(विभूतिवैभव, अंक १०१)
श्री १००८ जगद्गुरू
डॉ० चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
वेदान्ताचार्य, पीएच्०डी०, डी०लिट्०
अंगषट्स्थलांतर्गत माहेश्वरस्थल
अष्टमूर्तिनिरसनस्थल
जिज्ञासू सद्भक्तांनो,
दर्शनशास्त्रात भगवत्तत्त्व सर्वत्र दाखविण्याची एक परंपरा आहे. भगवत्तत्त्व अन्यत्र नसून एकाच ठिकाणी आहे असे सांगणारीही दुसरी परंपरा आहे. भगवत्तत्त्व सर्वत्र आहे ही परंपरा माहेश्वरस्थलातील साधकाला विरोधी ठरते. म्हणून येथे तिचे निरसन केले आहे. भारतीय दर्शनशास्त्रात पृथ्वीपासून आत्म्यापर्यंत ईश्वराच्या आठ मूर्ती मानल्या जातात.
पृथिव्याद्यष्टमूर्तित्वमीश्वरस्य प्रकीर्तितम्।_
तदधिष्ठातृभावेन न साक्षादेकभावत:॥
(श्रीसिद्धान्तशिखामणी, १०.४९)
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते; सूर्य, चंद्र आणि आत्मा या ईश्वराच्या अष्टमूर्ती होत. अर्थात् या ईश्वराच्या आठ आकृती आहेत. आपल्या देशात जडाची पूजा होते आणि चैतन्याचीही पूजा होते. जड व चेतन यांत ईश्वरत्व समान आहे हे दाखवण्यासाठी जडाची पूजा सांगितली आहे. ज्योतिर्लिंगे बारा आहेत. त्याप्रमाणे पंचमहाभूते ही पंचलिंगे मानली जातात. दक्षिण भारतात ही पाच भौतिक लिंगे प्रसिद्ध आहेत.
पृथ्वी, जल इत्यादींना ईश्वर मानणारी परंपरा का आहे? अत्यंत सूक्ष्म तत्त्व स्थूल दृष्टीच्या मनुष्याला समजावून सांगणे कठीण असते. जे आपल्या दृष्टीला दिसते त्यामध्ये प्रथम भगवत्तत्त्वाचे प्रतिपादन केले पाहिजे. जे स्थूल दृष्टीला दिसत नाही आणि ज्याचा साक्षात्कार होणे अवघड आहे त्यामध्ये भगवत्तत्त्व दाखवल्यावर लोकांना पटत नाही. पंचमहाभूते ही अनुभवगोचर आहेत. पृथ्वीवर आपण राहतो, जलामुळे आपले जीवन आहे, अग्नीमुळे आपण जिवंत आहोत, वायूमुळे आपण श्वसन करतो, आकाशात आपला निवास आहे, सूर्य, चंद्र आपल्याला प्रकाशमान करतात आणि आत्म्यामुळे सारे व्यवहार घडतात. स्थूलातील स्थूलात ईश्वर आहे असे सांगण्याची परंपरा यामुळे निर्माण झाली.
