Wednesday, August 30, 2017



(विभूतिवैभव, अंक १०१)

श्री १००८ जगद्गुरू
डॉ० चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
वेदान्ताचार्य, पीएच्०डी०, डी०लिट्०

अंगषट्स्थलांतर्गत माहेश्‍वरस्थल

अष्टमूर्तिनिरसनस्थल

जिज्ञासू सद्भक्तांनो,

दर्शनशास्त्रात भगवत्तत्त्व सर्वत्र दाखविण्याची एक परंपरा आहे. भगवत्तत्त्व अन्यत्र नसून एकाच ठिकाणी आहे असे सांगणारीही दुसरी परंपरा आहे. भगवत्तत्त्व सर्वत्र आहे ही परंपरा माहेश्‍वरस्थलातील साधकाला विरोधी ठरते. म्हणून येथे तिचे निरसन केले आहे. भारतीय दर्शनशास्त्रात पृथ्वीपासून आत्म्यापर्यंत ईश्‍वराच्या आठ मूर्ती मानल्या जातात.

पृथिव्याद्यष्टमूर्तित्वमीश्‍वरस्य प्रकीर्तितम्।_
तदधिष्ठातृभावेन न साक्षादेकभावत:॥
(श्रीसिद्धान्तशिखामणी, १०.४९)

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते; सूर्य, चंद्र आणि आत्मा या ईश्‍वराच्या अष्टमूर्ती होत. अर्थात् या ईश्‍वराच्या आठ आकृती आहेत. आपल्या देशात जडाची पूजा होते आणि चैतन्याचीही पूजा होते. जड व चेतन यांत ईश्‍वरत्व समान आहे हे दाखवण्यासाठी जडाची पूजा सांगितली आहे. ज्योतिर्लिंगे बारा आहेत. त्याप्रमाणे पंचमहाभूते ही पंचलिंगे मानली जातात. दक्षिण भारतात ही पाच भौतिक लिंगे प्रसिद्ध आहेत.

पृथ्वी, जल इत्यादींना ईश्‍वर मानणारी परंपरा का आहे? अत्यंत सूक्ष्म तत्त्व स्थूल दृष्टीच्या मनुष्याला समजावून सांगणे कठीण असते. जे आपल्या दृष्टीला दिसते त्यामध्ये प्रथम भगवत्तत्त्वाचे प्रतिपादन केले पाहिजे. जे स्थूल दृष्टीला दिसत नाही आणि ज्याचा साक्षात्कार होणे अवघड आहे त्यामध्ये भगवत्तत्त्व दाखवल्यावर लोकांना पटत नाही. पंचमहाभूते ही अनुभवगोचर आहेत. पृथ्वीवर आपण राहतो, जलामुळे आपले जीवन आहे, अग्नीमुळे आपण जिवंत आहोत, वायूमुळे आपण श्‍वसन करतो, आकाशात आपला निवास आहे, सूर्य, चंद्र आपल्याला प्रकाशमान करतात आणि आत्म्यामुळे सारे व्यवहार घडतात. स्थूलातील स्थूलात ईश्‍वर आहे असे सांगण्याची परंपरा यामुळे निर्माण झाली.

वर्षप्रतिपदेला चंद्राची कोर पाहिली तर ती जशी वृद्धिंगत होत जाते तसे आपले आयुष्य, विद्या, धन वृद्धिंगत होत जाते, असा एक समज आहे. ही प्रतिपदेची कोर अत्यंत सूक्ष्म, एखाद्या रेषेसारखी असते. ती दुसर्‍याला दाखवताना एखाद्या झाडाच्या फांदीसमोर ‘तिच्या आसपास पाहा’ असे सांगून दाखवावी लागते. यालाच ‘शाखाचंद्रन्याय’ म्हणतात. सूक्ष्म वस्तू दाखवण्यासाठी प्रथम स्थूल वस्तू दाखवावी लागते. त्याचप्रमाणे सर्वव्यापक चैतन्याला दाखवण्यासाठी प्रारंभिक अवस्थेत ‘पृथ्वीच ईश्‍वर आहे’ असे सांगावे लागते. म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. सकाळी अंगणात सडा घालून त्यावर रांगोळी घालतात. ही पृथ्वीचीच पूजा होय. सकाळी उठल्यानंतर बिछान्यावरून खाली जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीला नमस्कार करण्याची एक परंपरा आहे:-

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादाघातं सहस्व मे।

पृथ्वी ही विष्णूची पत्नी आहे. तुला मी नमस्कार करतो, कारण आता दिवसभर तुझ्या अंगावर पाय ठेवून वावरायचे आहे, मला क्षमा कर. पृथ्वीत ‘क्षमा’ हा गुण आहे. म्हणून तिला ‘क्षमया धरित्री’ असे म्हणतात. ती सारे काही सहन करते. पृथ्वीला भगवत्तत्त्व मानून तिची पूजा केली जाते. गंगादी नद्यांची अर्थात् जलाची पूजा करतात. स्वयंपाक करण्याआधी चुलीची पूजा करण्याची पद्धती होती. त्यानंतर अग्निपूजा करून स्वयंपाक केला जात असे. अगरबत्ती इत्यादी सुगंधी द्रव्ये जाळून वायूची पूजा करतात आणि मौन धारण करणे हीच आकाशाची पूजा होय. शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून त्याला विश्रांती देण्यासाठी मौन धारण केले जाते. सूर्यचंद्रांची पूजा तर नित्य होत असते. आत्म्याची पूजाही आपण शरीरपोषण करून एकप्रकारे करीत असतो.

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य व आत्मा ही परमेश्‍वराची रूपेच आहेत. परंपरेने त्यांची पूजादेखील केली जाते. परंतु माहेश्‍वरस्थलातील साधकासाठी या अष्टमूर्तीच्या पूजेचा निषेध केलेला आहे. जर अष्टमूर्तीची पूजा त्याने केली तर त्याच्या लिंगनिष्ठेला बाधा येऊन त्याचे मन विचलित होण्याची शक्यता आहे. आठ ठिकाणी केली जाणारी पूजा जर मनोभावाने एकाच ठिकाणी केली तर पूजेचे फल लवकर मिळते. म्हणून माहेश्‍वरासाठी आचार्य सांगतात की, पृथ्वी आदी अष्टमूर्ती म्हणजे साक्षात् शिव नव्हे तर ठिकाणी शिव अधिष्ठातृभावाने वास्तव्य करतो. पृथ्वी ईश्‍वर नव्हे, तर पृथ्वीत ईश्‍वर आहे. अशा प्रकारे अष्टमूर्तीत ईश्‍वराचे अधिष्ठान आहे. शिवालयात गेल्यावर शिवलिंगाचे पूजन हे मुख्य कर्म आहे. परंतु मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण पायरीला नमस्कार करतो. नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो. मंदिराच्या भिंतीला नमस्कार करतो. मंदिराच्या भिंतीला पाय लागला तरी चूक झाली या भावनेने नमस्कार करतो. घराच्या भिंतीला पाय लागला तर नमस्कार का करीत नाही? एवढेच नव्हे तर काही लोक राग आल्यावर इतरांना मारता येत नाही म्हणून घरातल्या भिंतीवर लाथा घालतात. मंदिर आणि घर यांत अंतर कोणते? तर मंदिरात शिवाचा निवास असतो आणि घरात जीवाचा. ईश्‍वराच्या वास्तव्यामुळे मंदिरदेखील ईश्‍वरासारखे पूज्य, वंदनीय मानले जाते. त्याचप्रकारे पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, सूर्य व चंद्र यांच्यात ईश्‍वराचे अधिष्ठान आहे म्हणून ते पूज्य आहेत. परंतु ते प्रत्यक्ष ईश्‍वर नव्हेत.

प्रपंच हे कार्य आहे, त्यावरूनच आपण त्याच्या कारणाचे अनुमान करीत असतो. अनुमान हे असे प्रमाण आहे की वस्तू प्रत्यक्ष दिसत नसली तरी तिचे ज्ञान आपण मिळवू शकतो. अरण्यात धुरांचा लोट दिसला तर तेथे अग्नी आहे असे आपण अनुमान करतो. अग्नी आपल्या दृष्टीला दिसत नाही. तरी ‘यत्र यत्र धूम: तत्र तत्र वन्हि:।’ म्हणजे जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो, या न्यायाने आपल्याला त्याचे ज्ञान होते. याला आधार कोणता? तर आपले स्वयंपाकघर. अलीकडे धूर नसलेल्या चुली म्हणजे स्टोव्ह, गॅस इत्यादीमुळे हे विधान थोडे बदलावे लागेल. परंतु चूल जेव्हा लाकडे घालून पेटवतात तेव्हा तेथे हमखास धूर असतो. म्हणून धूर तेथे अग्नी असलाच पाहिजे. घरातला हा अनुभव अरण्यात उपयोगी पडतो. धूर हे कार्य आणि अग्नी हे कारण. अग्नी नसेल तर धूर राहणार नाही. त्याप्रमाणे एवढा विशाल प्रपंच हे कार्य असेल तर त्याचे कारणदेखील असलेच पाहिजे, असे अनुमान-प्रमाणाने सिद्ध होते. कारणाशिवाय कार्य कधी होत नाही. टेबल-खुर्च्या झाडामधून तयार होऊन पडत नाहीत. त्यांची निर्मिती करणारा कोणीतरी सुतार असतो. म्हणून एवढे महान ब्रह्मांड निर्माण करणारा कोणीतरी विलक्षण निर्माता असला पाहिजे. तो आपल्यापेक्षा महान आहे. आपण पृथ्वी निर्माण करू शकत नाही. वायू, अग्नी, आकाश निर्मू शकत नाही. फार तर दगडमाती घेऊन एखादे घर, मंदिर निर्माण करू शकतो. परंतु दगड-माती आपण निर्माण करीत नाही. म्हणून पृथ्वी, वायू इत्यादी ईश्‍वर का नाहीत? कारण ते एक कार्य आहे. कार्य करणारा त्यापेक्षा विलक्षण आहे. वस्त्रे आणि वस्त्रे निर्माण करणारा विणकर हे वेगळे असतात. टेबल-खुर्ची आणि ते घडविणारा सुतार हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचभूते आणि त्यांची निर्मिती करणारा हे वेगळे आहेत. घट आणि कुंभार यांच्यात भिन्नत्व असते. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य-चंद्र हे त्यांच्या निर्मात्यापासून- ईश्‍वरापासून भिन्न असतात.

