Thursday, October 5, 2017

परमरहस्य : प्रस्तावना

‘ऐकोनि जीवीं धरावा' असा ग्रंथ :


डॉ. शे. दे. पसारकर

अध्यक्ष,
पहिले अ. भा. वीरशैव मराठी साहित्य संमेलन, लातूर 2004

श्रीक्षेत्र कपिलधार येथे समाधिस्थ झालेले संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामी आणि शिखरशिंगणापूर येथील श्रीशांतलिंगस्वामी हे महाराष्ट्रीय वीरशैव संतकवींचे अध्वर्यू होत. दोघांचीही मराठी रचना उपलब्ध झाली आहे. समकालीन असलेल्या ह्या दोन्ही संतकवींनी मराठी वीरशैवांना आपल्या रचना-कर्तृत्वाने मानसिक आधार दिला, त्यांची सांप्रदायिक अस्मिता जागृत केली. आपल्या ओजस्वी, संजीवक वाणीने स्वधर्मपालनाचा उद्घोष करून परधर्मीय व परपंथीय आक्रमणामुळे दडपलेल्या वीरशैव समाजात चैतन्य निर्माण केले. वीरशैव स्त्री-पुरुषांना मानसिक बळ देऊन आपल्या संप्रदाय-वैशिष्ट्यांचे जतन करणे हा वीरशैव संतकवींचा जीवनधर्मच होता. त्यासाठी त्यांनी कीर्तने केली, भजनी परंपरा निर्माण केली. अभंग, पदे, आरत्या रचून लोकमनाशी नाते जोडले आणि ओवीबद्ध भाष्यग्रंथ रचून वीरशैवांना आपल्या धर्मविचाराची ओळख करून दिली. वीरशैव मराठी ग्रंथांत, वीरशैव तत्त्वज्ञान- विशेषत: वीरशैवांचा आचारधर्म ज्यामध्ये प्रासादिक रीतीने प्रकट झाला आहे असा, महाराष्ट्रातील लोकप्रिय ग्रंथ म्हणजे श्रीमन्मथस्वामींचा ‘परमरहस्य' हा भाष्यग्रंथ होय.

इ. स. १८८७ मध्ये बार्शी येथे ‘परमरहस्या'वर प्रथम मुद्रणसंस्कार झाला. परंतु त्यापूर्वी ‘परमरहस्या'ची हस्तलिखिते मठामंदिरांत लिहिली जात होत होती, संग्रहित केली जात होती, वाचली-ऐकली आणि अभ्यासली जात होती. मुद्रित झाल्यामुळे हा ग्रंथ लोकांसमोर अधिक प्रमाणात आला, त्याचा प्रसार-प्रचार अधिक झाला एवढे मात्र खरे. १९७४ मध्ये ष. ब्र. श्री शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर यांनी सर्वाधिक ओवीसंख्या असलेली‘परमरहस्या'ची प्रत प्रकाशित केली. त्यांच्या प्रतीला ‘सांप्रदायिक प्रत' असे म्हणता येईल. या सांप्रदायिक प्रतीचेच पुनर्मुद्रण वारंवार होत राहिले आहे. दरम्यान इ. स. २००१ मध्ये, शैवभारती शोधप्रतिष्ठान, वाराणसी या संस्थेतर्फे हस्तलिखितानुसार यथामूल संपादिलेली ‘परमरहस्या'ची संशोधित प्रतही ‘श्रीमन्मथशिवलिंगकृत परमरहस्य' (संपादक ; शे. दे. पसारकर) या नावाने प्रकाशित झाली आहे.