वर्षप्रतिपदेला चंद्राची कोर पाहिली तर ती जशी वृद्धिंगत होत जाते तसे आपले आयुष्य, विद्या, धन वृद्धिंगत होत जाते, असा एक समज आहे. ही प्रतिपदेची कोर अत्यंत सूक्ष्म, एखाद्या रेषेसारखी असते. ती दुसर्याला दाखवताना एखाद्या झाडाच्या फांदीसमोर ‘तिच्या आसपास पाहा’ असे सांगून दाखवावी लागते. यालाच ‘शाखाचंद्रन्याय’ म्हणतात. सूक्ष्म वस्तू दाखवण्यासाठी प्रथम स्थूल वस्तू दाखवावी लागते. त्याचप्रमाणे सर्वव्यापक चैतन्याला दाखवण्यासाठी प्रारंभिक अवस्थेत ‘पृथ्वीच ईश्वर आहे’ असे सांगावे लागते. म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. सकाळी अंगणात सडा घालून त्यावर रांगोळी घालतात. ही पृथ्वीचीच पूजा होय. सकाळी उठल्यानंतर बिछान्यावरून खाली जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीला नमस्कार करण्याची एक परंपरा आहे:-
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादाघातं सहस्व मे।
पृथ्वी ही विष्णूची पत्नी आहे. तुला मी नमस्कार करतो, कारण आता दिवसभर तुझ्या अंगावर पाय ठेवून वावरायचे आहे, मला क्षमा कर. पृथ्वीत ‘क्षमा’ हा गुण आहे. म्हणून तिला ‘क्षमया धरित्री’ असे म्हणतात. ती सारे काही सहन करते. पृथ्वीला भगवत्तत्त्व मानून तिची पूजा केली जाते. गंगादी नद्यांची अर्थात् जलाची पूजा करतात. स्वयंपाक करण्याआधी चुलीची पूजा करण्याची पद्धती होती. त्यानंतर अग्निपूजा करून स्वयंपाक केला जात असे. अगरबत्ती इत्यादी सुगंधी द्रव्ये जाळून वायूची पूजा करतात आणि मौन धारण करणे हीच आकाशाची पूजा होय. शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून त्याला विश्रांती देण्यासाठी मौन धारण केले जाते. सूर्यचंद्रांची पूजा तर नित्य होत असते. आत्म्याची पूजाही आपण शरीरपोषण करून एकप्रकारे करीत असतो.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य व आत्मा ही परमेश्वराची रूपेच आहेत. परंपरेने त्यांची पूजादेखील केली जाते. परंतु माहेश्वरस्थलातील साधकासाठी या अष्टमूर्तीच्या पूजेचा निषेध केलेला आहे. जर अष्टमूर्तीची पूजा त्याने केली तर त्याच्या लिंगनिष्ठेला बाधा येऊन त्याचे मन विचलित होण्याची शक्यता आहे. आठ ठिकाणी केली जाणारी पूजा जर मनोभावाने एकाच ठिकाणी केली तर पूजेचे फल लवकर मिळते. म्हणून माहेश्वरासाठी आचार्य सांगतात की, पृथ्वी आदी अष्टमूर्ती म्हणजे साक्षात् शिव नव्हे तर ठिकाणी शिव अधिष्ठातृभावाने वास्तव्य करतो. पृथ्वी ईश्वर नव्हे, तर पृथ्वीत ईश्वर आहे. अशा प्रकारे अष्टमूर्तीत ईश्वराचे अधिष्ठान आहे. शिवालयात गेल्यावर शिवलिंगाचे पूजन हे मुख्य कर्म आहे. परंतु मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण पायरीला नमस्कार करतो. नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो. मंदिराच्या भिंतीला नमस्कार करतो. मंदिराच्या भिंतीला पाय लागला तरी चूक झाली या भावनेने नमस्कार करतो. घराच्या भिंतीला पाय लागला तर नमस्कार का करीत नाही? एवढेच नव्हे तर काही लोक राग आल्यावर इतरांना मारता येत नाही म्हणून घरातल्या भिंतीवर लाथा घालतात. मंदिर आणि घर यांत अंतर कोणते? तर मंदिरात शिवाचा निवास असतो आणि घरात जीवाचा. ईश्वराच्या वास्तव्यामुळे मंदिरदेखील ईश्वरासारखे पूज्य, वंदनीय मानले जाते. त्याचप्रकारे पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, सूर्य व चंद्र यांच्यात ईश्वराचे अधिष्ठान आहे म्हणून ते पूज्य आहेत. परंतु ते प्रत्यक्ष ईश्वर नव्हेत.
