बेंगळुरू येथील धर्मसमन्वय सभेत ज. पंचाचार्य व विरक्त धर्मगुरूंचा एकमुखाने उच्चार
लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैव धर्माचेच पर्यायनाम
बेंगळुरू, दि. २३-
येथील विजयनगरमधील म. बसवेश्वर सुज्ञानमंटपामध्ये जगद्गुरू पंचाचार्य आणि निरंजन पीठाचे होस्पेट व मुंडरगी येथील दोन जगद्गुरू आणि ५०० पेक्षा अधिक शिवाचार्य व निरंजनमूर्ती यांनी एकत्र विचार करून वीरशैव लिंगायत हे वेगवेगळे नसून ते एकच आहेत आणि लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैवधर्माचेच एक पर्यायनाम आहे, या विचाराचा एकमताने पुरस्कार केला. या सभेत श्रीरंभापुरी जगद्गुरू, प्रसन्नरेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीउज्जयिनी जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे सान्निध्यस्थानी विराजमान होते.
काही लोक वीरशैव आणि लिंगायत असा भेद करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा डाव वीरशैव लिंगायत समाजाने नीट समजून घेतला पाहिजे. वीरशैव व लिंगायत हे वेगळे नसून एका नाण्याच्याच त्या दोन बाजू आहेत. आपण सर्व एकच आहोत ही भावना प्रबळ असली पाहिजे. ज. पंचाचार्यांनी या धर्माची
स्थापना केली असून म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात वीरशैव धर्मदीक्षा घेऊन या धर्माचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण वचनसाहित्यात एकाही ठिकाणी ‘लिंगायत’ या शब्दाचा उच्चार केलेला नाही. त्यांनी ‘वीरशैव’ हाच शब्द सर्वत्र योजिलेला आहे. ‘मी आधी शैव होतो, आता वीरशैव झालो’ असे एका वचनात स्वत: म. बसवेश्वरांनी म्हटले आहे. अशा म. बसवेश्वरांनाच धर्मसंस्थापक ठरविण्याचा प्रयत्न काही लोक राजकीय हेतूसाठी करीत आहेत. हे कदापि शक्य होणार नाही, असे विचार या सभेत जगद्गुरू पंचाचार्य व सर्व शिवाचार्य यांनी व्यक्त केले.४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बदामी, जि. बागलकोट) येथे सर्व गुरू आणि विरक्त मठाधिपती लक्षावधी उपस्थित भक्तांसमोर वीरशैव लिंगायत एकत्वाचा उच्चार करणार आहेत. या कार्यक्रमात पंचपीठांच्या जगद्गुरूंशिवाय बेंगळुरू कोळ्ळद मठाचे शांतवीर स्वामीजी, मुंडरगी संस्थानमठाचे अन्नदान स्वामीजी, शिवयोग मंदिर संस्थानचे अध्यक्ष व होस्पेट मठाधीश्वर ज. संगनबसव स्वामीजी आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशांतील सर्व पट्टाधिकारी व निरंजन मूर्ती उपस्थित होते. या सभेत ९ ठराव पारित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे:-
१. वीरशैव लिंगायत हा सनातन धर्म असून कोणीही कोणत्याही प्रकारे या धर्मामध्ये फूट पाडू नये याची गुरू व विरक्त महाराजांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.
२. कोणत्याही एका वर्गाला स्वतंत्र धर्माची मागणी करण्याचा अथवा घोषणा करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला नाही. ही कायदेशीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.
३. अखिल भारतीय वीरशैव महासभेने ‘वीरशैव लिंगायत एकच आहेत’ असा ठराव केला असून त्याचे ही सभा स्वागत करीत आहे.
४. वीरशैव लिंगायत हे उद्योगशील असल्यामुळे ते ७३ प्रकारचे विविध उद्योग करतात. त्यामुळे त्यांच्यात पोटभेद निर्माण झालेले आहेत. या सर्वांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून १२ ते १५ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावेत.
५. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात एक विद्यार्थी निलय स्थापन करून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची व भोजनाची सोय करण्यात यावी.
६. सार्वजनिक व शासकीय सेवांमध्ये यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. करणार्या वीरशैव लिंगायत विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे.
७. ज. पंचाचार्य, म. बसवेश्वर व हानगल कुमारस्वामीजी यांची जयंती गुरू व विरक्त स्वामीजींनी एकत्रितपणे वर्षातून एक दिवस मोठ्या प्रमाणात साजरी करावी.
८. वीरशैव लिंगायत धर्मातील विविध पोटजातींमधील गरजू व बद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरू व विरक्त स्वामीजींनी आर्थिक साहाय्य करावे. शक्य झाल्यास त्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे.
९. ४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बागलकोट, जि. बदामी) येथे भव्य मेळावा आयोजित करून वीरशैव व लिंगायत एकच आहेत याचा पुनरुच्चार करण्यात यावा.
वरील सर्व ठराव एकमताने पारित करण्यात आले.
***
No comments:
Post a Comment