारे इथल्या मराठी मातीशी विशेष अनुबंध राखून आपली शिवसाधनाही केली. मायमराठीची जपणूकही केली. तुकारामोत्तर काळातील मराठी अभंगरचना वारकरी कीर्तनात नाकारली गेल्यामुळे जी मराठीची हानी झाली, ती काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न वीरशैव मराठी संतांनी केला. त्यात समतोल, समन्वयशील काव्यरचना करणार्या लक्ष्मण महाराजांचे योगदान फार महत्त्वाचे ठरते.
समन्वयशील वृत्ती हवी
लक्ष्मण महाराज मूळचे शिवभक्त. त्यांची गुरुपरंपरा शिवोपासकांची. ज्या मठमंदिरात त्यांची जडणघडण झाली आणि ज्या ज्ञातिसमाजाने त्यांना आधार आणि आदर दिला, तोदेखील कट्टर शिवपूजक. पण महाराज सहजपणे राम, कृष्ण आणि विठ्ठलविषयक रचना करतात. ‘शिव तोचि राम जाणा। राम तोचि शिव माना॥’ अशी अभेददृष्टी व्यक्त करतात. त्यांची गाथा अनुभवसिद्ध आहे. सर्वसामान्य मुमुक्षू साधकापासून सिद्ध पुरुषापर्यंत सार्यांचे आध्यात्मिक मनोरथ पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न दिसतो. तो उदार विचारसरणीमुळे आणि सुबोध प्रासादिक भाषेमुळे अधिक प्रभावी वाटतो.
‘काय भुललासी मतिमंदा। शरण जाय त्या गोविंदा।’ असे सांगत ते इशारा देतात. ‘द्रव्य जोडिले कोट्यानुकोटी। हाती न ये बा लंगोटी॥’ आप्तसोयरे सांगाती कायम येत नाहीत. म्हणून ‘लक्ष्मीकांत सखा करी’ असा सल्ला त्यांनी दिला आहे. ‘लक्ष्मण म्हणे व्हा सावध। ग्रंथ पाहा दासबोध।’ अशा स्वच्छ शब्दात ते व्यावहारिक ज्ञानकोश म्हणून प्रसिद्ध असणारा रामदासांचा ग्रंथराज वाचण्यासाठी आवाहन करतात. त्यांच्या एकूण रचनेवर रामदासी वक्तृत्वशैली, विशिष्ट शब्दांची आवृत्ती करून विषयविस्तार करीत प्रभावी रीतीने मांडण्याची पद्धती यांचा प्रभाव आढळून येतो.
शब्दज्ञानाने नाश
संतभक्तांनी नेहमीच जीवनानुभवाला महत्त्व दिले. ते विश्वाचा विचार करतात. सृष्टीचे मननचिंतन करतात. अनुभूतीला प्राधान्य देतात. त्यांनी शब्दपांडित्याकडे दुर्लक्ष केले. केवळ घटपटाचे तर्कट करीत विचार मांडणारे तर्कपंडित आणि राजदरबारी मानाने मिरविणारे पंडित त्यांना कधीच महत्त्वाचे वाटले नाहीत. संत लोकदरबारात राहिले. तर्कापेक्षा प्रेमाची वाणी त्यांनी स्वीकारली. लोकांच्या सुखदु:खात सहभागी होऊन लोकभाषेतून ती व्यक्त करणे आणि आत्मज्ञानाबरोबर त्यांना स्नेहमैत्रीने आत्मभान घडविणे हे त्यांनी लोककार्य म्हणून आनंदाने स्वीकारले. किंबहुना त्यासाठीच ते काही काळ लोकांतात राहिले. एरव्ही ते नित्य निजानंदात मग्न होते. लक्ष्मण महाराजांची ही उक्ती या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे:--
शब्दज्ञानियाते काय लाभ झाला। भांडताचि गेला जन्म व्यर्थ॥
वृषभाचे पाठी शर्करेची गोणी। वाहताचि कष्टी झाला पशू॥
आपल्या पोळीवर तूपसाखर घेणारे श्रीमंत अनेक असतात. त्यांना लौकिक सुखे काही काळ मिळत जातात. सर्वसामान्य माणसे भक्तिज्ञानाअभावी पशूप्रमाणे सार्या सुखानंदाला पारखी होतात. जे ज्ञानसंपन्न भक्तसाधक असतात, ते मात्र निरंतर निजानंदाचा सोहळा अनुभवतात. म्हणून महाराज याच अभंगात पुढे म्हणतात:--
श्रीमंत लोक भक्षिती शर्करा। पशुप्रती चारा तृण प्राप्त॥
अन्नाचे पर्वत नेत्राने पाहिले। तरी काय धाले पोट त्याचे॥
लक्ष्मण म्हणे अर्थ घेती भक्त। निजानंदे तृप्त निरंतर॥ (अ. १६४४)
अशा रीतीने लोकसमाजाच्या व्यवहाराचे अर्थपूर्ण निरीक्षण करीत त्यातून विशुद्ध वर्तन-व्यवहारासाठी चपखल उदाहरणे घेऊन लक्ष्मण महाराजांनी प्रभावी रीतीने आपली वाणी उच्चारली. लोकप्रबोधन घडविले.