पृथ्वी आदी अष्टतत्त्वे मग ईश्‍वराची काय आहेत? तर ती त्याची शरीरे आहेत. शरीर आणि आत्मा हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी तत्त्वे आणि ईश्‍वर यांचा संबंध असून ते परस्परांपासून भिन्न आहेत.

शरीरभूतादेतस्मात् प्रपंचात् परमेष्ठिन:।
आत्मभूतस्य देवस्य नाभेदो न पृथक्स्थिति:॥ १०.५२

शरीर व आत्मा एक प्रकारे भिन्न आणि एक प्रकारे अभिन्नदेखील आहेत. शरीर आत्मा नव्हे आणि आत्मा शरीर नव्हे. परंतु शरीराशिवाय आत्म्याला प्रकट होता येत नाही. जीवात्म्याचे सारे व्यवहार शरीराद्वारेच घडतात. म्हणून पृथ्वी आदी अष्टतत्त्वे आणि ईश्‍वर हे भिन्न आहेत आणि अभिन्नदेखील आहेत. अर्थात् त्यांच्यात भेदाभेद आहे. ते साक्षात् शिवस्वरूप नाहीत.

येथे एक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य व चंद्र ही सात तत्त्वे ईश्‍वरापासून भिन्न आहेत हे पटू शकते. परंतु आत्मा हा तर ईश्‍वरांश आहे, तो ईश्‍वरापासून भिन्न कसा असेल?

अचेतनत्वात् पृथ्वादेरज्ञत्वादात्मनस्तथा।
सर्वज्ञस्य महेशस्य नैकरूपत्वमिष्यते॥ १०.५३

जे चेतन असते ते स्पष्टपणे प्रतीत होत नसते. जीवात्म्यात जसे चैतन्य अभिव्यक्त होते तसे ते पृथ्वीत होत नाही. सामान्यत: पृथ्वी जड मानली जाते. यद्यपि तिच्यात देखील चैतन्य आहे, परंतु ते गूढ असल्यामुळे त्याची प्रचीती येत नाही. म्हणून आपण पृथ्वीला जड मानतो. याचप्रकारे अन्य महाभूतांना जड मानतो. परमात्मा चेतन आहे आणि पृथ्वी आदी महाभूते अचेतन आहेत. चेतन आणि अचेतन यांच्यात सामरस्य असू शकत नाही. पाण्यात पाणी मिसळते. दुधात दूध मिसळते. परंतु दोन भिन्न वस्तू समरस होऊ शकत नाहीत. दुधात पाणी मिसळले तरी दूध व पाणी वेगळे करता येते. हंसपक्षी दूध व पाणी वेगळे करतो असे म्हणतात. हंसपक्षी आज सापडणार नाही. परंतु दुधात थोडे मीठ टाकले किंवा लिंबू पिळले तरी दूध आणि पाणी वेगळे करता येईल. म्हणून दोन भिन्न वस्तू वरवर पाहता मिसळलेल्या दिसल्या तरी त्या एकरूप होत नाहीत. त्या वेगळ्या करता येतात. पृथ्वी आदी महाभूते आणि परमात्मा हे समरस होऊ शकत नाहीत. जड असल्यामुळे पृथ्वी आदी परमात्मा नाहीत.

आता प्रश्‍न राहिला आत्म्याचा. आत्मा तर चेतन आहे. महावाक्यात तर आत्म्यालाच परमात्मा म्हटले आहे. ‘तत्त्वमसि श्‍वेतकेतो।’ अर्थात् तूच ब्रह्म आहेस, तूच परमात्मा आहेस. मग आत्मा परमात्मा का नाही? तर जीवात्मा अज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. अज्ञ याचा व्यावहारिक अर्थ येथे अभिप्रेत नाही. कोणताही मनुष्य स्वत:ला अज्ञ समजायला तयार नसतो. परंतु प्रत्येकाच्या आत अज्ञान निरंतर वास करते. एखाद्याला वडिलाचे नाव विचारले तर तो सांगू शकेल. मग पुढचा प्रश्‍न- आजोबाचे नाव काय? तो सांगेल. पणजोबाचे नाव काय? खापरपणजोबाचे नाव काय? त्याला सांगता येईल. परंतु त्यापुढे विचारत राहिलो तर त्याला सांगता यायचे नाही. त्याला सांगता येत नाही याचा अर्थ त्याला त्याचे ज्ञान नाही, म्हणजेच अज्ञान आहे. असे अन्य कोणत्याही विषयाबद्दल विचारीत राहिलो तर केव्हा ना केव्हातरी स्वत:चे अज्ञान मान्य करावे लागते. बरेच लोक स्वत:ला अज्ञानी मानत नाहीत. परंतु केव्हातरी त्यांचे अज्ञान सिद्ध होते. आपण समोरच्या व्यक्तीला पाहू शकतो. परंतु आपल्या पाठीमागे कोण आहे त्याला पाहू शकत नाही. अर्थात् आपल्या पाठीमागचा परिसर आपल्यासाठी अज्ञातच असतो. इंद्रियापुढे जो विषय येतो त्याचे ज्ञान आपल्याला होते. इंद्रियापलीकडे जे आहे त्याचे ज्ञान सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडे आहे. योगीपुरुषांना अतींद्रिय वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. दृष्टी जेथपर्यंत पोहोचते तेवढे ज्ञान आपल्याला मिळते. दृष्टीपलीकडे जे आहे ते ज्ञान होत नाही. काही साधना केल्यानंतर ते होऊ शकेल. योगीपुरुषांना तर पूर्वजन्माचे देखील ज्ञान होते. बौद्धांच्या परिभाषेत या ज्ञानाला ‘जातिस्मरण’ म्हणतात. धारणाशक्तीला मागे मागे ढकलत नेले तर पूर्वजन्मांचे ज्ञान होणे अशक्य नाही.

सकाळपासून आपण सतत कर्मे करीत असतो. संध्याकाळी जर कोणी आपल्याला विचारले की, तुम्ही सकाळपासून काय काम केले? तर क्षणभर स्तब्ध राहून आपण स्मरण करतो. नंतर सांगतो की, सकाळी उठून ईश्‍वराला नमस्कार केला किंवा कोणाला शिवी दिली इत्यादी. समजा विचारले, काल सकाळी उठल्यावर काय केले? परवा सकाळी उठल्यावर काय केले? असे कोणी विचारीत गेला तर चार-पाच दिवसांच्या पलीकडे आपण काही सांगू शकणार नाही. एवढेच सांगू की, आता काही आठवत नाही. याच जन्मात पाच-सहा दिवसांपूर्वीचे स्मरण आपल्याला राहत नाही. कारण आपण सारखे विसरत जातो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण असते. ते सारखे आपल्या स्मरणाला झाकून टाकत असते. बुद्धीवर अज्ञानाचे पटल असल्यामुळेच प्रत्येक जीवात्मा अज्ञ आहे, अज्ञानी आहे असे म्हटले जाते. या जन्मातलेच ज्ञान त्याला नसते तर पूर्वजन्माचे, त्याच्या पूर्वजन्मांचे त्याला ज्ञान कसे असेल? म्हणून जीवात्मा अज्ञ आहे.

जीवात्मा हा परमात्मा का नाही? तर तो अज्ञ असल्यामुळे. अज्ञ जीवात्मा आणि सर्वज्ञ परमात्मा हे एकरूप असत नाहीत. परमात्म्यात समरस होण्यासाठी जीवात्म्याला सर्वज्ञ व्हायला हवे. सर्वज्ञ परमात्माच अल्पज्ञ होऊन जीवात्मा झाला, असे सिद्धान्त सांगतो. बल्बचा प्रकाश सर्वदूर पसरतो, परंतु त्यावर एखादे भांडे झाकले तर? त्याचा प्रकाश फक्त भांड्यापुरता सीमित होईल. त्याप्रमाणे सर्वज्ञत्व, सर्वकर्तृत्व हे भाव आणवादी मलांनी आवृत्त झाल्यामुळे सर्वज्ञ आत्मा अल्पज्ञ झाला, सर्वकर्ता ईश्‍वर अल्पकर्ता झाला. आपल्याला सारे ज्ञान नाही, आपण सारे काही करू शकत नाही. जेवढी आपली बुद्धी तेवढे आपले ज्ञान. जेवढी आपली शक्ती तेवढेच आपले कार्य. स्वत:च्या मनात काय आहे हे आपण थोडे जाणू शकतो. इतरांच्या मनात काय आहे ते जाणता येत नाही. एखाद्या मनुष्याने थोडी साधना केली तर तो फार तर काही लोकांच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकेल. परंतु सर्वांच्या मनातले भाव जाणू शकत नाही. परमात्मा मात्र सर्वज्ञ असल्याने सर्व जाणू शकतो. एकाच वेळी हजारो भक्तांनी प्रार्थना केली तरी ती ईश्‍वर जाणतो. कबीरांनी म्हटले आहे:-

मुल्ला हो के बाँग पुकारे अल्ला तो क्या बहरा है?।
मुंगीके पाव घुंगरु बजे वो भी अल्ला सुनता है॥

यांचे तात्पर्य असे की, कितीही हळुवारपणे तुम्ही ईश्‍वराशी संवाद केला तरी तो ऐकू शकतो, त्यासाठी ओरडण्याची जरुरी नाही. तो सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. तो सर्वत्र आहे.

