ज्ञानदेवांचे अनोखे भावविश्व
वेलु गेला गगनावेरी
‘वेलु गेला गगनावेरी’ ही कादंबरी हातात पडली. पहिलं पान वाचायला सुरुवात केली.
...तांबडं फुटलं. पूर्वेच्या गालावर गुलाब फुलून आले...
आणि सारा आसमंत गुलाबाचा मधुर गंध उधळतोय आणि नजर पोहोचेल तिथपर्यंत चोहोकडे गुलाबाचे लांबच लांब सर्वदूर पसरलेले ताटवे नजरेस पडले. इथेच डॉॅ. शे. दे. पसारकरांच्या दैवी लेखनाचा संजीवक स्पर्श मनास झाला.
ज्ञानदेवाचा छोटा पण अद्भुत, थक्क करणारा जीवनप्रवास असाच गुलाबासारखा. माहिती आहे की मोहक रंग आणि मधुर सुगंध असलेल्या गुलाबाला प्रखरतेने बोचणारे काटेही आहेत. आणि ज्ञानदेवांच्या जीवनातील काटेरी प्रसंग कादंबरीत वाचताना जीवाला बोचणी लावतात हेही तेवढेच खरे.
डॉॅ. पसारकरांनी सुरुवातीला आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, प्रसंगनिर्मितीसाठी आणि व्यक्तिचित्रणासाठी थोडेफार रचनास्वातंत्र्य घेतले आहे. पण वाचताना जाणवते की ही रचना करतानाची त्यांची अभिव्यक्ती संपूर्णतया ज्ञानदेवमय झालेली आहे. प्रत्येक प्रसंग आपण वाचक म्हणून तिर्हाईतासारखे वाचूच शकत नाही. संपूर्ण प्रसंग अगदी एकरूप होऊन, ते पात्र म्हणून त्या अनुभवविश्वात न्हाऊन येतो. इतका प्रसंगाचा जिवंतपणा ‘वेलु’मध्ये जाणवतो.
संन्यासातून परतलेले विठ्ठलपंत म्हणजे सार्या ब्रह्मवृंदाच्या नजरेत पापी आणि धर्मबुडवे. अशा पाप्याला जगण्याचा अधिकार असावा असा आधार कुठल्याही शास्त्रात नाही. आहे ती शिक्षा, म्हणजे केवळ देहान्त प्रायश्चित्त. हे रुक्मिणीला सांगताना असहाय, हतबल विठ्ठलपंत, गाढ निद्रेत असलेल्या मुक्तेच्या चेहर्यावरचं गोड हसू बघताना हृदयात कालवाकालव होणारी माता आणि सारे मायापाश तोडून, पाखरांना वार्यावर सोडून इंद्रायणीच्या गर्भात गुडुप होण्यासाठी निघालेले हे हतबल मायबाप... हे प्रसंग वाचताना डोळ्यांत आलेल्या आसवांमध्ये धूसर अक्षरे तरंगायला लागतात. हेच डॉॅ. पसारकरांच्या संवेदनशील लेखणीचं सामर्थ्य आहे.
निवृत्तीचा ‘निवृत्तिनाथ’ झाल्यावर त्याने ज्ञानदेवांना दिलेलं ब्रह्मज्ञान. ते वाचताना वाटते की हे केवळ वर्णन नाही, कुठेतरी या सार्या प्रसंगाचा लेखकाला साक्षात्कार झाला की काय! ज्ञानदेवांचं ‘अनुभवामृत’ पुढिलांसाठी ‘अमृतानुभव’ ठरणार होतं. यानुसारच म्हणावंसं वाटतं की डॉॅ. पसारकरांच्या लेखणीच्या अनुभवातून अवीट गोडीचा अमृत-अनुभव वाचकांना चाखायला मिळतो या ‘वेलु’तून.