प्रपंच हे कार्य आहे, त्यावरूनच आपण त्याच्या कारणाचे अनुमान करीत असतो. अनुमान हे असे प्रमाण आहे की वस्तू प्रत्यक्ष दिसत नसली तरी तिचे ज्ञान आपण मिळवू शकतो. अरण्यात धुरांचा लोट दिसला तर तेथे अग्नी आहे असे आपण अनुमान करतो. अग्नी आपल्या दृष्टीला दिसत नाही. तरी ‘यत्र यत्र धूम: तत्र तत्र वन्हि:।’ म्हणजे जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो, या न्यायाने आपल्याला त्याचे ज्ञान होते. याला आधार कोणता? तर आपले स्वयंपाकघर. अलीकडे धूर नसलेल्या चुली म्हणजे स्टोव्ह, गॅस इत्यादीमुळे हे विधान थोडे बदलावे लागेल. परंतु चूल जेव्हा लाकडे घालून पेटवतात तेव्हा तेथे हमखास धूर असतो. म्हणून धूर तेथे अग्नी असलाच पाहिजे. घरातला हा अनुभव अरण्यात उपयोगी पडतो. धूर हे कार्य आणि अग्नी हे कारण. अग्नी नसेल तर धूर राहणार नाही. त्याप्रमाणे एवढा विशाल प्रपंच हे कार्य असेल तर त्याचे कारणदेखील असलेच पाहिजे, असे अनुमान-प्रमाणाने सिद्ध होते. कारणाशिवाय कार्य कधी होत नाही. टेबल-खुर्च्या झाडामधून तयार होऊन पडत नाहीत. त्यांची निर्मिती करणारा कोणीतरी सुतार असतो. म्हणून एवढे महान ब्रह्मांड निर्माण करणारा कोणीतरी विलक्षण निर्माता असला पाहिजे. तो आपल्यापेक्षा महान आहे. आपण पृथ्वी निर्माण करू शकत नाही. वायू, अग्नी, आकाश निर्मू शकत नाही. फार तर दगडमाती घेऊन एखादे घर, मंदिर निर्माण करू शकतो. परंतु दगड-माती आपण निर्माण करीत नाही. म्हणून पृथ्वी, वायू इत्यादी ईश्वर का नाहीत? कारण ते एक कार्य आहे. कार्य करणारा त्यापेक्षा विलक्षण आहे. वस्त्रे आणि वस्त्रे निर्माण करणारा विणकर हे वेगळे असतात. टेबल-खुर्ची आणि ते घडविणारा सुतार हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचभूते आणि त्यांची निर्मिती करणारा हे वेगळे आहेत. घट आणि कुंभार यांच्यात भिन्नत्व असते. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य-चंद्र हे त्यांच्या निर्मात्यापासून- ईश्वरापासून भिन्न असतात.
पृथ्वी आदी अष्टतत्त्वे मग ईश्वराची काय आहेत? तर ती त्याची शरीरे आहेत. शरीर आणि आत्मा हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी तत्त्वे आणि ईश्वर यांचा संबंध असून ते परस्परांपासून भिन्न आहेत.
शरीरभूतादेतस्मात् प्रपंचात् परमेष्ठिन:।
आत्मभूतस्य देवस्य नाभेदो न पृथक्स्थिति:॥ १०.५२
शरीर व आत्मा एक प्रकारे भिन्न आणि एक प्रकारे अभिन्नदेखील आहेत. शरीर आत्मा नव्हे आणि आत्मा शरीर नव्हे. परंतु शरीराशिवाय आत्म्याला प्रकट होता येत नाही. जीवात्म्याचे सारे व्यवहार शरीराद्वारेच घडतात. म्हणून पृथ्वी आदी अष्टतत्त्वे आणि ईश्वर हे भिन्न आहेत आणि अभिन्नदेखील आहेत. अर्थात् त्यांच्यात भेदाभेद आहे. ते साक्षात् शिवस्वरूप नाहीत.
येथे एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य व चंद्र ही सात तत्त्वे ईश्वरापासून भिन्न आहेत हे पटू शकते. परंतु आत्मा हा तर ईश्वरांश आहे, तो ईश्वरापासून भिन्न कसा असेल?