यत्र यत्र जीव: तत्र तत्र शिव:।

जेथे जीव आहे तेथे शिव आहे. उपनिषदांत म्हटले आहे:-

द्वा सुपर्णा सयुजा सखाया
समानवृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति
अनश्‍नन्नन्योऽभिचाकशीति॥

जीवात्मा आणि परमात्मा अनादिकालापासून मित्र आहेत. त्यांच्यात कृष्णार्जुनाप्रमाणे सख्यभाव आहे. जो सखा असतो तो सुखदु:खात संगत करतो. जीवात्म्याचा खरा सखा परमात्माच आहे. जीव जीवाचा सखा होतो ते स्वार्थासाठी.

आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति।

बृहदारण्यकोपषिदात याज्ञवल्क्य महर्षी सांगतात, प्रपंचातील प्रेमव्यवहार स्वार्थमूलक असतो. नि:स्वार्थ प्रेम कोणी कोणावर करीत नाही. ईश्‍वराचे प्रेम मात्र नि:स्वार्थ असते. आपल्याकडून त्याला काहीच नको आहे. तुम्ही पूजा केली नाही म्हणून त्याची पूजा होत नाही असे नाही. तुम्ही नैवेद्य दाखविला नाही म्हणून तो उपाशी राहत नाही. तो नित्यतृप्त आहे. त्याला नैवेद्य दाखवायचा तो त्याच्यासाठी नव्हे तर आपल्यासाठी. आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आपण त्याला नैवेद्य दाखवतो. ईश्‍वर त्यातले काही खात नाही. ‘तुझ्याकडे हात माझ्याकडे भात’ अशी मराठीत म्हण आहे. हाताने ईश्‍वराला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य खाणारे दात मात्र आपल्याजवळ असतात. ईश्‍वराला तुमचा भात नको, भाव हवा. त्याला तुमच्याकडून काही नको, तुम्हालाच त्याच्याकडून काही हवे असते. ईश्‍वरचिंतन करून तुम्ही कर्म करीत राहिलात तर तुम्हाला काही कमी पडत नाही.

एकदा गुरूने शिष्याला उपदेश केला, “ईश्‍वर हाच तुझा खरा सोबती आहे. त्याचे निष्ठेने भजन कर, चिंतन कर. त्यामुळे तुला काही कमी पडणार नाही. स्वत:च्या खाण्यापिण्याचीही काळजी करू नकोस.”

शिष्य एका मंदिरात जाऊन भजन करीत बसला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले. तिसरा दिवस उजाडला. पोटात भुकेची आग पेटली. तरी गुरुवचनावर विश्‍वास ठेवून त्याने भजन सुरूच ठेवले. गावातल्या लोकांनी त्याची अवस्था पाहिली. काही जण त्याच्याकडे जेवण घेऊन गेले. त्याला जेवू घातले. लोकही मोठे हुशार असतात. आपल्याकडून भजन-पूजन होत नाही, हा बिचारा भजन करतोय तर निदान त्याला अन्नपाणी देऊन त्याचे थोडे पुण्य आपल्या पदरात पडावे अशा उद्देशाने ते त्याला जेवण देऊ लागले.

गावातल्या एका मनुष्याच्या घरी काही ग्रहपीडा होती. तिच्या शांतीसाठी एका ज्योतिषाला त्याने विचारले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, “ग्रहशांतीसाठी एखादे कांबळे किंवा बकरी दान कर. त्यातही निर्जीव कांबळ्यापेक्षा सजीव बकरीचे दान जास्त योग्य. ज्याच्याजवळ काही नाही अशाला दान करणे फलदायक असते.”

त्या गृहस्थाला वाटले की मंदिरात भजन करणार्‍या महाराजाजवळ काहीच नाही. तोच दानाला जास्त योग्य आहे. म्हणून त्याने महाराजांना बकरी अर्पण केली. आतापर्यंत त्याच्याजवळ संसाराची काहीच सामग्री नव्हती. फक्त ईश्‍वर आणि तो दोघेच होते. आता दोघांमध्ये एक बकरी आली. हा पूजेला बसला की बकरी ओरडायची. तिला भूक लागायची, तहान लागायची. लोक महाराजांना जेवण आणून द्यायचे. परंतु बकरीच्या चार्‍यासाठी महाराजांना फिरावे लागे. थोडे गवत आणायचे, पाणी पाजायचे यात त्याचा वेळ जाऊ लागला. पुढे तर बकरी मोठी होत गेली तेव्हा तिला जास्त खायला लागायचे. हळूहळू महाराज बकरीचीच सेवा करू लागले, ईश्‍वराची सेवा थांबली. बकरीवर प्रेम बसले. गृहस्थाला मुलाबद्दल प्रेम वाटते त्याप्रमाणे.

एके दिवशी तो पूजेला बसला आणि बकरी पळून गेली. ‘माझी बकरी, माझी बकरी’ म्हणत तो सर्वत्र शोध घेऊ लागला. त्याला अनिवार दु:ख झाले. ‘बकरी बकरी’ म्हणत धावताना त्याचे गुरू समोरून आले. त्यांनी त्याची अवस्था पाहिली म्हणाले, “अरे, तुला ती मी ईश्‍वराचा सखा व्हायला सांगितले होते. तू तर बकरीचा सखा झालास!”

बकरी पळून जाऊ शकते आणि मरू शकते. परंतु ईश्‍वर मात्र कधी पळून जात नाही आणि मरत देखील नाही. म्हणून आपला खरा सखा ईश्‍वरच आहे.

‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया’. एका वृक्षावर दोन पक्षी बसलेलेे आहेत. एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा त्याला प्रकाशित करतो आहे. फळ खाणारा पक्षी म्हणजे जीवात्मा आहे तसाच परमात्मादेखील आहे. तो सर्वज्ञ असल्याने जीवात्म्याची प्रार्थना ऐकून त्याची पूर्ती करतो. जीवात्मा हा शरीरापुरता मर्यादित आहे. म्हणून तो अज्ञ, अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीव आणि सर्वज्ञ ईश्‍वर, अल्पकर्ता जीव आणि सर्वकर्ता ईश्‍वर यांच्यात अभेद असू शकत नाही. जीवाचे अल्पज्ञत्व, अल्पकर्तृत्व नष्ट झाले की तो जीव राहत नाही तर शिव होतो.

ही स्थिती माहेश्‍वरासाठी अजून दूर आहे. कारण तो दुसर्‍या पायरीवरच आहे. अजून त्याला चार पायर्‍या चढायच्या आहेत. तो परमात्म्याशी समरस होऊ शकत नाही. म्हणून येथे सांगितले आहे की, पृथ्वी आदी सात तत्त्वे अचेतन असल्यामुळे आणि जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे ही आठ तत्त्वे ईश्‍वर नाहीत. परमात्मा या पलीकडचा आहे. या तत्त्वांत परमात्म्याचे अधिष्ठान आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व आत्मा या अष्टमूर्तीपेक्षा परमात्मा भिन्न आहे असे मानणार्‍या माहेश्‍वराला ‘अष्टमूर्तिनिरासक’ म्हटले जाते. पुढे पृथ्वी आदी ईश्‍वररूप आहेत हे सांगणार आहेत. परंतु हातावरील इष्टलिंग जोपर्यंत ईश्‍वररूप दिसत नाही, तोपर्यंत सर्व ब्रह्मांड ईश्‍वररूप दिसणार नाही. ज्याला इष्टलिंगात देव पाहता येत नाही त्याला ब्रह्मांडात ईश्‍वर कसा पाहता येईल? म्हणून प्रथम इष्टलिंगातच ईश्‍वर आहे अशी दृढ भावना झाल्यानंतर मग तिचा परीघ वाढत जातो. मंदिरातल्या शिवलिंगात आपण प्रथम ईश्‍वर पाहतो, नंतर मंदिर पूज्य मानतो. ज्या गावात मंदिर आहे ते गाव, मग प्रदेश, मग देश आणि विश्‍व हे सारे ईश्‍वररूप दिसू लागते. काशीला आपण पवित्र मानतो. कारण तेथे भगवान विश्‍वेश्‍वराचे नित्य वास्तव्य असते. सीमित भावना विकसित होत गेली की पूर्ण ब्रह्मांड ईश्‍वररूप दिसू लागते. परंतु त्याआधी ही भावना एकाच ठिकाणी स्थिर करणे आवश्यक असते. ईश्‍वर इतरत्र कोठेही नाही, तो फक्त इष्टलिंगातच आहे या भावनेचे दृढीकरण करण्यासाठीच आचार्यांनी अष्टमूर्तिनिरसनस्थलाचे प्रतिपादन केले आहे, एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत.