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की, मन्मथस्वामींचा ‘परमरहस्य' हा ग्रंथ मठाधिपतींच्या, भाविकांच्या आणि अभ्यासकांच्या श्रद्धेचा व जिज्ञासेचा विषय होऊन राहिलेला आहे, हे लक्षात यावे. जीवनभर धर्मजागर करणा-या मन्मथस्वामींची ही वाङ्मयी मूर्ती पंथप्रचारकांना आणि साहित्याभ्यासकांना खुणावत राहिली नसती तरच नवल! हा सांप्रदायिक ग्रंथ प्रकाशित करून त्याचा अधिकाधिक प्रसार-प्रचार करणा-या प्रयत्नाचे सर्वांनी सानंद स्वागत केले पाहिजे.

स्वतंत्र निर्मिती

शिवगौरीसंवादात्मक असा मन्मथस्वामींचा हा ग्रंथ ‘संस्कृत परमरहस्य' या ग्रंथावरील ओवीबद्ध भाष्य असून यात शक्तिविशिष्ट-अद्वैत, षट्स्थल आणि अष्टावरण ह्या वीरशैव-सिद्धान्तांचे सुगम विवरण केलेले आहे. हा भाष्यग्रंथ असला तरी मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मितीही आहे. मन्मथस्वामी व श्रोते यांचा संवाद, भगवान शिवांनी पार्वतीची वाहिलेली शपथ व त्यांनी पार्वतीविषयी व्यक्त केलेली प्रीतिभावना, वीरशैव पुरुष-जंगम-भक्त यांची रेखाटलेली शब्दचित्रे, अंत:काळाचे वर्णन, दांभिक गुरूंची चित्रे हे सारे वाचल्यावर मन्मथस्वामींनी मूळ ग्रंथात आपल्या प्रतिभेने किती गहिरे रंग भरले आहेत याची कल्पना येते. मूळ संस्कृत ग्रंथात शंकर आणि पार्वती ‘शिव उवाच' व ‘देव्युवाच' या दोन शब्दांतच गोठलेले दिसतात. परंतु मन्मथस्वामींच्या ग्रंथात मात्र शंकर-पार्वती यांना भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वे प्राप्त झालेली आहेत. शंकर जणू आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येथे येतो. वीरशैव पुरुषाचे वर्णन करताना शंकर आपले ईश्वरत्व विसरून म्हणतात:-
तो प्राणसखा आम्हां बहु । त्याचे चरण हृदयीं ध्याऊं ।
तयावांचूनि न पाहूं । परवस्तु आणिक ।। ३.९३