अचेतनत्वात् पृथ्वादेरज्ञत्वादात्मनस्तथा।
सर्वज्ञस्य महेशस्य नैकरूपत्वमिष्यते॥ १०.५३
जे चेतन असते ते स्पष्टपणे प्रतीत होत नसते. जीवात्म्यात जसे चैतन्य अभिव्यक्त होते तसे ते पृथ्वीत होत नाही. सामान्यत: पृथ्वी जड मानली जाते. यद्यपि तिच्यात देखील चैतन्य आहे, परंतु ते गूढ असल्यामुळे त्याची प्रचीती येत नाही. म्हणून आपण पृथ्वीला जड मानतो. याचप्रकारे अन्य महाभूतांना जड मानतो. परमात्मा चेतन आहे आणि पृथ्वी आदी महाभूते अचेतन आहेत. चेतन आणि अचेतन यांच्यात सामरस्य असू शकत नाही. पाण्यात पाणी मिसळते. दुधात दूध मिसळते. परंतु दोन भिन्न वस्तू समरस होऊ शकत नाहीत. दुधात पाणी मिसळले तरी दूध व पाणी वेगळे करता येते. हंसपक्षी दूध व पाणी वेगळे करतो असे म्हणतात. हंसपक्षी आज सापडणार नाही. परंतु दुधात थोडे मीठ टाकले किंवा लिंबू पिळले तरी दूध आणि पाणी वेगळे करता येईल. म्हणून दोन भिन्न वस्तू वरवर पाहता मिसळलेल्या दिसल्या तरी त्या एकरूप होत नाहीत. त्या वेगळ्या करता येतात. पृथ्वी आदी महाभूते आणि परमात्मा हे समरस होऊ शकत नाहीत. जड असल्यामुळे पृथ्वी आदी परमात्मा नाहीत.
आता प्रश्न राहिला आत्म्याचा. आत्मा तर चेतन आहे. महावाक्यात तर आत्म्यालाच परमात्मा म्हटले आहे. ‘तत्त्वमसि श्वेतकेतो।’ अर्थात् तूच ब्रह्म आहेस, तूच परमात्मा आहेस. मग आत्मा परमात्मा का नाही? तर जीवात्मा अज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. अज्ञ याचा व्यावहारिक अर्थ येथे अभिप्रेत नाही. कोणताही मनुष्य स्वत:ला अज्ञ समजायला तयार नसतो. परंतु प्रत्येकाच्या आत अज्ञान निरंतर वास करते. एखाद्याला वडिलाचे नाव विचारले तर तो सांगू शकेल. मग पुढचा प्रश्न- आजोबाचे नाव काय? तो सांगेल. पणजोबाचे नाव काय? खापरपणजोबाचे नाव काय? त्याला सांगता येईल. परंतु त्यापुढे विचारत राहिलो तर त्याला सांगता यायचे नाही. त्याला सांगता येत नाही याचा अर्थ त्याला त्याचे ज्ञान नाही, म्हणजेच अज्ञान आहे. असे अन्य कोणत्याही विषयाबद्दल विचारीत राहिलो तर केव्हा ना केव्हातरी स्वत:चे अज्ञान मान्य करावे लागते. बरेच लोक स्वत:ला अज्ञानी मानत नाहीत. परंतु केव्हातरी त्यांचे अज्ञान सिद्ध होते. आपण समोरच्या व्यक्तीला पाहू शकतो. परंतु आपल्या पाठीमागे कोण आहे त्याला पाहू शकत नाही. अर्थात् आपल्या पाठीमागचा परिसर आपल्यासाठी अज्ञातच असतो. इंद्रियापुढे जो विषय येतो त्याचे ज्ञान आपल्याला होते. इंद्रियापलीकडे जे आहे त्याचे ज्ञान सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडे आहे. योगीपुरुषांना अतींद्रिय वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. दृष्टी जेथपर्यंत पोहोचते तेवढे ज्ञान आपल्याला मिळते. दृष्टीपलीकडे जे आहे ते ज्ञान होत नाही. काही साधना केल्यानंतर ते होऊ शकेल. योगीपुरुषांना तर पूर्वजन्माचे देखील ज्ञान होते. बौद्धांच्या परिभाषेत या ज्ञानाला ‘जातिस्मरण’ म्हणतात. धारणाशक्तीला मागे मागे ढकलत नेले तर पूर्वजन्मांचे ज्ञान होणे अशक्य नाही.