॥ॐ शांति: शांति: शांति:॥

जन्म हा अखेरचा
अनुवाद/संपादन : शे० दे० पसारकर
(पृ० २२१-२२६)

***

Saturday, August 26, 2017

बेंगळुरू येथील धर्मसमन्वय सभेत ज. पंचाचार्य व विरक्त धर्मगुरूंचा एकमुखाने उच्चार

लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैव धर्माचेच पर्यायनाम


बेंगळुरू, दि. २३-

 येथील विजयनगरमधील म. बसवेश्‍वर सुज्ञानमंटपामध्ये जगद्गुरू पंचाचार्य आणि निरंजन पीठाचे होस्पेट व मुंडरगी येथील दोन जगद्गुरू आणि ५०० पेक्षा अधिक शिवाचार्य व निरंजनमूर्ती यांनी एकत्र विचार करून वीरशैव लिंगायत हे वेगवेगळे नसून ते एकच आहेत आणि लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैवधर्माचेच एक पर्यायनाम आहे, या विचाराचा एकमताने पुरस्कार केला. या सभेत श्रीरंभापुरी जगद्गुरू, प्रसन्नरेणुक वीरसोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीउज्जयिनी जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे सान्निध्यस्थानी विराजमान होते.

काही लोक वीरशैव आणि लिंगायत असा भेद करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा डाव वीरशैव लिंगायत समाजाने नीट समजून घेतला पाहिजे. वीरशैव व लिंगायत हे वेगळे नसून एका नाण्याच्याच त्या दोन बाजू आहेत. आपण सर्व एकच आहोत ही भावना प्रबळ असली पाहिजे. ज. पंचाचार्यांनी या धर्माची
स्थापना केली असून म. बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात वीरशैव धर्मदीक्षा घेऊन या धर्माचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण वचनसाहित्यात एकाही ठिकाणी ‘लिंगायत’ या शब्दाचा उच्चार केलेला नाही. त्यांनी ‘वीरशैव’ हाच शब्द सर्वत्र योजिलेला आहे. ‘मी आधी शैव होतो, आता वीरशैव झालो’ असे एका वचनात स्वत: म. बसवेश्‍वरांनी म्हटले आहे. अशा म. बसवेश्‍वरांनाच धर्मसंस्थापक ठरविण्याचा प्रयत्न काही लोक राजकीय हेतूसाठी करीत आहेत. हे कदापि शक्य होणार नाही, असे विचार या सभेत जगद्गुरू पंचाचार्य व सर्व शिवाचार्य यांनी व्यक्त केले.

४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बदामी, जि. बागलकोट) येथे सर्व गुरू आणि विरक्त मठाधिपती लक्षावधी उपस्थित भक्तांसमोर वीरशैव लिंगायत एकत्वाचा उच्चार करणार आहेत. या कार्यक्रमात पंचपीठांच्या जगद्गुरूंशिवाय बेंगळुरू कोळ्ळद मठाचे शांतवीर स्वामीजी, मुंडरगी संस्थानमठाचे अन्नदान स्वामीजी, शिवयोग मंदिर संस्थानचे अध्यक्ष व होस्पेट मठाधीश्‍वर ज. संगनबसव स्वामीजी आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशांतील सर्व पट्टाधिकारी व निरंजन मूर्ती उपस्थित होते. या सभेत ९ ठराव पारित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे:-

१. वीरशैव लिंगायत हा सनातन धर्म असून कोणीही कोणत्याही प्रकारे या धर्मामध्ये फूट पाडू नये याची गुरू व विरक्त महाराजांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.

२. कोणत्याही एका वर्गाला स्वतंत्र धर्माची मागणी करण्याचा अथवा घोषणा करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला नाही. ही कायदेशीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.

३. अखिल भारतीय वीरशैव महासभेने ‘वीरशैव लिंगायत एकच आहेत’ असा ठराव केला असून त्याचे ही सभा स्वागत करीत आहे.

४. वीरशैव लिंगायत हे उद्योगशील असल्यामुळे ते ७३ प्रकारचे विविध उद्योग करतात. त्यामुळे त्यांच्यात पोटभेद निर्माण झालेले आहेत. या सर्वांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून १२ ते १५ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावेत.

५. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात एक विद्यार्थी निलय स्थापन करून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची व भोजनाची सोय करण्यात यावी.

६. सार्वजनिक व शासकीय सेवांमध्ये यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. करणार्‍या वीरशैव लिंगायत विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे.

७. ज. पंचाचार्य, म. बसवेश्‍वर व हानगल कुमारस्वामीजी यांची जयंती गुरू व विरक्त स्वामीजींनी एकत्रितपणे वर्षातून एक दिवस मोठ्या प्रमाणात साजरी करावी.

८. वीरशैव लिंगायत धर्मातील विविध पोटजातींमधील गरजू व बद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरू व विरक्त स्वामीजींनी आर्थिक साहाय्य करावे. शक्य झाल्यास त्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे.

९. ४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बागलकोट, जि. बदामी) येथे भव्य मेळावा आयोजित करून वीरशैव व लिंगायत एकच आहेत याचा पुनरुच्चार करण्यात यावा.

वरील सर्व ठराव एकमताने पारित करण्यात आले.

***
बसववचनांचा सुलभ अनुवाद

बसवबोध


स्वाती साखरकर कराळे
एम०एस्सी०, एम०एड्०,  बी०ए० (मराठी)

घनगर्द भरलेलं आभाळ नेहमी अमृताचा वर्षाव करतं, तर जमिनीच्या उदरात असंख्य बीजं लपलेली असतात. पण अंकुर फुलतील कसे? आणि अशातच पावसाचा आभाळापासूनचा सुरू झालेला प्रवास जमिनीजवळ येऊन थांबतो अन् जमिनीच्या उदरातली बीजं अंकुरांतून फुलायला लागतात.

मानवी जीवनाचंही असंच आहे. त्याच्या अनाकलनीय अशा हृदयात अध्यात्माची, उत्सुकतेची, जाणिवेची अनेक बीजं निद्रावस्थेत असतात. पण संतवचनांचा अमृतस्पर्श एकदा का या बीजांना झाला की त्या स्पर्शाने  बीजांचे अमृतवेलीत रूपांतर होते. वीरशैव धर्मात संतांनी अनेक वचनांचे अमृतकुंभ जगाला भरभरून दिलेले आहेत. त्या अमृताचे थेंब सामान्यातून सामान्य जीवांपर्यंत पोहोचावे यासाठी तेवढ्याच आत्मीयतेने कार्य करणारे संतसाहित्यकार, अभ्यासक समाजात आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असावाच.

‘बसवबोध’ हे म० बसवेश्‍वरांच्या वचनांचे पुस्तक एखाद्या अमृतकुंभाप्रमाणे डॉ० इरेश स्वामी यांनी आपल्यासमोर आणले आहे. किती घ्यावं तेवढं कमीच, असा अनुभव प्रत्येकालाच हे शब्दरूपी अमृत प्राशन करताना येणार हे निश्‍चित!

बाराव्या शतकातील म० बसवेश्‍वरांची वचने सर्व जगाला आजच्या घडीला सुद्धा मार्ग दाखविणारी आहेत. चंदनाने कपाळ सुशोभित करताना नकळत माथ्यापर्यंत पोहोचलेली बोटंही सुगंधित होतात, असंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल. अध्यात्माचा सुगंध असलेली ही चंदनरूपी वचने सर्वांनाच सुगंधित करतील.
हे पुस्तक हाती आले आणि वाचता वाचता डॉ० स्वामी यांची या लेखनामागची सात्त्विक पार्श्‍वभूमी लक्षात आली की, संपूर्ण मानवजातीला मानवकल्याणाची, धर्माची, नैतिकतेची जाणीव या वचनांतून व्हावी. जगाला मानवकल्याणाचा मार्ग दाखविणारे, अध्यात्मातून विज्ञानवादाचे दर्शन घडविणारे, उच्चनीचता समूळ नष्ट व्हावी, स्त्रीपुरुष-समानतेचा गौरव व्हावा अशी उच्च विचारसरणी असलेले समाजातील आद्य प्रवर्तक म० बसवेश्‍वरांची वचने, त्यांचा मराठीत भावानुवाद व त्यावरील भाष्य या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.
धर्म म्हणजे काय, धर्माचं मूळ काय, शिकवण काय हे सहजतेने मांडणारे वचन...

दयविल्लद धर्मयावुदय्य । दयवे बेकु सर्व प्राणिगळल्लि ।
दयवे धर्मद मूलवय्य । कूडल संगय्यनंतल्लदोल्लनय्या॥

दया नसणारा तो धर्म कोणता, दया पाहिजे सर्व प्राण्यांविषयी,
दया धर्माचं मूळ आहे, दया नसेल तर कूडलसंगय्य कसा प्रसन्न होईल?
अशा वचनावर अनुवादानंतर डॉ० स्वामी यांनी केलेलं भाष्य सुरेख आहे.
शरणांच्या भालप्रदेशी शोभून दिसणारी विभूती हा शरणांचा सुरेख, स्वाभाविक अलंकारच. त्या विभूतीचे महत्त्व सांगणारे वचन...

नीरिगे नैदिलेये शृंगार । समुद्रक्के तेरेय शृंगार ॥
नारिगे गुणवे शृंगार । गगनक्के चंद्रमने शृंगार ॥
मानवजन्माचं उद्दिष्ट हे ईश्‍वर प्राप्त करून घेणं असलं पाहिजे. भौतिक सुख हे शाश्‍वत समाधान देत नाही, हे सांगताना म० बसवेश्‍वर म्हणतात...