कादंबरीमध्ये प्रसंगविस्तारानुसार निसर्गातले बदलते रंग, तशीच अनेक वर्णने अप्रतिम आहेत. मानवी मनाचे अनेक कंगोरे अनुभवता येतात. मनाचा गाढ संयम, विदीर्ण होणारं हृदय, अगतिकता तर मनावर सांत्वनाची घातलेली फुंकर.. यातून डॉ० पसारकरांची संवेदनशीलता जाणवते. ज्ञानदेवांना ‘माऊली’ म्हटले आहे. लिहिताना डॉ. पसारकर माऊलीमय झालेले अनुभवता येते. एखाद्या स्त्रीलाच जाणवावी अशी शब्दातीत उत्कटता, भावनिक ओलावा लेखनात दिसून येतो. ओथंबलेलं मातृत्व कधी मुक्ताच्या तर कधी ज्ञानदेवांच्या वाणीतून डॉ० पसारकरांनी ओतलेलं आहे. कधी कधी वाचताना
भावनांची वादळे सुटली अचानक
छेडताना तारही तुटली अचानक
असा अनुभव येतो.
समाजाकडून भावंडांचा होणारा छळ, मुक्ता परळ आणण्यास गेलेली, ज्ञानदेव भिक्षेला गेल्यावर होणारी उपेक्षा असो, सारेच रसाळ लेखन. एवढा त्रास झेलूनही दिसणारा संयमाचा परिपाक लेखकाने कुठलाही कृत्रिम आव न आणता अगदी वास्तवाला धरून मांडलेला आहे. हे खरोखरच प्रशंसनीय आहे. हे सारं सोसणं वाचताना मनाचा मूक आकांत वाचकांना अनुभवता येतो, इतका जिवंतपणा डॉ. पसारकरांच्या लेखणीत जाणवतो. विठ्ठलाच्या भेटीला निघालेले ज्ञानदेव विठ्ठलरूप झालेले.
दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले।
बापरखुमादेविवरे विठ्ठले मज ऐसे केले॥
मनातलं विरहार्त वादळ अनुभवत ज्ञानदेव चालत होते. हे वाचताना आषाढी वारीतल्या त्या भाबड्या वारकर्यांमध्ये खरंच ज्ञानदेव चालतात असा विश्वास वाटायला लागला.
ज्ञानदेवांची उद्या संजीवन समाधी, दोन गुडघ्यांत आपला चेहरा दडवून मुक्ता रडत असते. सोपान आणि निवृत्ती दोघेही निश्चल. तिची समजूत तरी कुणी काढायची? सार्यांचीच मनं पोकळ. हे वाचताना खरंच ते पोकळ मन अनुभवायला येतं. मन सुन्न होतं. यावेळचं वर्णन वाचताना वाटतं की आता बंद करावं वाचणं आणि आपणही मोकळं व्हावं बरसून. तरीही ते बंद करवत नाही. हे यश कादंबरीच्या लेखनाचं आणि लेखकाचं.
ज्ञानदेवांनी समाधी घेतली. मुक्ताचा आक्रोश. ‘ज्ञानदादा, कधी भेटशील रे? तीनच पानं कशी मांडू? तुला कुठं पाहू?... हे सारं वाचताना शरीर अश्रुमय होतं. आपण भावविवश होऊन कादंबरी मिटतो. शब्दालंकारांनी नटलेली, वास्तवाने भारावलेली, भावविवश प्रसंगांनी भरलेली ही कादंबरी बाह्यत: मिटली तरी मनात संवेदनशीलतेला पूर येतो. सतत तिचंच चिंतन सुरू होतं. आणखी काय लिहू? शब्द जडावले हृदयाप्रमाणे आणि लेखनाचे सामर्थ्य वर्णन करताना ते थिटे पडताहेत. इतकं सामर्थ्यशाली लेखन डॉ. पसारकरांनी यात केलंय.
खरंच ज्ञानाचा, भावनेचा, भक्तीचा, प्रेमाचा वेलु गेला गगनावेरी. पुन:पुन्हा वाचावी, संग्रही ठेवावी आणि ज्ञानदेवांचे भावविश्व सुरेख चितारणार्या डॉ. पसारकरांचे आभार मानावे. पुन्हा वाचताना देखील ‘वेलु’ तेवढीच टवटवीत! लेखनाला शुभेच्छा!
वेलु गेला गगनावेरी
शे. दे. पसारकर
सुविद्या प्रकाशन,
शे. दे. पसारकर
सुविद्या प्रकाशन,
३७४, उत्तर कसबा, सोलापूर ४१३००७
स्थिरभाष ०२१७ - २७२२५१०
***
स्थिरभाष ०२१७ - २७२२५१०
***
No comments:
Post a Comment