Saturday, August 26, 2017

वीरशैव मताचे प्राचीनत्व


(लिं०) पं० काशीनाथशास्त्री

पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या जनमेजय भूपालाने िंहमवत्केदार पीठाधिपती श्रीजगद्गुरू आनंदलिंग जंगम महास्वामींना एक अतिशय महत्त्वाचे दानशासन लिहून दिलेले उपलब्ध आहे. या दानशासनाचा मथितार्थ खालीलप्रमाणे आहे:-
‘श्रीमन्महाराजाधिराज हस्तिनापुरसिंहासनाधीश्वर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक जनमेजय भूपालांनी युधिष्ठिर शक ८९ प्लवंगनाम संवत्सर मार्गशीर्षमास अमावस्या सोमवार रोजी, श्री केदारक्षेत्रनिवासी उषामठाधीश श्रीगोस्वामी आनंदलिंग जंगम महास्वामींचे शिष्य ज्ञानलिंग जंगम स्वामीद्वारा आराधित श्रीकेदारनाथ देवाच्या पूजेसाठी मंदाकिनी क्षीरगंगा मधुगंगा स्वर्गद्वारगंगा सरस्वतीमंदकिनीसंगम या सीमेमध्ये असलेले श्रीकेदारक्षेत्र, निधिनिक्षेप जलपाषाण आगामी सिद्ध, साध्य तेजोवस्तू वगैरे स्वामित्वासह आमच्या मातापितरांना शिवलोकप्राप्ती व्हावी म्हणून श्रीकेदारेश्वरसमक्ष सूर्यग्रहणाचे वेळी सुवर्ण दक्षिणायुक्त गंगोदकासह महास्वामींच्या हाती दान केले. महाराजांनी केलेल्या या दानास सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, आकाश, भूमी, जल, मनुष्य, यम, दिवस, रात्र, दोन संधिकाल व धर्म हे साक्षी आहेत. ह्या दानाचा जे अपहार करतील ते साठ हजार वर्षेपर्यंत विष्ठेतील किडे होऊन राहतील. पण हे दान जे चालवतील त्यांना द्विगुणित फल मिळेल.’ 

कलियुगाच्या प्रारंभी जनमेजय राजा राज्य करीत होता, ही गोष्ट पुराणेतिहासप्रसिद्धच आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि परीक्षिताचा मुलगा राजा जनमेजय, असे महाभारतादी ग्रंथांत लिहिलेले आहे. वरील दानशासनात युधिष्ठिर शक ८९ प्लवंगसंवत्सरात दान केल्याचा उल्लेख केला असल्यामुळे हे शासन पाच हजार वर्षांचे जुने आहे, हे उघड आहे.
इतिहाससंशोधक म्हणून प्रसिद्ध असलेले रा०ब० पं० गौरीशंकर ओझा यांनी आपल्या भारतीय प्राचीनलिपिमाला नामक ग्रंथात कलिसंवत्ला ‘युधिष्ठिरसंवत्’ व भारतयुद्धसंवत्’ अशी नावे होती, असे सप्रमाण सिद्ध केले आहे. वरील शासनातील विषयाचे परीक्षण केल्यास पूर्वकाली हिमवत् केदारपीठाचे किती वैभव होते, ते स्पष्ट दिसून येते. जनमेजय राजाने दान केलेली समस्त भूमी पाच हजार वर्षांपासून केदार पीठाधिपतींच्याच स्वाधीन होती. या हद्दीत एक हजार गावे असून, त्याचे आधिपत्यही केदारपीठाधिपतीकडेच होते. श्रीगणेशलिंग जंगम महास्वामी पीठाधिपती असताना इंग्रज सरकारने पीठाची सर्व गावे काढून मात्र १४१ गावांचे उत्पन्न पीठाला नेमून दिले आहे.

