Saturday, August 26, 2017

‘सिद्धराम माझा सखा बळिवंत’...

डॉ. शे. दे. पसारकर
विश्‍वस्त, 
श्रीसिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी, सोलापूर


१९७७ मध्ये मी सोलापुरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि चहुबाजूंनी पाण्यानं वेढलेलं सिद्धरामेश्‍वरांचं नयनरम्य मंदिर पाहून मी हरखून गेलो. त्याआधी वाशीमचं (वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म) दगडी चिर्‍यानं बांधलेलं पद्मतीर्थ आणि त्याच्या मध्यभागी स्तंभांवर तोल सावरत उभं असलेलं शिवालयच केवळ पाहिलेलं होतं. पण ते सिद्धेश्‍वरतळ्याच्या मानानं खूपच लहान. त्यानंतर पोथ्यापुराणांत अनेकवार उल्लेखिलेलं पंपासरोवर हंपीला गेल्यावर पाहिलं. ते नावाचं सरोवर, पण आकार मात्र लहानच. त्या मानानं सिद्धेश्‍वरतळं केवढं विशाल! त्या तळ्यावरून येणारा वाराही सर्वांग प्रफुल्लित करणारा, देह-मनावर अध्यात्मविचाराची पाखर घालणारा. ज्या योगिपुरुषानं हे देखणं वैभव या नगरीला प्रदान केलं त्याच्यासमोर मी मनोमन सहस्रवेळा नतमस्तक झालो. पुढं सिद्धरामांच्या चरित्राचा आणि वचनसाहित्याचा परिचय झाल्यावर तर माझं भावविश्‍व सिद्धरामांच्या भक्तिप्रेमानं भारून, उजळून गेलं आणि माझ्या लेखन-चिंतनाला त्यांच्या रूपानं एक विषय मिळाला. त्यांच्या गुणगानात माझी लेखणी रमू लागली. कविता, अभंग आणि विविध वृत्तछंदोबद्ध ‘सिद्धरामायण’ हे कथाकाव्य लेखणीतून प्रसवलं. सिद्धराम हे माझ्या भावविश्‍वाला असे व्यापून राहिले.
‘चंद्रसावली’ या कवितासंग्रहात सिद्धरामांवरील आठ कविता आणि सोळा अभंग समाविष्ट आहेत. महापुरुष युगायुगांतून कधीतरी एखाद्या वेळी जन्माला येत असतात. काळाची गरज असते त्यावेळी. त्यांची जन्मरीतही सामान्यांपेक्षा वेगळी असते. सुगलेच्या उदरात गर्भांकुर रुजण्याआधीच जगद्गुरू रेवणसिद्धांनी सिद्धरामजन्माचं भाकित वर्तवलं होतं, हे एक नवलच. साठ वर्षांच्या सुगलेच्या पदरात अभावितपणे पुत्रदान पडलं. ते केवळ पुत्रदान नव्हतं, तर ते जणू एका युगाचं दान होतं.

मुर्डी मुद्दय्याच्या घरी एक नवल घडले
त्याच्या पदरात दान एक युगाचे पडले
साठा वर्षांची सुगला कशी जहाली गर्भिणी
नियतीने भाळी तिच्या एक लिहिली कहाणी


नियतीनेच जणू तिच्या ललाटी एका नव्या युगाची कहाणी लिहून ठेवली होती. सिद्धरामांच्या रूपानं ते युग जन्माला आलं. जणू काळालाच एक सुरेख स्वप्न पडलं. त्यांच्या पदरवानं सोन्नलगीचा परिसर आध्यात्मिक चैतन्यानं भारून, बहरून गेला. सिद्धराम ही वात्सल्यमूर्तीच. त्यांच्या कृपाछत्राखाली अवघं गाव आबादीआबाद झालं. आजदेखील योगसमाधीत बसून ते आपल्या कृपेची पाखर भक्तभाविकांवर घालत आहेत.