मनोबोधाचे अभंग
समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’ अथवा मनोबोधाच्या धर्तीवर काही रचना गाथ्यात मिळते. ती अतिशय सुबोध, प्रासादिक आणि आशयघन आहे. उदा.:--
मना तुचि अनिवार। तुझा मारा आहे थोर।
मना तुम्ही मोठे ठकविले। महाज्ञाते भ्रष्टविले॥
मनाचा अनावरपणा असा साध्या शब्दांत सांगून मानवी जीवनावर मनाचाच ‘मारा’ वा बळजबरी कशी होत असते आणि मोठमोठे ज्ञानी मनाच्या कमकुवतपणामुळे पथभ्रष्ट कसे झाले, अनेक थोर आणि मान्यवर त्यांच्या मनाकडूनच ठकविले-फसविले गेले, हे सांगून पुढे ते ‘मनोदेवा’लाच विनम्र होऊन प्रणिपातपूर्वक अशी प्रार्थना करतात:--
मना तुम्हा नमस्कार। मी अनाथ हो किंकर।
स्वस्थ्य रहा तुम्ही मना । नका छेडू लक्ष्मणा॥ (अ. १७०४)
लक्ष्मण महाराजांचे फारसे शिक्षण झालेले नव्हते. पण भरपूर वाचन मात्र त्यांनी केले होते. त्यांची मराठी भाषा सुगम, सुबोध आणि सबोधही आहे.
उपदेशपर रचनेद्वारे त्यांनी सामान्य साधक, साधारण माणूस यांचेबरोबर साधु, योगी, ज्ञानी, संत इत्यादीचे आचार-व्यवहार कसे असायला हवेत याचा बोध घडविला आहे.
स्वधर्माचे प्रयोजन
ज्ञानदेवांनी आपल्या ‘भावार्थदीपिके’त स्वधर्माची उकल अतिशय चांगल्या रीतीने केली होती. त्यांना ‘स्वधर्मा’तून प्रत्येकाचे कार्यकर्तव्य सांगायचे होते. लक्ष्मण महाराजापुढे हा भाव आहेच. याशिवाय काळचक्रामुळे जो परधर्मीय सांस्कृतिक आघात स्वदेश, स्वभाषा आणि स्वबांधव यांवर झाला त्याचा प्रतिकारही त्यांना करावयाचा आहे. ते म्हणतात:--
स्वधर्म लोपी तो जाणावा चांडाळ। स्वधर्माचे बळ सर्वाप्रती॥
ब्रह्मा विष्णू रुद्र वेदसिद्ध मुनी। म्हणती स्वधर्माने चालावे हो॥
इथे ब्रह्मा-विष्णु-महेशाचे ऐक्य तर सांगितले आहेच, पण त्याबरोबर वेदसिद्ध ऋषिमुनींचाही उल्लेख आहे. इथे सांगितलेला धर्म कोणताही विवक्षित धर्म वाटत नाही. तो सीमित मर्यादित नाही. तो सनातन भारतीय आहे, जो ईश्वरतत्त्वाला प्राधान्य देतो. महाराज पुढे लिहितात:--
अवतार होती धर्म हो स्थापिती। परधर्मी गती कैसी होय॥
ज्याचा त्यासी धर्म अनादि चालला। परधर्म घाला मोठा आहे॥
आमच्या देशात वेळोवेळी देवांनी आणि नरनारायणांनी अवतार घेऊन विशुद्ध धर्माचे रक्षण केले आणि कालानुरूप त्याची पुन:स्थापना केली. परधर्माचे आक्रमण झाले तरी हे ब्रीद राखले गेले. परधर्माचा आलेला नवा ‘घाला’ अर्थात् घाव मोठा आहे. त्याच्यावर मात करून स्वधर्मरक्षणासाठी लक्ष्मण महाराज म्हणतात:--
लक्ष्मण म्हणे स्वधर्म आपुला। रक्षी तो देवाला फार प्रिय॥
असे आगळेवेगळे धर्मरक्षण त्या इंग्रजी आमदानी अवतरण्याच्या काळात लक्ष्मण महाराजांनी केले. त्यामागे स्वदेश, स्वभाषा, स्वसमाज आणि स्वसंस्कृतीवरील अनन्य निष्ठा आहे. मूर्तिभंजक आणि अतिरेकी, अत्याचारी, परधर्मीय आक्रमकतेविरुद्ध सौम्य प्रतिकारही आहे.