याप्रमाणे भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या बारा ज्योति-र्लिंगांतील सर्वश्रेष्ठ अशा श्रीकेदारलिंगाची व हिमवत् केदारनाथ देवालयाची सर्व सत्ता अनादिकालापासून आजतागायत वीरशैव जगद्गुरूंच्याच हाती आहे. याशिवाय हिमालय प्रांतात अतिशय प्रसिद्ध असलेली गुप्तकाशी, गौरीकुंड, मध्यमेश्वर, त्रियुगी-नारायण, नारायणतीर्थ, कालीमठ, नालीभगवती, मैखंड, सोमद्वार वगैरे बावीस क्षेत्रांचे सर्वाधिकार केदारपीठाधिपतीकडेच अनादि-काळापासून आहेत. ही सर्व क्षेत्रे फार प्राचीन आहेत. त्यांचा महिमा व्यास महर्षींनी स्कंदपुराणातील केदारखंडांत विशेष वर्णिलेला आहे. या मठास ‘उषामठ’ हे नाव पडण्याचे कारण, विष्णुपुत्र अनिरुद्धाची प्रियतमा उषादेवी या गुरुस्थानात काही काळ राहिली होती व तिने हा मठ बांधला, हे आहे. हिमालय प्रांतात असलेल्या टेहरी संस्थानचे अधिपती या पीठाचे शिष्य आहेत. तसेच उदेपूर, काश्मीर, नेपाळ वगैरे तेरा देशांचे महाराजे या मठाचे शिष्य आहेत, व दरसाल बिनचूकपणे पीठाकडे नजराणा पाठवितात. ब्रिटिश सरकारनेही पीठाचे महत्त्व ओळखून हिंदुस्थानात कोठेही आडव्या पालखीतून मिरवण्यास, पंचकलश वगैरे बहात्तर बिरुदे वापरण्यास आणि वाटेल तितक्या बंदुका, पिस्तुले, तलवारी वगैरे हत्यारे वापरण्यास पीठाधिपतींना परवानगी दिली आहे, व श्रीना ‘रावल’ हा गौरवास्पद किताब दिला आहे. इतके राजाधिराजमान्य धर्मपीठ हिंदुस्थानात अन्यत्र नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. केदारपीठाची ही प्रशस्ती ऐकून कोणास बरे आनंद वाटणार नाही?
श्रीजगद्गुरू काशी सिंहासन मठालाही अनेक प्राचीन सनदा आहेत. त्यांमध्ये काशीनरेश जयनंददेवाने केलेले दानशासनच प्रमुख आहे. हे नरेश इ०स०च्या सहाव्या शतकात होऊन गेले. त्यावेळी विश्वाराध्य जगद्गुरू पीठाचे अधिकारी मल्लिकार्जुन शिवयोगी महास्वामी हे होते. त्यांना जयनंददेवाने गोचर भूमीचे दानपत्र करून दिले आहे.

ही गोचर भूमी विक्रमार्क संवत् ६३१ कार्तिक शुद्ध ११स दान दिल्याचा उल्लेख शासनपत्रात आहे. या शासनपत्रास आता साडेतेराशे वर्षे होऊन गेली. नेपाळ देशात काशीपीठाचा एक शाखामठ ‘जंगमवाडी मठ’ नावाने अजून विराजमान आहे. या मठाचे संरक्षण नेपाळच्या राजांनी फार प्राचीन काळापासून आजतागायत केले आहे. विश्वमल्ल नृपती नामक नेपाळ-नरेशाने या जंगमवाडी मठाला जहागिरी देऊन शिलालेख करून दिला आहे. तो खालीलप्रमाणे आहे:-

श्रीविश्वमल्लनृपतेर्गंगादेवी सुतौ सुषुवे।
त्रैलोक्यमल्लभूपस्रिभुवनमल्लश्च भूपालौ॥

श्री विश्वमल्ल राजाला गंगादेवीचे पोटी त्रैलोक्यमल्ल व त्रिभुवनमल्ल नामक दोन पुत्र झाले. याप्रमाणे अनेक श्लोकांतून आपला वंश व पराक्रम वर्णन करून पुढे