सकाळपासून आपण सतत कर्मे करीत असतो. संध्याकाळी जर कोणी आपल्याला विचारले की, तुम्ही सकाळपासून काय काम केले? तर क्षणभर स्तब्ध राहून आपण स्मरण करतो. नंतर सांगतो की, सकाळी उठून ईश्वराला नमस्कार केला किंवा कोणाला शिवी दिली इत्यादी. समजा विचारले, काल सकाळी उठल्यावर काय केले? परवा सकाळी उठल्यावर काय केले? असे कोणी विचारीत गेला तर चार-पाच दिवसांच्या पलीकडे आपण काही सांगू शकणार नाही. एवढेच सांगू की, आता काही आठवत नाही. याच जन्मात पाच-सहा दिवसांपूर्वीचे स्मरण आपल्याला राहत नाही. कारण आपण सारखे विसरत जातो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण असते. ते सारखे आपल्या स्मरणाला झाकून टाकत असते. बुद्धीवर अज्ञानाचे पटल असल्यामुळेच प्रत्येक जीवात्मा अज्ञ आहे, अज्ञानी आहे असे म्हटले जाते. या जन्मातलेच ज्ञान त्याला नसते तर पूर्वजन्माचे, त्याच्या पूर्वजन्मांचे त्याला ज्ञान कसे असेल? म्हणून जीवात्मा अज्ञ आहे.
जीवात्मा हा परमात्मा का नाही? तर तो अज्ञ असल्यामुळे. अज्ञ जीवात्मा आणि सर्वज्ञ परमात्मा हे एकरूप असत नाहीत. परमात्म्यात समरस होण्यासाठी जीवात्म्याला सर्वज्ञ व्हायला हवे. सर्वज्ञ परमात्माच अल्पज्ञ होऊन जीवात्मा झाला, असे सिद्धान्त सांगतो. बल्बचा प्रकाश सर्वदूर पसरतो, परंतु त्यावर एखादे भांडे झाकले तर? त्याचा प्रकाश फक्त भांड्यापुरता सीमित होईल. त्याप्रमाणे सर्वज्ञत्व, सर्वकर्तृत्व हे भाव आणवादी मलांनी आवृत्त झाल्यामुळे सर्वज्ञ आत्मा अल्पज्ञ झाला, सर्वकर्ता ईश्वर अल्पकर्ता झाला. आपल्याला सारे ज्ञान नाही, आपण सारे काही करू शकत नाही. जेवढी आपली बुद्धी तेवढे आपले ज्ञान. जेवढी आपली शक्ती तेवढेच आपले कार्य. स्वत:च्या मनात काय आहे हे आपण थोडे जाणू शकतो. इतरांच्या मनात काय आहे ते जाणता येत नाही. एखाद्या मनुष्याने थोडी साधना केली तर तो फार तर काही लोकांच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकेल. परंतु सर्वांच्या मनातले भाव जाणू शकत नाही. परमात्मा मात्र सर्वज्ञ असल्याने सर्व जाणू शकतो. एकाच वेळी हजारो भक्तांनी प्रार्थना केली तरी ती ईश्वर जाणतो. कबीरांनी म्हटले आहे:-
मुल्ला हो के बाँग पुकारे अल्ला तो क्या बहरा है?।
मुंगीके पाव घुंगरु बजे वो भी अल्ला सुनता है॥
यांचे तात्पर्य असे की, कितीही हळुवारपणे तुम्ही ईश्वराशी संवाद केला तरी तो ऐकू शकतो, त्यासाठी ओरडण्याची जरुरी नाही. तो सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. तो सर्वत्र आहे.
यत्र यत्र जीव: तत्र तत्र शिव:।
जेथे जीव आहे तेथे शिव आहे. उपनिषदांत म्हटले आहे:-
द्वा सुपर्णा सयुजा सखाया
समानवृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति
अनश्नन्नन्योऽभिचाकशीति॥
जीवात्मा आणि परमात्मा अनादिकालापासून मित्र आहेत. त्यांच्यात कृष्णार्जुनाप्रमाणे सख्यभाव आहे. जो सखा असतो तो सुखदु:खात संगत करतो. जीवात्म्याचा खरा सखा परमात्माच आहे. जीव जीवाचा सखा होतो ते स्वार्थासाठी.
आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति।
बृहदारण्यकोपषिदात याज्ञवल्क्य महर्षी सांगतात, प्रपंचातील प्रेमव्यवहार स्वार्थमूलक असतो. नि:स्वार्थ प्रेम कोणी कोणावर करीत नाही. ईश्वराचे प्रेम मात्र नि:स्वार्थ असते. आपल्याकडून त्याला काहीच नको आहे. तुम्ही पूजा केली नाही म्हणून त्याची पूजा होत नाही असे नाही. तुम्ही नैवेद्य दाखविला नाही म्हणून तो उपाशी राहत नाही. तो नित्यतृप्त आहे. त्याला नैवेद्य दाखवायचा तो त्याच्यासाठी नव्हे तर आपल्यासाठी. आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आपण त्याला नैवेद्य दाखवतो. ईश्वर त्यातले काही खात नाही. ‘तुझ्याकडे हात माझ्याकडे भात’ अशी मराठीत म्हण आहे. हाताने ईश्वराला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य खाणारे दात मात्र आपल्याजवळ असतात. ईश्वराला तुमचा भात नको, भाव हवा. त्याला तुमच्याकडून काही नको, तुम्हालाच त्याच्याकडून काही हवे असते. ईश्वरचिंतन करून तुम्ही कर्म करीत राहिलात तर तुम्हाला काही कमी पडत नाही.
एकदा गुरूने शिष्याला उपदेश केला, “ईश्वर हाच तुझा खरा सोबती आहे. त्याचे निष्ठेने भजन कर, चिंतन कर. त्यामुळे तुला काही कमी पडणार नाही. स्वत:च्या खाण्यापिण्याचीही काळजी करू नकोस.”
शिष्य एका मंदिरात जाऊन भजन करीत बसला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले. तिसरा दिवस उजाडला. पोटात भुकेची आग पेटली. तरी गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याने भजन सुरूच ठेवले. गावातल्या लोकांनी त्याची अवस्था पाहिली. काही जण त्याच्याकडे जेवण घेऊन गेले. त्याला जेवू घातले. लोकही मोठे हुशार असतात. आपल्याकडून भजन-पूजन होत नाही, हा बिचारा भजन करतोय तर निदान त्याला अन्नपाणी देऊन त्याचे थोडे पुण्य आपल्या पदरात पडावे अशा उद्देशाने ते त्याला जेवण देऊ लागले.
गावातल्या एका मनुष्याच्या घरी काही ग्रहपीडा होती. तिच्या शांतीसाठी एका ज्योतिषाला त्याने विचारले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, “ग्रहशांतीसाठी एखादे कांबळे किंवा बकरी दान कर. त्यातही निर्जीव कांबळ्यापेक्षा सजीव बकरीचे दान जास्त योग्य. ज्याच्याजवळ काही नाही अशाला दान करणे फलदायक असते.”
त्या गृहस्थाला वाटले की मंदिरात भजन करणार्या महाराजाजवळ काहीच नाही. तोच दानाला जास्त योग्य आहे. म्हणून त्याने महाराजांना बकरी अर्पण केली. आतापर्यंत त्याच्याजवळ संसाराची काहीच सामग्री नव्हती. फक्त ईश्वर आणि तो दोघेच होते. आता दोघांमध्ये एक बकरी आली. हा पूजेला बसला की बकरी ओरडायची. तिला भूक लागायची, तहान लागायची. लोक महाराजांना जेवण आणून द्यायचे. परंतु बकरीच्या चार्यासाठी महाराजांना फिरावे लागे. थोडे गवत आणायचे, पाणी पाजायचे यात त्याचा वेळ जाऊ लागला. पुढे तर बकरी मोठी होत गेली तेव्हा तिला जास्त खायला लागायचे. हळूहळू महाराज बकरीचीच सेवा करू लागले, ईश्वराची सेवा थांबली. बकरीवर प्रेम बसले. गृहस्थाला मुलाबद्दल प्रेम वाटते त्याप्रमाणे.