समुद्रदोळगण सिंपिनंते बायि बिडुत्तिद्देनय्य
नीवल्लदे मत्तारु यन्नवरिल्ल नोडय्य
कूडलसंगमदेव
नीवल्लदोळ कोंबुवरिल्ल नोडय्य

अशी अनेक वचने या पुस्तकात वाचायला मिळतात. वचनांवर भाष्य करताना डॉ० स्वामींचं लेखन सहज मनाला भिडतं. भाष्य करताना डॉ० स्वामी स्वत: त्या वचनांशी किती समरस झाले याचा प्रत्यय वारंवार भाष्य वाचताना, त्यात दिलेल्या सामान्यांना पटेल अशा उदाहरणांवरून येतो. प्रत्येकापर्यंत भावार्थ पोहोचविण्याचा डॉ० स्वामींचा प्रयत्न खूपच प्रशंसनीय वाटतो. त्यातील सहजता मनाला भावणारी आहे.
‘बसवबोध’ हे पुस्तक सर्व वाचक-भक्तांचे प्रबोधन करणारे, त्यांच्या सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक जाणिवा प्रगल्भ करणारे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखणे, म० बसवेश्‍वरांच्या सुरेख, सात्त्विक रूपाचे दर्शन घडविणारे आहे.

या पुस्तकातील वचने, भावानुवाद, भाष्य यांतील शब्दांची, वाक्यांची मांडणी सुटसुटीत आहे. शेवटी समाविष्ट केलेला भाग- मंगळवेढा येथील बसव साहित्य संमेलनातील डॉ० इरेश स्वामी यांचे अध्यक्षीय भाषण, म० बसवेश्‍वरांची शिकवण, सुभाषिते इत्यादी सुद्धा प्रेरक आहे.

प्रत्येकाने वाचावे, संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. म० बसवेश्‍वरांच्या वचनांना समाजापर्यंत नेणार्‍या या कार्यासाठी डॉ० स्वामींचे शतदा आभार. त्यांच्या लेखनकार्यास शुभेच्छा!

बसवबोध
डॉ० इरेश सदाशिव स्वामी,
विविधा प्रकाशन,
‘विद्या’, १२, ब्रह्मचैतन्य नगर,
विजापूर रस्ता, सोलापूर ४१३ ००४
चरभाष ९३७१०९९५००

‘सिद्धराम माझा सखा बळिवंत’...

डॉ. शे. दे. पसारकर
विश्‍वस्त, 
श्रीसिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी, सोलापूर


१९७७ मध्ये मी सोलापुरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि चहुबाजूंनी पाण्यानं वेढलेलं सिद्धरामेश्‍वरांचं नयनरम्य मंदिर पाहून मी हरखून गेलो. त्याआधी वाशीमचं (वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म) दगडी चिर्‍यानं बांधलेलं पद्मतीर्थ आणि त्याच्या मध्यभागी स्तंभांवर तोल सावरत उभं असलेलं शिवालयच केवळ पाहिलेलं होतं. पण ते सिद्धेश्‍वरतळ्याच्या मानानं खूपच लहान. त्यानंतर पोथ्यापुराणांत अनेकवार उल्लेखिलेलं पंपासरोवर हंपीला गेल्यावर पाहिलं. ते नावाचं सरोवर, पण आकार मात्र लहानच. त्या मानानं सिद्धेश्‍वरतळं केवढं विशाल! त्या तळ्यावरून येणारा वाराही सर्वांग प्रफुल्लित करणारा, देह-मनावर अध्यात्मविचाराची पाखर घालणारा. ज्या योगिपुरुषानं हे देखणं वैभव या नगरीला प्रदान केलं त्याच्यासमोर मी मनोमन सहस्रवेळा नतमस्तक झालो. पुढं सिद्धरामांच्या चरित्राचा आणि वचनसाहित्याचा परिचय झाल्यावर तर माझं भावविश्‍व सिद्धरामांच्या भक्तिप्रेमानं भारून, उजळून गेलं आणि माझ्या लेखन-चिंतनाला त्यांच्या रूपानं एक विषय मिळाला. त्यांच्या गुणगानात माझी लेखणी रमू लागली. कविता, अभंग आणि विविध वृत्तछंदोबद्ध ‘सिद्धरामायण’ हे कथाकाव्य लेखणीतून प्रसवलं. सिद्धराम हे माझ्या भावविश्‍वाला असे व्यापून राहिले.
‘चंद्रसावली’ या कवितासंग्रहात सिद्धरामांवरील आठ कविता आणि सोळा अभंग समाविष्ट आहेत. महापुरुष युगायुगांतून कधीतरी एखाद्या वेळी जन्माला येत असतात. काळाची गरज असते त्यावेळी. त्यांची जन्मरीतही सामान्यांपेक्षा वेगळी असते. सुगलेच्या उदरात गर्भांकुर रुजण्याआधीच जगद्गुरू रेवणसिद्धांनी सिद्धरामजन्माचं भाकित वर्तवलं होतं, हे एक नवलच. साठ वर्षांच्या सुगलेच्या पदरात अभावितपणे पुत्रदान पडलं. ते केवळ पुत्रदान नव्हतं, तर ते जणू एका युगाचं दान होतं.

मुर्डी मुद्दय्याच्या घरी एक नवल घडले
त्याच्या पदरात दान एक युगाचे पडले
साठा वर्षांची सुगला कशी जहाली गर्भिणी
नियतीने भाळी तिच्या एक लिहिली कहाणी


नियतीनेच जणू तिच्या ललाटी एका नव्या युगाची कहाणी लिहून ठेवली होती. सिद्धरामांच्या रूपानं ते युग जन्माला आलं. जणू काळालाच एक सुरेख स्वप्न पडलं. त्यांच्या पदरवानं सोन्नलगीचा परिसर आध्यात्मिक चैतन्यानं भारून, बहरून गेला. सिद्धराम ही वात्सल्यमूर्तीच. त्यांच्या कृपाछत्राखाली अवघं गाव आबादीआबाद झालं. आजदेखील योगसमाधीत बसून ते आपल्या कृपेची पाखर भक्तभाविकांवर घालत आहेत.

एक आटपाट गाव नाव त्याचे सोन्नलगी
तेथे योगसमाधीत बैसला ग शिवयोगी
त्याच्या मिटल्या पापण्या आत भिजले अंतर
धरी गावावर सार्‍या माये, कृपेची पाखर


त्यांच्या मुखातून अशी वचनं झरली की ती हृदयी धरताच अवघे जन उद्धरून गेले. दुधावर जसा सायीचा दाट थर असतो तसं सिद्धरामांच्या ठायी वात्सल्य मूर्तिमंत वसलं आहे. ज्या गावाजवळून एकही नदी वाहत नाही त्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य किती असेल! त्या प्रज्ञापुरुषाच्या ते ध्यानात आलं अन् हाती कुदळ घेऊन आपल्या शिष्य-सहकार्‍यांसह त्यांनी प्रचंड तलाव खणून काढला. तो जेव्हा पाण्यानं तुडुंब भरला, त्यावेळी काय बरं घडलं असेल? गावातल्या कोरड्या विहिरींना झरे फुटले असतील. वृक्षवेलींची तहान भागून त्या अनिवार फोफावल्या असतील. वृक्षांच्या शाखाफांद्यांवरून पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट सुरू झाला असेल. गावाचं पर्यावरणच बदलून गेलं असणार. आयाबहिणींची पाण्यासाठी चाललेली वणवण थांबली असेल. असं खूप काही घडलं असणार. सिद्धरामांच्या अंतर्यामीची करुणाच जणू तळ्याच्या रूपानं प्रकटली.

कष्टणार्‍या हातांनीच झाला तलाव खणून
अंतर्यामीची करुणा गंगा राहिली होऊन
मग सगळ्यांचे ओठ आणि हृदये भिजली
सिद्धरामाच्या तपस्येने सुखे जनता झिजली


सिद्धरामांच्या दोन राबणार्‍या हातांकडे पाहून सहस्रावधी हात आपण होऊन पुढे आले आणि तळं खोदण्यासाठी राबले. प्रत्येकाला तलावातली मूठभर माती प्रसाद म्हणून सिद्धराम देत राहिले. अशी तलावाची माती घरोघरी पोहोचली अन् तळ्याशी अवघ्या गावाचं नातं दृढ झालं.

सोलापुरातील प्रत्येक माहेरवाशीण सिद्धरामांना आठवीतच सासरी जाते. तिथं रमतेही. पण संक्रातीचा सण जवळ आला की तिला ओढ लागते माहेरची. जर येणं जमलं नाही तर तिचं मन कातर होतं. मग आपल्या सखीजवळ ती आपलं मन मोकळं करते.

वाजे सनई चौघडा नभी घुमतो डिंडिम
माझ्या माहेरी नांदतो शिवयोगी सिद्धराम
कशी सांगू सखे, तुला माझ्या माहेरची रीत
तेथे राजा सिद्धराम करी जगावर प्रीत


बाई गं, तुला कसं कळेल बरं माझ्या माहेरचं मोठेपण? तिथं सिद्धरामांसारखा योगिपुरुष शांतपणे डोळे मिटून अवघ्या जगाचं कल्याणचिंतन करीत बसलेला आहे. आम्ही सारी त्याची लेकरं. जेव्हा दु:खं आम्हाला पोळतात तेव्हा त्याच्यासमोर जाऊन आम्ही नम्र होतो. त्यावेळी तोच आमचं सांत्वन करतो.