हरिहर एक, भेद नाही
संत नामदेवरायांनी म्हटले होते. ‘शिव तोचि विष्णू, विष्णू तोचि शिव’, ‘हरिहरा भेद नाही’, हरिहर आले खेवा’ अर्थात् शिव आणि विष्णू एकेठायी नांदत असतात. ‘जय जय रामकृष्ण हरि’ असाच वारकरी बीजमंत्र आहे. सगुण-निर्गुण नामरूपाचे ऐक्य ही भक्तीची विशुद्ध बैठक मराठी संतांनी विशद केली. लक्ष्मण महाराज हीच ‘बैसका’ ठेवून म्हणतात:-
शिवाते निंदिती विष्णूते पूजिती। भेद ती हो भक्ती, आम्हा दिसे॥
हरिहर एक, भेद तिथे नाही। द्वैताचे नाही काम येथे॥
विष्णू-शिवाचे, हरि-हराचे अद्वैतच आहे. जे हे जाणीत नाहीत ते ‘भेदभक्ती’ करतात, भक्तीच्या नावावर संघर्ष उत्पन्न करतात. भक्ती हीच मुळात अभेद सांगते. अद्वैताचा पुरस्कार करते. महाराज पुढे सांगतात:--
ब्रह्माण्ड व्यापार चालावा म्हणून। त्रयमूर्ती आपण झाले देव॥
ब्रह्मा विष्णु रुद्र त्रिमूर्ती सगुण। करिती रक्षण नाना युवती॥
लक्ष्मण म्हणे भेदाते ग्रासून। करावे भजन एकचि ते॥
लक्ष्मण महाराजांनी अशा अनेक अभंगांतून अनाग्रही, अभेद भक्तीचे प्रतिपादन केले. भजनांतून जर अशी समन्वित अनुभूती लाभली तर आनंदाला सीमा राहात नाही. महाराजांच्या अशा उपदेशांनीच भक्तिसाधनेच्या क्षेत्रात सामंजस्य वाढले. वारकरी--वीरशैव मोठ्या संतोषाने एकत्र नांदत राहिले.
समारोप
लक्ष्मण महाराजांसारख्या साधक-सत्पुरुषालाही ‘पंढरीचा प्रेमा’ वाटला. ‘भवनाशनी पंढरी। पाहू चला हो झडकरी॥ पूर्णब्रह्म तो श्रीहरी। भीमातटीं शोभतसे॥’ (अ. २६६९) ही त्यांची पांडुरंगाविषयींची ओढ अन्य वीरशैवांनाही पुढे वाटत राहिली. ही त्यांच्या समन्वयदृष्टीची सार्थकता म्हणावी लागते. गाथेचे संपादक डॉ. शे. दे. पसारकर यांचा हा अभिप्राय या संदर्भात फार बोलका ठरतो:--
‘‘आपापल्या संप्रदाय-वैशिष्ट्यांचे जतन दोन्ही संप्रदायांनी केले, परंतु ते करताना कटुता किंवा असहिष्णुता त्यांनी निर्माण होऊ दिली नाही. परस्परांच्या मतांचा आदर करीत, अनेकत्वातील एकत्व जाणून घेत दोन्ही संप्रदायांची वाटचाल सुरू होती. दक्षिणेतील धर्मसंगराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वीरशैव आणि वारकरी संप्रदायातील सौहार्द लक्षणीय आहे.’’
हे अद्भुत सांस्कृतिक सौहार्द सांगणारी श्रीलक्ष्मण महाराजाची गाथा सुसंपादित स्वरूपात समाजापुढे ठेवल्याबद्दल डॉ. शे. दे. पसारकर यांचे अभिनंदन करायला हवे.
***
Sir मला लक्ष्मण गाथा कुठून विकत मिळेल ...
ReplyDeleteकृपया मला सांगा