शैवप्रीतिमिमां च दैववशतो नष्टां पुन: सृष्टवान्।
सृष्टां चापि शिवार्पितां प्रतिदधे शैवागमाचारत:॥
शैवाचारकृत: शिवागमविधे: शैवा: शिवालम्बना:।
किं वा सन्ति न सन्ति हन्त जगति 
प्रख्यातसत्कीर्तये॥
किन्तु क्षान्तिविवेकशान्तिपरमानन्दैकवीरप्रभु-
र्वेदश्रीयुतमल्लिकार्जुनयति: शैवश्च तत्त्वं परम्॥

नेपाळचे राजे प्राचीन काळापासून शिवभक्त होते. पण दैववशात् विश्वमल्ल राजा शिवभक्तिहीन झाला. पुढे श्रीमल्लिकार्जुन महास्वामींनी शैवागम पद्धतीप्रमाणे या राजाला पुन्हा शिवभक्त बनविले. या महास्वामींची शांती, दांती, विवेक, वैराग्य वगैरे गुणावली पाहून विश्वमल्ल राजा भारून गेला, वगैरे आशयाचा वरील शिलालेख आहे. संस्कृत श्लोकांच्या खाली नेपाळी भाषेत काही महत्त्वाचा मजकूर लिहिलेला आहे. जयरुद्र मल्लदेव राजाने या जंगमवाडी मठास बरेच दान केले आहे, तरी पण यासमयी सुद्धा दोनशे प्रमाण भूमी त्याने आणखी दान केल्याचा उल्लेख करून ठेवला आहे. हे दानशासन विक्रम संवत् ६९२ ज्येष्ठ शुद्ध ८मीस करण्यात आले आहे. अर्थात्च ते आता तेराशे वर्षांचे जुने आहे. हा शिलालेख अजूनही नेपाळातील भातगावमध्ये आहे. या सर्व शिलालेखांचा विचार केल्यास प्राचीन काळचे राजेमहाराजे शिवभक्तिसंपन्न असून जगद्गुरू पंचाचार्य पीठांचे शिष्य होते, असे दिसून येते. तसेच रीवा, मैहर, मैसूर वगैरे देशांच्या महाराजांनीही काशीपीठास दान देऊन दानशासने लिहून दिली आहेत. हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, महंमदशहा वगैरे मोगल बादशहांनीही वीरशैव धर्मपीठाबद्दल भक्ती बाळगून जहागिरीच्या सनदा करून दिल्या आहेत व त्या अजून काशीपीठात आहेत. ंहिंदुधर्माचा वैरी औरंगजेब बादशहा काशीपीठावर चालून येत असता, या धर्मपीठाच्या प्रभावामुळे त्याला व त्याच्या सैन्याला खूप त्रास झाला. तेव्हा त्याचे धर्मवेड दूर होऊन त्याने मठाला जहागिरीची सनद करून दिली. ती सनद खालीलप्रमाणे आहे:-

‘मी जंगमवाडी मठाला गेल्याबरोबर तेथील मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे चमकू लागली. ती काळी असून तिचे डोळे प्रळयाग्नीप्रमाणे लाल होते. तिच्या मस्तकावर बकर्‍याच्या केसाप्रमाणे उभे रोमांच होते. ती मूर्ती लहान होती तरीही ती आकाशापर्यंत पोहोचलेली पाहून मी भ्यालो व मठाला शरण जाऊन मी इतके दान करीत आहे’, 
वगैरे उर्दू भाषेत लिहिले आहे.