दु:खभारे कधी डोळे जरी लागलेत झरू
सिद्धरामाचा ग हात लागे पाठीवर फिरू
कधी संसारतापाने कुणी जाता उबगून
शांत करी सिद्धराम त्याला सावली होऊन


असं सावलीसारखं दाट अपरंपार सुखच सुख माझ्या माहेरी भरलेलं आहे. सिद्धरामांच्या कृपादृष्टीखाली सारं नगर वावरते आहे अन् घराघरांतून, मुखामुखांतून त्याचाच नामगजर होतो आहे. उघड्या डोळ्यांना तर त्याचं दर्शन घडतंच, पण डोळे मिटल्यावर अंत:चक्षूंसमोरही तोच उभा असतो.

दिठी पांघळून वळे आणि मिटता पापणी
आत चैतन्याचा गाभा दिसे सिद्धराम धनी
त्याच्या दर्शनाने सखे, दु:ख अवघे सरले
अहं-ममता विरून माझे मीपण नुरले!


माहेरवाशिणींच्याच नव्हे तर सोलापूर परिसरातल्या भक्तभाविकांच्या मनांत सिद्धराम असेच व्यापून राहिले आहेत. त्यांच्या रोमरोमांत सिद्धराम, दृष्टीपुढे सिद्धराम, कानावर नाद सिद्धराम, त्यांच्या भोवती दरवळतो सिद्धराम, वचनांतून सहज भेटतात सिद्धराम आणि काही काळापुरता त्यांच्या देहच होऊन जातो सिद्धराम... अशी त्यांची भावविभोर अवस्था होऊन जाते. सिद्धरामांच्या केवळ आठवाने इतकं परिवर्तन घडून येतं.

आज आठवला मनी शिवयोगी सिद्धराम
रोमरोमांतून जागा सिद्धराम सिद्धराम... 
घनव्याकुळ तळपे नभी प्रकाशाची रेखा
तसा दृष्टीपुढे उभा सिद्धराम सिद्धराम...
दर्पणात पाहू जाता हरपलो माझा मीच
आज देहच जहाला सिद्धराम सिद्धराम!


सिद्धराम केवळ मंदिरातच नाहीत, तर अवघ्या स्थिरचराला व्यापून राहिलेले आहेत. भक्तांची भावव्याकुळ दृष्टी जिथं जिथं पडते तिथं तिथं त्यांना सिद्धरामांचं दर्शन होतं. पावसाच्या धारांतून तोच नृत्य करताना दिसतो. हिरव्याकंच पानांवर त्याच्याच स्पर्शाची थरथर जाणवते. तळ्याच्या तरंगात तोच लहरताना दिसतो. कानाशी घोटाळणारा वारा त्यांचीच वचनं ऐकवतो.

तुझे सिद्धरामा सर्वत्र दर्शन।
फुलापानांतून सर्वकाळ ॥
रसात गंधात शब्दात स्पर्शात ।
तूच रे रूपात भरलासी ॥
व्यथा-वेदनेत आनंद-भोगात ।
मायाममतेत तूच तूच ॥


सिद्धरामा, तूच सर्वत्र व्यापून राहिलेला आहेस. तूच आत्मा आहेस अन् तूच विश्‍वात्मा आहेस. वृक्षाचं पान जसं पक्ष्यावर सावली धरतं तशी तू आपल्या भक्तांवर कृपेची सावली धरतोस. झरा अखंडपणे झुळझुळत राहतो तसं देवा, तुझं प्रेम भक्तांची मनं अविरत चिंब भिजवीत असतं. दु:खभारानं मोडून पडण्याची वेळ येईल त्यावेळी तुझाच आठव केला पाहिजे. उन्हात होरपळेल्या जिवाला वृक्षाच्या घनदाट छायेत जो विलक्षण शांतीचा अनुभव येतो तसा आम्हा दु:खार्तांना तुझ्या नामस्मरणानं विसावा मिळतो. तुझ्या नामात एवढं सामर्थ्य आहे की त्यामुळे दु:खाचे डोंगर वाहण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी येतं. तू कृपेचा सागर अन् दयेचं आगर आहेस. अडुसष्ट तीर्थे तुझ्या पायाजवळ राहतात. म्हणून केवळ ‘सिद्धराम’ अशी गर्जना केली तरी कळिकाळाच्या हृदयाला थरकाप सुटतो. सर्व सिद्धींचा ईश्‍वर असल्यामुळेच तर तुला ‘सिद्धेश्‍वर’ म्हणतात. म्हणूनच

भावभिजलेले मन। येथे यावे हो घेऊन॥
सिद्धरामापुढे नत। व्हावे अहंकारमुक्त॥
बसलेला भक्तांसाठी। योगिकुलचक्रवर्ती॥


अहंकारमुक्त होऊन त्याच्यापुढे नम्र झालं की सारे भवताप शीतल होऊन जातात. सिद्धरामांना असं पूर्ण समर्पण केलं की मग कसली चिंता उरत नाही. मग त्यानं उद्धार करावा किंवा संसारदु:खात खितपत पाडावं. हित करावं किंवा अनहित करावं. सुखानं भारून टाकावं किंवा दु:खात होरपळू द्यावं. त्याच्यापायी एकदा जीवन समर्पित केलं की त्यानं आपलं काहीही केलं तरी ते निमूटपणे मान्य करावं अन् निश्‍चिंत होऊन त्याला प्रणाम करून उद्घोष करावा-

सिद्धराम माझा सखा बळिवंत।
त्याच्या हाती हात दिला माझा ॥



***

वीरशैव मताचे प्राचीनत्व


(लिं०) पं० काशीनाथशास्त्री

पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या जनमेजय भूपालाने िंहमवत्केदार पीठाधिपती श्रीजगद्गुरू आनंदलिंग जंगम महास्वामींना एक अतिशय महत्त्वाचे दानशासन लिहून दिलेले उपलब्ध आहे. या दानशासनाचा मथितार्थ खालीलप्रमाणे आहे:-
‘श्रीमन्महाराजाधिराज हस्तिनापुरसिंहासनाधीश्वर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक जनमेजय भूपालांनी युधिष्ठिर शक ८९ प्लवंगनाम संवत्सर मार्गशीर्षमास अमावस्या सोमवार रोजी, श्री केदारक्षेत्रनिवासी उषामठाधीश श्रीगोस्वामी आनंदलिंग जंगम महास्वामींचे शिष्य ज्ञानलिंग जंगम स्वामीद्वारा आराधित श्रीकेदारनाथ देवाच्या पूजेसाठी मंदाकिनी क्षीरगंगा मधुगंगा स्वर्गद्वारगंगा सरस्वतीमंदकिनीसंगम या सीमेमध्ये असलेले श्रीकेदारक्षेत्र, निधिनिक्षेप जलपाषाण आगामी सिद्ध, साध्य तेजोवस्तू वगैरे स्वामित्वासह आमच्या मातापितरांना शिवलोकप्राप्ती व्हावी म्हणून श्रीकेदारेश्वरसमक्ष सूर्यग्रहणाचे वेळी सुवर्ण दक्षिणायुक्त गंगोदकासह महास्वामींच्या हाती दान केले. महाराजांनी केलेल्या या दानास सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, आकाश, भूमी, जल, मनुष्य, यम, दिवस, रात्र, दोन संधिकाल व धर्म हे साक्षी आहेत. ह्या दानाचा जे अपहार करतील ते साठ हजार वर्षेपर्यंत विष्ठेतील किडे होऊन राहतील. पण हे दान जे चालवतील त्यांना द्विगुणित फल मिळेल.’ 

कलियुगाच्या प्रारंभी जनमेजय राजा राज्य करीत होता, ही गोष्ट पुराणेतिहासप्रसिद्धच आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि परीक्षिताचा मुलगा राजा जनमेजय, असे महाभारतादी ग्रंथांत लिहिलेले आहे. वरील दानशासनात युधिष्ठिर शक ८९ प्लवंगसंवत्सरात दान केल्याचा उल्लेख केला असल्यामुळे हे शासन पाच हजार वर्षांचे जुने आहे, हे उघड आहे.
इतिहाससंशोधक म्हणून प्रसिद्ध असलेले रा०ब० पं० गौरीशंकर ओझा यांनी आपल्या भारतीय प्राचीनलिपिमाला नामक ग्रंथात कलिसंवत्ला ‘युधिष्ठिरसंवत्’ व भारतयुद्धसंवत्’ अशी नावे होती, असे सप्रमाण सिद्ध केले आहे. वरील शासनातील विषयाचे परीक्षण केल्यास पूर्वकाली हिमवत् केदारपीठाचे किती वैभव होते, ते स्पष्ट दिसून येते. जनमेजय राजाने दान केलेली समस्त भूमी पाच हजार वर्षांपासून केदार पीठाधिपतींच्याच स्वाधीन होती. या हद्दीत एक हजार गावे असून, त्याचे आधिपत्यही केदारपीठाधिपतीकडेच होते. श्रीगणेशलिंग जंगम महास्वामी पीठाधिपती असताना इंग्रज सरकारने पीठाची सर्व गावे काढून मात्र १४१ गावांचे उत्पन्न पीठाला नेमून दिले आहे.