एक आटपाट गाव नाव त्याचे सोन्नलगी
तेथे योगसमाधीत बैसला ग शिवयोगी
त्याच्या मिटल्या पापण्या आत भिजले अंतर
धरी गावावर सार्‍या माये, कृपेची पाखर


त्यांच्या मुखातून अशी वचनं झरली की ती हृदयी धरताच अवघे जन उद्धरून गेले. दुधावर जसा सायीचा दाट थर असतो तसं सिद्धरामांच्या ठायी वात्सल्य मूर्तिमंत वसलं आहे. ज्या गावाजवळून एकही नदी वाहत नाही त्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य किती असेल! त्या प्रज्ञापुरुषाच्या ते ध्यानात आलं अन् हाती कुदळ घेऊन आपल्या शिष्य-सहकार्‍यांसह त्यांनी प्रचंड तलाव खणून काढला. तो जेव्हा पाण्यानं तुडुंब भरला, त्यावेळी काय बरं घडलं असेल? गावातल्या कोरड्या विहिरींना झरे फुटले असतील. वृक्षवेलींची तहान भागून त्या अनिवार फोफावल्या असतील. वृक्षांच्या शाखाफांद्यांवरून पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट सुरू झाला असेल. गावाचं पर्यावरणच बदलून गेलं असणार. आयाबहिणींची पाण्यासाठी चाललेली वणवण थांबली असेल. असं खूप काही घडलं असणार. सिद्धरामांच्या अंतर्यामीची करुणाच जणू तळ्याच्या रूपानं प्रकटली.

कष्टणार्‍या हातांनीच झाला तलाव खणून
अंतर्यामीची करुणा गंगा राहिली होऊन
मग सगळ्यांचे ओठ आणि हृदये भिजली
सिद्धरामाच्या तपस्येने सुखे जनता झिजली


सिद्धरामांच्या दोन राबणार्‍या हातांकडे पाहून सहस्रावधी हात आपण होऊन पुढे आले आणि तळं खोदण्यासाठी राबले. प्रत्येकाला तलावातली मूठभर माती प्रसाद म्हणून सिद्धराम देत राहिले. अशी तलावाची माती घरोघरी पोहोचली अन् तळ्याशी अवघ्या गावाचं नातं दृढ झालं.

सोलापुरातील प्रत्येक माहेरवाशीण सिद्धरामांना आठवीतच सासरी जाते. तिथं रमतेही. पण संक्रातीचा सण जवळ आला की तिला ओढ लागते माहेरची. जर येणं जमलं नाही तर तिचं मन कातर होतं. मग आपल्या सखीजवळ ती आपलं मन मोकळं करते.

वाजे सनई चौघडा नभी घुमतो डिंडिम
माझ्या माहेरी नांदतो शिवयोगी सिद्धराम
कशी सांगू सखे, तुला माझ्या माहेरची रीत
तेथे राजा सिद्धराम करी जगावर प्रीत


बाई गं, तुला कसं कळेल बरं माझ्या माहेरचं मोठेपण? तिथं सिद्धरामांसारखा योगिपुरुष शांतपणे डोळे मिटून अवघ्या जगाचं कल्याणचिंतन करीत बसलेला आहे. आम्ही सारी त्याची लेकरं. जेव्हा दु:खं आम्हाला पोळतात तेव्हा त्याच्यासमोर जाऊन आम्ही नम्र होतो. त्यावेळी तोच आमचं सांत्वन करतो.

दु:खभारे कधी डोळे जरी लागलेत झरू
सिद्धरामाचा ग हात लागे पाठीवर फिरू
कधी संसारतापाने कुणी जाता उबगून
शांत करी सिद्धराम त्याला सावली होऊन


असं सावलीसारखं दाट अपरंपार सुखच सुख माझ्या माहेरी भरलेलं आहे. सिद्धरामांच्या कृपादृष्टीखाली सारं नगर वावरते आहे अन् घराघरांतून, मुखामुखांतून त्याचाच नामगजर होतो आहे. उघड्या डोळ्यांना तर त्याचं दर्शन घडतंच, पण डोळे मिटल्यावर अंत:चक्षूंसमोरही तोच उभा असतो.

दिठी पांघळून वळे आणि मिटता पापणी
आत चैतन्याचा गाभा दिसे सिद्धराम धनी
त्याच्या दर्शनाने सखे, दु:ख अवघे सरले
अहं-ममता विरून माझे मीपण नुरले!