एके दिवशी तो पूजेला बसला आणि बकरी पळून गेली. ‘माझी बकरी, माझी बकरी’ म्हणत तो सर्वत्र शोध घेऊ लागला. त्याला अनिवार दु:ख झाले. ‘बकरी बकरी’ म्हणत धावताना त्याचे गुरू समोरून आले. त्यांनी त्याची अवस्था पाहिली म्हणाले, “अरे, तुला ती मी ईश्वराचा सखा व्हायला सांगितले होते. तू तर बकरीचा सखा झालास!”
बकरी पळून जाऊ शकते आणि मरू शकते. परंतु ईश्वर मात्र कधी पळून जात नाही आणि मरत देखील नाही. म्हणून आपला खरा सखा ईश्वरच आहे.
‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया’. एका वृक्षावर दोन पक्षी बसलेलेे आहेत. एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा त्याला प्रकाशित करतो आहे. फळ खाणारा पक्षी म्हणजे जीवात्मा आहे तसाच परमात्मादेखील आहे. तो सर्वज्ञ असल्याने जीवात्म्याची प्रार्थना ऐकून त्याची पूर्ती करतो. जीवात्मा हा शरीरापुरता मर्यादित आहे. म्हणून तो अज्ञ, अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीव आणि सर्वज्ञ ईश्वर, अल्पकर्ता जीव आणि सर्वकर्ता ईश्वर यांच्यात अभेद असू शकत नाही. जीवाचे अल्पज्ञत्व, अल्पकर्तृत्व नष्ट झाले की तो जीव राहत नाही तर शिव होतो.
ही स्थिती माहेश्वरासाठी अजून दूर आहे. कारण तो दुसर्या पायरीवरच आहे. अजून त्याला चार पायर्या चढायच्या आहेत. तो परमात्म्याशी समरस होऊ शकत नाही. म्हणून येथे सांगितले आहे की, पृथ्वी आदी सात तत्त्वे अचेतन असल्यामुळे आणि जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे ही आठ तत्त्वे ईश्वर नाहीत. परमात्मा या पलीकडचा आहे. या तत्त्वांत परमात्म्याचे अधिष्ठान आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व आत्मा या अष्टमूर्तीपेक्षा परमात्मा भिन्न आहे असे मानणार्या माहेश्वराला ‘अष्टमूर्तिनिरासक’ म्हटले जाते. पुढे पृथ्वी आदी ईश्वररूप आहेत हे सांगणार आहेत. परंतु हातावरील इष्टलिंग जोपर्यंत ईश्वररूप दिसत नाही, तोपर्यंत सर्व ब्रह्मांड ईश्वररूप दिसणार नाही. ज्याला इष्टलिंगात देव पाहता येत नाही त्याला ब्रह्मांडात ईश्वर कसा पाहता येईल? म्हणून प्रथम इष्टलिंगातच ईश्वर आहे अशी दृढ भावना झाल्यानंतर मग तिचा परीघ वाढत जातो. मंदिरातल्या शिवलिंगात आपण प्रथम ईश्वर पाहतो, नंतर मंदिर पूज्य मानतो. ज्या गावात मंदिर आहे ते गाव, मग प्रदेश, मग देश आणि विश्व हे सारे ईश्वररूप दिसू लागते. काशीला आपण पवित्र मानतो. कारण तेथे भगवान विश्वेश्वराचे नित्य वास्तव्य असते. सीमित भावना विकसित होत गेली की पूर्ण ब्रह्मांड ईश्वररूप दिसू लागते. परंतु त्याआधी ही भावना एकाच ठिकाणी स्थिर करणे आवश्यक असते. ईश्वर इतरत्र कोठेही नाही, तो फक्त इष्टलिंगातच आहे या भावनेचे दृढीकरण करण्यासाठीच आचार्यांनी अष्टमूर्तिनिरसनस्थलाचे प्रतिपादन केले आहे, एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत.
॥ॐ शांति: शांति: शांति:॥
जन्म हा अखेरचा
अनुवाद/संपादन : शे० दे० पसारकर
(पृ० २२१-२२६)
***
No comments:
Post a Comment