वर दिलेल्या सनदांवरून वीरशैवाचार्यांच्या मूलपीठांचे प्राचीनत्व सिद्ध होते. या मूलधर्मपीठांच्या शाखामठांतूनही अनेक प्राचीन शिलालेख सापडतात. शिलालेखांचे संशोधन करण्यात प्रसिद्धीस आलेले मि० रैस साहेब यांनी आपल्या चूीेीश खपीलीळिींळेपी नामक पुस्तकात जिल्हा सिमोगा तालुका शिकारपूरमधील बेळगावी गावात सापडलेल्या शासनांचा उल्लेख केलेला आहे. त्या गावात १. हिरेमठ, २. पंचलिंगनमठ, ३. त्रिपुरांतकमठ, ४. वामशक्तिमठ व ५ कोडियमठ असे पाच मठ असून इ०स० १०५४ मध्ये पहिल्या तीन मठांचे अधिकारी अनुक्रमे १. मूळिग मधुकेश्वर पंडित, २. सर्वेश्वर पंडितदेव व ३. ज्ञानशक्तिदेव नामक होते. पुढे इ०स० १११२ मध्ये शांतिशिव पंडित, शक्तिपंडित, क्रियाशक्ती पंडित नामक मठाधिपती होते. चौथ्या वामशक्ती मठात इ०स० ११२९ मध्ये सोमेश्वरय्या व विद्याभरणय्या असे दोन माहेश्वर असून पाचव्या कोडियमठात श्रीकंठ शिवयोगी नामक स्वामी होते. त्यांचा कंठ नेहमी वेदवाक्यांनी अलंकृत असे. ते सदा शिवध्यानात मग्न असत. ते मोठे तपस्वी व सर्वगुणसंपन्न असून तर्क-शास्त्रनिपुण होते. त्यांना सोमेश्वरय्या नामक शिष्य असून ते यमनियमादी योगशास्त्रक्रियेत निपुण होते. त्यांचे शिष्य मल्लिकार्जुनाचार्य इ०स० १११२ मध्ये होऊन गेले. त्यांनीच हा लेख आपल्या गुरुपरंपरेच्या सन्मानासाठी लिहिला, असा उल्लेख वरील शासनात आहे. या शासनातील नावे पाहिली असता प्राचीन काळी गुरुवर्गात कसे जाडे विद्वान होते व त्यांचे मठ कसे वैभवशाली होते, ते दिसून येते.

इ०स० १८७५ साली प्रसिद्ध झालेल्या बॉम्बे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या अकराव्या रिपोर्टात दोनशे सत्तावीस पानांपासून दोनशे सत्त्याहत्तर पानांपर्यंत जे कन्नड ताम्रपट छापले आहेत, त्यामधील एकात चावुंडराज, त्याची राणी महादेवी व पेर्मडी नामक सिंधू वंशाच्या राजाची माहिती दिलेली आहे. त्यांना ‘शिवागमसमाकर्णनकर्णपूररु’ असे विशेषण लिहिले आहे. त्यांनी नीलकंठ पंडित देव नामक माहेश्वरांना लिंगमुद्रांकित भूमी दान दिल्याचे खालील ताम्रशासनात आहे:-

सर्वसमस्यवागि बिट्ट भूमियस्थलं। मुदमोळलदारियं बडगणवयवलदिं। तेंकणवासिगावुंडन बळदिं। उत्तरमूवत्तारक्के लिंगमुं तपोधनरुं। कवितेयुं बेरसुमाडि।

असे कन्नडमध्ये लिहिले आहे. या ताम्रपटात नीलकंठ देवनामक माहेश्वरांना भूदान केलेले आहे. भूदान करणारा पेर्मडी राजा इ०स० ९५० मध्ये राज्य करीत होता, असे वरील शासनावरूनच दिसून येते. चवथ्या शासनात, 

भस्मोद्धूळितगात्ररुं, कौपीनजिनरुं, रुद्राक्षमालाधररुं, वातुलागमसयसमुद्धाररुं, जंगमलिंगावताररुं

असे कोरलेले असून सर्वेश्वर नामक माहेश्वर पंडितांना भूमिदान केल्याचा त्यात उल्लेख आहे. अशा तर्‍हेचे अनेक शिलालेख व ताम्रपट ठिकठिकाणी सापडतात. प्राचीन काळी गुरुवर्गाचे मठाधिकारी राजेमहाराजांना आपले शिष्य बनवून त्यांच्याकडून गुरुदक्षिणा व भूमिदान मिळवून जगद्वंद्य होत असत.