माहेरवाशिणींच्याच नव्हे तर सोलापूर परिसरातल्या भक्तभाविकांच्या मनांत सिद्धराम असेच व्यापून राहिले आहेत. त्यांच्या रोमरोमांत सिद्धराम, दृष्टीपुढे सिद्धराम, कानावर नाद सिद्धराम, त्यांच्या भोवती दरवळतो सिद्धराम, वचनांतून सहज भेटतात सिद्धराम आणि काही काळापुरता त्यांच्या देहच होऊन जातो सिद्धराम... अशी त्यांची भावविभोर अवस्था होऊन जाते. सिद्धरामांच्या केवळ आठवाने इतकं परिवर्तन घडून येतं.

आज आठवला मनी शिवयोगी सिद्धराम
रोमरोमांतून जागा सिद्धराम सिद्धराम... 
घनव्याकुळ तळपे नभी प्रकाशाची रेखा
तसा दृष्टीपुढे उभा सिद्धराम सिद्धराम...
दर्पणात पाहू जाता हरपलो माझा मीच
आज देहच जहाला सिद्धराम सिद्धराम!


सिद्धराम केवळ मंदिरातच नाहीत, तर अवघ्या स्थिरचराला व्यापून राहिलेले आहेत. भक्तांची भावव्याकुळ दृष्टी जिथं जिथं पडते तिथं तिथं त्यांना सिद्धरामांचं दर्शन होतं. पावसाच्या धारांतून तोच नृत्य करताना दिसतो. हिरव्याकंच पानांवर त्याच्याच स्पर्शाची थरथर जाणवते. तळ्याच्या तरंगात तोच लहरताना दिसतो. कानाशी घोटाळणारा वारा त्यांचीच वचनं ऐकवतो.

तुझे सिद्धरामा सर्वत्र दर्शन।
फुलापानांतून सर्वकाळ ॥
रसात गंधात शब्दात स्पर्शात ।
तूच रे रूपात भरलासी ॥
व्यथा-वेदनेत आनंद-भोगात ।
मायाममतेत तूच तूच ॥


सिद्धरामा, तूच सर्वत्र व्यापून राहिलेला आहेस. तूच आत्मा आहेस अन् तूच विश्‍वात्मा आहेस. वृक्षाचं पान जसं पक्ष्यावर सावली धरतं तशी तू आपल्या भक्तांवर कृपेची सावली धरतोस. झरा अखंडपणे झुळझुळत राहतो तसं देवा, तुझं प्रेम भक्तांची मनं अविरत चिंब भिजवीत असतं. दु:खभारानं मोडून पडण्याची वेळ येईल त्यावेळी तुझाच आठव केला पाहिजे. उन्हात होरपळेल्या जिवाला वृक्षाच्या घनदाट छायेत जो विलक्षण शांतीचा अनुभव येतो तसा आम्हा दु:खार्तांना तुझ्या नामस्मरणानं विसावा मिळतो. तुझ्या नामात एवढं सामर्थ्य आहे की त्यामुळे दु:खाचे डोंगर वाहण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी येतं. तू कृपेचा सागर अन् दयेचं आगर आहेस. अडुसष्ट तीर्थे तुझ्या पायाजवळ राहतात. म्हणून केवळ ‘सिद्धराम’ अशी गर्जना केली तरी कळिकाळाच्या हृदयाला थरकाप सुटतो. सर्व सिद्धींचा ईश्‍वर असल्यामुळेच तर तुला ‘सिद्धेश्‍वर’ म्हणतात. म्हणूनच

भावभिजलेले मन। येथे यावे हो घेऊन॥
सिद्धरामापुढे नत। व्हावे अहंकारमुक्त॥
बसलेला भक्तांसाठी। योगिकुलचक्रवर्ती॥


अहंकारमुक्त होऊन त्याच्यापुढे नम्र झालं की सारे भवताप शीतल होऊन जातात. सिद्धरामांना असं पूर्ण समर्पण केलं की मग कसली चिंता उरत नाही. मग त्यानं उद्धार करावा किंवा संसारदु:खात खितपत पाडावं. हित करावं किंवा अनहित करावं. सुखानं भारून टाकावं किंवा दु:खात होरपळू द्यावं. त्याच्यापायी एकदा जीवन समर्पित केलं की त्यानं आपलं काहीही केलं तरी ते निमूटपणे मान्य करावं अन् निश्‍चिंत होऊन त्याला प्रणाम करून उद्घोष करावा-

सिद्धराम माझा सखा बळिवंत।
त्याच्या हाती हात दिला माझा ॥



***

No comments:

Post a Comment