याप्रमाणे भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या बारा ज्योति-र्लिंगांतील सर्वश्रेष्ठ अशा श्रीकेदारलिंगाची व हिमवत् केदारनाथ देवालयाची सर्व सत्ता अनादिकालापासून आजतागायत वीरशैव जगद्गुरूंच्याच हाती आहे. याशिवाय हिमालय प्रांतात अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तकाशी, गौरीकुंड, मध्यमेश्वर, त्रियुगी-नारायण, नारायणतीर्थ, कालीमठ, नालीभगवती, मैखंड, सोमद्वार वगैरे बावीस क्षेत्रांचे सर्वाधिकार केदारपीठाधिपतीकडेच अनादि-काळापासून आहेत. ही सर्व क्षेत्रे फार प्राचीन आहेत. त्यांचा महिमा व्यास महर्षींनी स्कंदपुराणातील केदारखंडांत विशेष वर्णिलेला आहे. या मठास ‘उषामठ’ हे नाव पडण्याचे कारण, विष्णुपुत्र अनिरुद्धाची प्रियतमा उषादेवी या गुरुस्थानात काही काळ राहिली होती व तिने हा मठ बांधला, हे आहे. हिमालय प्रांतात असलेल्या टेहरी संस्थानचे अधिपती या पीठाचे शिष्य आहेत. तसेच उदेपूर, काश्मीर, नेपाळ वगैरे तेरा देशांचे महाराजे या मठाचे शिष्य आहेत, व दरसाल बिनचूकपणे पीठाकडे नजराणा पाठवितात. ब्रिटिश सरकारनेही पीठाचे महत्त्व ओळखून हिंदुस्थानात कोठेही आडव्या पालखीतून मिरवण्यास, पंचकलश वगैरे बहात्तर बिरुदे वापरण्यास आणि वाटेल तितक्या बंदुका, पिस्तुले, तलवारी वगैरे हत्यारे वापरण्यास पीठाधिपतींना परवानगी दिली आहे, व श्रीना ‘रावल’ हा गौरवास्पद किताब दिला आहे. इतके राजाधिराजमान्य धर्मपीठ हिंदुस्थानात अन्यत्र नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. केदारपीठाची ही प्रशस्ती ऐकून कोणास बरे आनंद वाटणार नाही?
श्रीजगद्गुरू काशी सिंहासन मठालाही अनेक प्राचीन सनदा आहेत. त्यांमध्ये काशीनरेश जयनंददेवाने केलेले दानशासनच प्रमुख आहे. हे नरेश इ०स०च्या सहाव्या शतकात होऊन गेले. त्यावेळी विश्वाराध्य जगद्गुरू पीठाचे अधिकारी मल्लिकार्जुन शिवयोगी महास्वामी हे होते. त्यांना जयनंददेवाने गोचर भूमीचे दानपत्र करून दिले आहे.

ही गोचर भूमी विक्रमार्क संवत् ६३१ कार्तिक शुद्ध ११स दान दिल्याचा उल्लेख शासनपत्रात आहे. या शासनपत्रास आता साडेतेराशे वर्षे होऊन गेली. नेपाळ देशात काशीपीठाचा एक शाखामठ ‘जंगमवाडी मठ’ नावाने अजून विराजमान आहे. या मठाचे संरक्षण नेपाळच्या राजांनी फार प्राचीन काळापासून आजतागायत केले आहे. विश्वमल्ल नृपती नामक नेपाळ-नरेशाने या जंगमवाडी मठाला जहागिरी देऊन शिलालेख करून दिला आहे. तो खालीलप्रमाणे आहे:-

श्रीविश्वमल्लनृपतेर्गंगादेवी सुतौ सुषुवे।
त्रैलोक्यमल्लभूपस्रिभुवनमल्लश्च भूपालौ॥

श्री विश्वमल्ल राजाला गंगादेवीचे पोटी त्रैलोक्यमल्ल व त्रिभुवनमल्ल नामक दोन पुत्र झाले. याप्रमाणे अनेक श्लोकांतून आपला वंश व पराक्रम वर्णन करून पुढे

शैवप्रीतिमिमां च दैववशतो नष्टां पुन: सृष्टवान्।
सृष्टां चापि शिवार्पितां प्रतिदधे शैवागमाचारत:॥
शैवाचारकृत: शिवागमविधे: शैवा: शिवालम्बना:।
किं वा सन्ति न सन्ति हन्त जगति 
प्रख्यातसत्कीर्तये॥
किन्तु क्षान्तिविवेकशान्तिपरमानन्दैकवीरप्रभु-
र्वेदश्रीयुतमल्लिकार्जुनयति: शैवश्च तत्त्वं परम्॥

नेपाळचे राजे प्राचीन काळापासून शिवभक्त होते. पण दैववशात् विश्वमल्ल राजा शिवभक्तिहीन झाला. पुढे श्रीमल्लिकार्जुन महास्वामींनी शैवागम पद्धतीप्रमाणे या राजाला पुन्हा शिवभक्त बनविले. या महास्वामींची शांती, दांती, विवेक, वैराग्य वगैरे गुणावली पाहून विश्वमल्ल राजा भारून गेला, वगैरे आशयाचा वरील शिलालेख आहे. संस्कृत श्लोकांच्या खाली नेपाळी भाषेत काही महत्त्वाचा मजकूर लिहिलेला आहे. जयरुद्र मल्लदेव राजाने या जंगमवाडी मठास बरेच दान केले आहे, तरी पण यासमयी सुद्धा दोनशे प्रमाण भूमी त्याने आणखी दान केल्याचा उल्लेख करून ठेवला आहे. हे दानशासन विक्रम संवत् ६९२ ज्येष्ठ शुद्ध ८मीस करण्यात आले आहे. अर्थात्च ते आता तेराशे वर्षांचे जुने आहे. हा शिलालेख अजूनही नेपाळातील भातगावमध्ये आहे. या सर्व शिलालेखांचा विचार केल्यास प्राचीन काळचे राजेमहाराजे शिवभक्तिसंपन्न असून जगद्गुरू पंचाचार्य पीठांचे शिष्य होते, असे दिसून येते. तसेच रीवा, मैहर, मैसूर वगैरे देशांच्या महाराजांनीही काशीपीठास दान देऊन दानशासने लिहून दिली आहेत. हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, महंमदशहा वगैरे मोगल बादशहांनीही वीरशैव धर्मपीठाबद्दल भक्ती बाळगून जहागिरीच्या सनदा करून दिल्या आहेत व त्या अजून काशीपीठात आहेत. ंहिंदुधर्माचा वैरी औरंगजेब बादशहा काशीपीठावर चालून येत असता, या धर्मपीठाच्या प्रभावामुळे त्याला व त्याच्या सैन्याला खूप त्रास झाला. तेव्हा त्याचे धर्मवेड दूर होऊन त्याने मठाला जहागिरीची सनद करून दिली. ती सनद खालीलप्रमाणे आहे:-

‘मी जंगमवाडी मठाला गेल्याबरोबर तेथील मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे चमकू लागली. ती काळी असून तिचे डोळे प्रळयाग्नीप्रमाणे लाल होते. तिच्या मस्तकावर बकर्‍याच्या केसाप्रमाणे उभे रोमांच होते. ती मूर्ती लहान होती तरीही ती आकाशापर्यंत पोहोचलेली पाहून मी भ्यालो व मठाला शरण जाऊन मी इतके दान करीत आहे’, 
वगैरे उर्दू भाषेत लिहिले आहे.

वर दिलेल्या सनदांवरून वीरशैवाचार्यांच्या मूलपीठांचे प्राचीनत्व सिद्ध होते. या मूलधर्मपीठांच्या शाखामठांतूनही अनेक प्राचीन शिलालेख सापडतात. शिलालेखांचे संशोधन करण्यात प्रसिद्धीस आलेले मि० रैस साहेब यांनी आपल्या चूीेीश खपीलीळिींळेपी नामक पुस्तकात जिल्हा सिमोगा तालुका शिकारपूरमधील बेळगावी गावात सापडलेल्या शासनांचा उल्लेख केलेला आहे. त्या गावात १. हिरेमठ, २. पंचलिंगनमठ, ३. त्रिपुरांतकमठ, ४. वामशक्तिमठ व ५ कोडियमठ असे पाच मठ असून इ०स० १०५४ मध्ये पहिल्या तीन मठांचे अधिकारी अनुक्रमे १. मूळिग मधुकेश्वर पंडित, २. सर्वेश्वर पंडितदेव व ३. ज्ञानशक्तिदेव नामक होते. पुढे इ०स० १११२ मध्ये शांतिशिव पंडित, शक्तिपंडित, क्रियाशक्ती पंडित नामक मठाधिपती होते. चौथ्या वामशक्ती मठात इ०स० ११२९ मध्ये सोमेश्वरय्या व विद्याभरणय्या असे दोन माहेश्वर असून पाचव्या कोडियमठात श्रीकंठ शिवयोगी नामक स्वामी होते. त्यांचा कंठ नेहमी वेदवाक्यांनी अलंकृत असे. ते सदा शिवध्यानात मग्न असत. ते मोठे तपस्वी व सर्वगुणसंपन्न असून तर्क-शास्त्रनिपुण होते. त्यांना सोमेश्वरय्या नामक शिष्य असून ते यमनियमादी योगशास्त्रक्रियेत निपुण होते. त्यांचे शिष्य मल्लिकार्जुनाचार्य इ०स० १११२ मध्ये होऊन गेले. त्यांनीच हा लेख आपल्या गुरुपरंपरेच्या सन्मानासाठी लिहिला, असा उल्लेख वरील शासनात आहे. या शासनातील नावे पाहिली असता प्राचीन काळी गुरुवर्गात कसे जाडे विद्वान होते व त्यांचे मठ कसे वैभवशाली होते, ते दिसून येते.