येथपर्यंत आम्ही अनेक आधार देऊन वीरशैव मताचे प्राचीनत्व सिद्ध केले. आता या मताच्या प्राचीन ग्रंथांचे बाबतीत आम्ही संक्षेपाने विवरण करणार आहोत. वीरशैवाचार्य वीरशैव पंडितांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहेत. श्रीजगद्गुरू पंचाचार्यांनी भूलोकावर वीरशैव मताची प्रस्थापना करून वीरशैवसिद्धान्त सर्वांना कळावा म्हणून त्यांनी शिवसूत्र, ब्रह्मसूत्र व उपनिषदादी ग्रंथांवर भाष्ये रचली. ही भाष्ये रेणुकभाष्य, दारुकभाष्य, एकोरामभाष्य, पंडितभाष्य व विश्वाराध्यभाष्य या नावांनी प्रसिद्ध आहेत. अशी लोकोत्तर भाष्ये रचून पूज्यपाद पंचाचार्यांनी प्राचीन काळी वीरशैवमताला श्रेष्ठत्व आणून दिले असले तरी दुर्दैवाने हल्ली त्यांचे एकही भाष्य उपलब्ध नाही. महा-नारायणोपनिषदाला भाष्य लिहिलेले वृषभ पंडिताराध्य यांनी अकराव्या अनुवाकातील ‘सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभुवम्’ वगैरे मंत्रावर भाष्य करताना श्रीरेणुकादी पंचाचार्यांच्या भाष्यांचा अभिप्राय थोडक्यात दाखवून दिला आहे. एवढ्यावरच आम्हाला तूर्त संतोष मानण्याची पाळी आली आहे. याच वृषभपंडिताराध्यांनी तैत्तिरीय उपनिषदावर केलेल्या भाष्यात खालील श्लोक दिला आहे:-

वेदव्यास सूत्रकारं दूर्वासं वृत्तिकारकम्।
भाष्यकृत्पण्डिताराध्यं प्रपद्ये पाशमुक्तये॥

या श्लोकांत ब्रह्मसूत्र रचणारे व्यासमुनी, सूत्रावर भाष्य करणारे पंडिताराध्य व वृत्ती लिहिणारे दूर्वासऋषी यांना संसारपाशबंधमुक्तीसाठी शरण जातो, असे लिहिले आहे. हा मंगलाचरणाचा श्लोक आहे. यावरून पंडिता-राध्यांनी लिहिलेले भाष्य सर्वोत्तम व सर्वप्रसिद्ध होते असे दिसून येते.

पूज्यपाद पंचाचार्यांनी लिहिलेली भाष्ये जरी अजून आम्हास मिळाली नाहीत, तरी ती ठिकठिकाणच्या ग्रंथभांडारांतून आहेत, असे कळते. ही भाष्ये आंध्र प्रदेशातून आराध्य ब्राह्मणांच्या घरी विशेष करून आहेत. सिकंदरा-बादच्या मार्कंडेय शास्त्री महाशयांच्या घरातील लायब्ररीचे यादीत श्रीरेणुकभाष्य व श्रीदारुकदिग्विजय हे दोन ग्रंथ दिसून येतात. बर्लिन येथील पुस्तकालयात श्रीरेणुकभाष्य आहे अशी वंदता आहे. ही भाष्ये जेव्हा आपल्या हाती येतील तेव्हा वीरशैवमताला सौभाग्य प्राप्त झाले, असे म्हणता येईल. श्रीपती पंडितांनी ब्रह्मसूत्रावर लिहिलेले श्रीकरभाष्य हल्ली उपलब्ध झाले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्रावर भाष्य करताना श्रीपती पंडित लिहितात:-

समन्वयसूत्रे एकोरामसिद्धभगवत्पादाचार्यै: 
श्रोतव्य इत्यत्र आत्मज्ञानविधिर्निराकृत:।

यावरून त्यांनी श्रीजगद्गुरू एकोराम शिवाचार्यांनी लिहिलेल्या ‘तत्तु समन्वयात्’ या ब्रह्मसूत्रावरील भाष्याचा अभिप्राय व्यक्त केला व त्यामुळे हे सिद्ध झाले की, आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्ये लिहिली. आचार्यांनीच काय पण त्यांचा उपदेश घेऊन शिवज्ञान-संपन्न झालेल्या अगस्ती वगैरे महर्षींनी वीरशैवसिद्धान्तपर ग्रंथ लिहिलेले आहेत. श्रीकरभाष्यावरूनच असे कळून येते की अगस्ती महर्षींनी ब्रह्मसूत्रावर वीरशैवसिद्धान्तपर वृत्ती लिहिली आहे. श्रीपती पंडितांनी आपल्या भाष्यग्रंथारंभी लिहिले आहे:-

अगस्त्यमुनिचन्द्रेण कृतां वैयासिकीं शुभाम्।
सूत्रवृत्तिं समालोक्य कृतं भाष्यं शिवंकरम्॥

म्हणजे अगस्तिमहर्षींनी लिहिलेल्या व्यासकृत ब्रह्म-सूत्रावरील वृत्तीच्या आधारानेच हे भाष्य रचलेले आहे, अगस्तिकृत हा वृत्तिग्रंथ हल्ली कुंभकोणम् येथे प्रसिद्ध झाला आहे. श्रीजगद्गुरू विश्वकर्ण शिवाचार्य महास्वामींकडून शिवसिद्धान्त उपदेश घेऊन ज्ञानसंपन्न झालेल्या दुर्वास महर्षींनी लिहिलेली वृत्ती अजूनपर्यंत कोठेही उपलब्ध झालेली नाही. लोकोत्तर कीर्तिशाली असलेल्या या महर्षींनी लिहिलेली वृत्तीसुद्धा असामान्य असली पाहिजे, असा तर्क करण्यास मुळीच हरकत नाही.

नंदिकेश्वर शिवाचार्यांनी शिवाच्या डमरूतून निर्माण झालेल्या अ, इ, उ, ण् वगैरे चौदा सूत्रांवर शिवसिद्धान्तपर ‘वृत्ती’ लिहिली आहे. ही चतुर्दशसूत्रे केवळ शिवाद्वैत-सिद्धान्तपर असून सनकादी महर्षींचा उद्धार करण्यासाठीच शिवाने उत्पन्न केली आहेत, असा उल्लेख सापडतो. नंदिकेश्वर शिवाचार्यांनी लिहिलेल्या या शिवाद्वैतवृत्तीला उपमन्यू शिवाचार्यांनी भारदस्त टीका लिहिली आहे. ती नंदिकेश्वर-कारिका या नावाने प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ लहान असला तरी त्याची योग्यता फार मोठी आहे. हा ग्रंथ काशीक्षेत्र-निवासी वीरशैवेतर पंडितांनीच चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी छापून प्रसिद्ध केला आहे. याशिवाय गुरुवंशोद्भव अनेक पंडितांनी अन्य मतीयांशी वादविवाद करून अनेक ग्रंथ रचलेले आहेत. परमतकालानल शिवाचार्य व परवादी भयंकर शिवाचार्य यांनी आद्य शंकराचार्याबरोबर वादविवाद केला असे शंकरविजयादी ग्रंथांवरून कळून येते. नीलकंठ शिवाचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. कालहस्ती शिवाचार्यांनी उपनिषदांवर लिंगधारणपर भाष्य रचले, असे लिंगधारणचंद्रिका नामक ग्रंथावरून कळून येते.

वरील सर्व प्रमाणे पाहता वीरशैवमताच्या प्राचीनत्वाची कल्पना येऊ शकेल.
***
(‘वीरशैवरत्न’ या ग्रंथातील संपादित केलेला लेख)
***

No comments:

Post a Comment