इ०स० १८७५ साली प्रसिद्ध झालेल्या बॉम्बे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या अकराव्या रिपोर्टात दोनशे सत्तावीस पानांपासून दोनशे सत्त्याहत्तर पानांपर्यंत जे कन्नड ताम्रपट छापले आहेत, त्यामधील एकात चावुंडराज, त्याची राणी महादेवी व पेर्मडी नामक सिंधू वंशाच्या राजाची माहिती दिलेली आहे. त्यांना ‘शिवागमसमाकर्णनकर्णपूररु’ असे विशेषण लिहिले आहे. त्यांनी नीलकंठ पंडित देव नामक माहेश्वरांना लिंगमुद्रांकित भूमी दान दिल्याचे खालील ताम्रशासनात आहे:-

सर्वसमस्यवागि बिट्ट भूमियस्थलं। मुदमोळलदारियं बडगणवयवलदिं। तेंकणवासिगावुंडन बळदिं। उत्तरमूवत्तारक्के लिंगमुं तपोधनरुं। कवितेयुं बेरसुमाडि।

असे कन्नडमध्ये लिहिले आहे. या ताम्रपटात नीलकंठ देवनामक माहेश्वरांना भूदान केलेले आहे. भूदान करणारा पेर्मडी राजा इ०स० ९५० मध्ये राज्य करीत होता, असे वरील शासनावरूनच दिसून येते. चवथ्या शासनात, 

भस्मोद्धूळितगात्ररुं, कौपीनजिनरुं, रुद्राक्षमालाधररुं, वातुलागमसयसमुद्धाररुं, जंगमलिंगावताररुं

असे कोरलेले असून सर्वेश्वर नामक माहेश्वर पंडितांना भूमिदान केल्याचा त्यात उल्लेख आहे. अशा तर्‍हेचे अनेक शिलालेख व ताम्रपट ठिकठिकाणी सापडतात. प्राचीन काळी गुरुवर्गाचे मठाधिकारी राजेमहाराजांना आपले शिष्य बनवून त्यांच्याकडून गुरुदक्षिणा व भूमिदान मिळवून जगद्वंद्य होत असत.

येथपर्यंत आम्ही अनेक आधार देऊन वीरशैव मताचे प्राचीनत्व सिद्ध केले. आता या मताच्या प्राचीन ग्रंथांचे बाबतीत आम्ही संक्षेपाने विवरण करणार आहोत. वीरशैवाचार्य वीरशैव पंडितांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहेत. श्रीजगद्गुरू पंचाचार्यांनी भूलोकावर वीरशैव मताची प्रस्थापना करून वीरशैवसिद्धान्त सर्वांना कळावा म्हणून त्यांनी शिवसूत्र, ब्रह्मसूत्र व उपनिषदादी ग्रंथांवर भाष्ये रचली. ही भाष्ये रेणुकभाष्य, दारुकभाष्य, एकोरामभाष्य, पंडितभाष्य व विश्वाराध्यभाष्य या नावांनी प्रसिद्ध आहेत. अशी लोकोत्तर भाष्ये रचून पूज्यपाद पंचाचार्यांनी प्राचीन काळी वीरशैवमताला श्रेष्ठत्व आणून दिले असले तरी दुर्दैवाने हल्ली त्यांचे एकही भाष्य उपलब्ध नाही. महा-नारायणोपनिषदाला भाष्य लिहिलेले वृषभ पंडिताराध्य यांनी अकराव्या अनुवाकातील ‘सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभुवम्’ वगैरे मंत्रावर भाष्य करताना श्रीरेणुकादी पंचाचार्यांच्या भाष्यांचा अभिप्राय थोडक्यात दाखवून दिला आहे. एवढ्यावरच आम्हाला तूर्त संतोष मानण्याची पाळी आली आहे. याच वृषभपंडिताराध्यांनी तैत्तिरीय उपनिषदावर केलेल्या भाष्यात खालील श्लोक दिला आहे:-

वेदव्यास सूत्रकारं दूर्वासं वृत्तिकारकम्।
भाष्यकृत्पण्डिताराध्यं प्रपद्ये पाशमुक्तये॥

या श्लोकांत ब्रह्मसूत्र रचणारे व्यासमुनी, सूत्रावर भाष्य करणारे पंडिताराध्य व वृत्ती लिहिणारे दूर्वासऋषी यांना संसारपाशबंधमुक्तीसाठी शरण जातो, असे लिहिले आहे. हा मंगलाचरणाचा श्लोक आहे. यावरून पंडिता-राध्यांनी लिहिलेले भाष्य सर्वोत्तम व सर्वप्रसिद्ध होते असे दिसून येते.

पूज्यपाद पंचाचार्यांनी लिहिलेली भाष्ये जरी अजून आम्हास मिळाली नाहीत, तरी ती ठिकठिकाणच्या ग्रंथभांडारांतून आहेत, असे कळते. ही भाष्ये आंध्र प्रदेशातून आराध्य ब्राह्मणांच्या घरी विशेष करून आहेत. सिकंदरा-बादच्या मार्कंडेय शास्त्री महाशयांच्या घरातील लायब्ररीचे यादीत श्रीरेणुकभाष्य व श्रीदारुकदिग्विजय हे दोन ग्रंथ दिसून येतात. बर्लिन येथील पुस्तकालयात श्रीरेणुकभाष्य आहे अशी वंदता आहे. ही भाष्ये जेव्हा आपल्या हाती येतील तेव्हा वीरशैवमताला सौभाग्य प्राप्त झाले, असे म्हणता येईल. श्रीपती पंडितांनी ब्रह्मसूत्रावर लिहिलेले श्रीकरभाष्य हल्ली उपलब्ध झाले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्रावर भाष्य करताना श्रीपती पंडित लिहितात:-

समन्वयसूत्रे एकोरामसिद्धभगवत्पादाचार्यै: 
श्रोतव्य इत्यत्र आत्मज्ञानविधिर्निराकृत:।

यावरून त्यांनी श्रीजगद्गुरू एकोराम शिवाचार्यांनी लिहिलेल्या ‘तत्तु समन्वयात्’ या ब्रह्मसूत्रावरील भाष्याचा अभिप्राय व्यक्त केला व त्यामुळे हे सिद्ध झाले की, आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्ये लिहिली. आचार्यांनीच काय पण त्यांचा उपदेश घेऊन शिवज्ञान-संपन्न झालेल्या अगस्ती वगैरे महर्षींनी वीरशैवसिद्धान्तपर ग्रंथ लिहिलेले आहेत. श्रीकरभाष्यावरूनच असे कळून येते की अगस्ती महर्षींनी ब्रह्मसूत्रावर वीरशैवसिद्धान्तपर वृत्ती लिहिली आहे. श्रीपती पंडितांनी आपल्या भाष्यग्रंथारंभी लिहिले आहे:-

अगस्त्यमुनिचन्द्रेण कृतां वैयासिकीं शुभाम्।
सूत्रवृत्तिं समालोक्य कृतं भाष्यं शिवंकरम्॥

म्हणजे अगस्तिमहर्षींनी लिहिलेल्या व्यासकृत ब्रह्म-सूत्रावरील वृत्तीच्या आधारानेच हे भाष्य रचलेले आहे, अगस्तिकृत हा वृत्तिग्रंथ हल्ली कुंभकोणम् येथे प्रसिद्ध झाला आहे. श्रीजगद्गुरू विश्वकर्ण शिवाचार्य महास्वामींकडून शिवसिद्धान्त उपदेश घेऊन ज्ञानसंपन्न झालेल्या दुर्वास महर्षींनी लिहिलेली वृत्ती अजूनपर्यंत कोठेही उपलब्ध झालेली नाही. लोकोत्तर कीर्तिशाली असलेल्या या महर्षींनी लिहिलेली वृत्तीसुद्धा असामान्य असली पाहिजे, असा तर्क करण्यास मुळीच हरकत नाही.

नंदिकेश्वर शिवाचार्यांनी शिवाच्या डमरूतून निर्माण झालेल्या अ, इ, उ, ण् वगैरे चौदा सूत्रांवर शिवसिद्धान्तपर ‘वृत्ती’ लिहिली आहे. ही चतुर्दशसूत्रे केवळ शिवाद्वैत-सिद्धान्तपर असून सनकादी महर्षींचा उद्धार करण्यासाठीच शिवाने उत्पन्न केली आहेत, असा उल्लेख सापडतो. नंदिकेश्वर शिवाचार्यांनी लिहिलेल्या या शिवाद्वैतवृत्तीला उपमन्यू शिवाचार्यांनी भारदस्त टीका लिहिली आहे. ती नंदिकेश्वर-कारिका या नावाने प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ लहान असला तरी त्याची योग्यता फार मोठी आहे. हा ग्रंथ काशीक्षेत्र-निवासी वीरशैवेतर पंडितांनीच चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी छापून प्रसिद्ध केला आहे. याशिवाय गुरुवंशोद्भव अनेक पंडितांनी अन्य मतीयांशी वादविवाद करून अनेक ग्रंथ रचलेले आहेत. परमतकालानल शिवाचार्य व परवादी भयंकर शिवाचार्य यांनी आद्य शंकराचार्याबरोबर वादविवाद केला असे शंकरविजयादी ग्रंथांवरून कळून येते. नीलकंठ शिवाचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. कालहस्ती शिवाचार्यांनी उपनिषदांवर लिंगधारणपर भाष्य रचले, असे लिंगधारणचंद्रिका नामक ग्रंथावरून कळून येते.

वरील सर्व प्रमाणे पाहता वीरशैवमताच्या प्राचीनत्वाची कल्पना येऊ शकेल.
***
(‘वीरशैवरत्न’ या ग्रंथातील संपादित केलेला लेख)
***