भक्ताच्या चरणाचे ध्यान करणारे हे शंकर, ही मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मिती आहे. भक्तामुळे माझे जीवन अर्थपूर्ण झाले आहे, भक्तामुळेच माझ्या अंगावर वस्त्रालंकार आहेत, त्यांच्याच आज्ञेत मी सदैव राहतो, असे शंकर सांगतात:-
मज भक्तांचेनि येथें असणें । भक्तांचेनि योगें माझें जिणें ।
मी भक्तांचेनि महिमानें । श्लाघ्यतु असे ।। ८.९७
भक्तांचेनि मज भूषणें । भक्तांचेनि मज लेणें नेसणें ।
भक्तांचेनि आज्ञावचनें । मी वर्तत असे वो देवी ।। ८.९८
अशाप्रकारे देवपण बाजूला ठेवून ‘परमरहस्या'त शंकर भावनाप्रधान होऊन बोलतात, तेव्हा मन्मथस्वामींनी कैलासात वास्तव्य करणा-या भगवान शंकरांना भोळ्या भाविकांच्या शेजारी आणून उभे केले आहे, असे वाटत राहते. भक्तमाहात्म्यवर्णनात रंगलेले शंकर पुढे सांगतात, 'भक्तरूपी वृक्षाच्या सावलीतच मला विश्रांती मिळते, मी सदैव तेथेच राहतो. म्हणून तर बसवेश्वरासारख्या भक्ताच्या पाळण्यात मी तान्हे बाळ होऊन राहतो. गंगाजळासारखे निष्कपट हृदय असलेल्या, शिवकथा-शिवगोष्टी सांगताना अंत:करण उचंबळून येणा-या भक्ताच्या हृदयातच माझे वास्तव्य असते. त्याचा मी अंकित असतो. तो चालत असतो तेव्हा त्याच्या वाटेवरचे खडे मी वेचतो, त्याच्या अवतीभोवती राहून त्याच्यावर येणा-या विघ्नांचे निवारण करतो. इतकेच काय, तो ज्याला ‘तुझे बरे होईल' असा आशीर्वाद देतो त्याचे मला कल्याण करावेच लागते':-
जयास तो वचन देईल । म्हणें जाय तुझें बरें होईल ।
तया मज देणें लागेल । तो म्हणेल तेंचि तें ।। १५.१६०
भक्ताविषयी अशी प्रगाढ प्रीती व्यक्त करणारे शंकर मूळ ग्रंथात नसून, ही मन्मथस्वामींची स्वतंत्र निर्मिती आहे. पार्वतीविषयीही अशीच प्रेमबहळ भाषा शंकराच्या तोंडी मन्मथस्वामींनी योजिली आहे.
पार्वती ही ज्ञानलालसा श्रोता. हळुवारपणे प्रश्न विचारून शंकरांच्या मनातील गुह्य काढून घेण्यात चतुर. सतत प्रश्न विचारून ती शंकराला बोलत ठेवते. तिच्या प्रेमापोटी शंकर बोलत राहतात, वीरशैव-विचारांचे विवरण करीत राहतात. तिचा प्रश्न ऐकून ‘तुवां प्रश्न केला सुखदायक । माझे उल्हासलें निजसुख' (७.६) असा आपला आनंद व्यक्त करतात. कुंडातील अग्नीत तुपाची धार पडल्यावर अग्नी देदीप्यमान होतो त्याप्रमाणे पार्वतीच्या प्रश्नामुळे माझे वस्तुज्ञान झळाळून उठते, असे तिचे कौतुक करतात. कधी तिला ‘भक्तीसीं रत्न' असे गौरवपर विशेषण देतात, कधी ‘भक्तराज' असा किताब बहाल करतात, तर कधी ‘तूं माझा भक्त म्हणोनि परम । निरोपिलें वो देवी' (५.१३४) असा तिच्या अधिकाराचा गौरव करतात. एके ठिकाणी तर आपले बोलणे असत्य ठरले तर पार्वतीची शपथ वाहण्याइतके शंकर भावविवश होतात (१५.८७). पार्वतीविषयी भगवान शंकरांना वाटणारा जिव्हाळाच मन्मथस्वामींनी येथे व्यक्त केलेला आहे.
भगवान शंकरांनी गुह्यतम असे ‘परमरहस्य' सांगितल्यामुळे पार्वती आनंदविभोर झाली. तन्मय होऊन तटस्थ झाली. ‘परमरहस्या'च्या श्रवणामुळे आलेली धन्यता तिने शब्दांतून प्रकट केली आहे:-
म्हणे अजि भाग्य उदया आलें । जें बहुकाळ होतें लोपलें ।
तें स्वामीनें बोधिलें । कृपा करोनि मज ।। १३.४४
आजि माझ्या दैवां नाहीं पार । जें स्वमुखें निरोपितसा दातार ।
आतां कायसा दरार । जन्ममृत्यूचा ।। १३.४५
सतराव्या अध्यायात आनंदविभोर झालेली पार्वती भानावर येऊन भगवान शंकरांना साष्टांग नमस्कार करते. महापुरात वाहून जाणा-या मनुष्याचा जीव वाचवावा तसे मला शंकरांनी ‘परमरहस्य' बोधून वाचविले, अशी कृतार्थ भावना व्यक्त करते. शंकर-पार्वती यांना अशी भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वे बहाल करणारी मन्मथस्वामींची प्रतिभा सादर वंदन करावी अशीच आहे.

ग्रंथकार मन्मथस्वामी आणि श्रवणोत्सुक श्रोते यांचा संवाददेखील मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितिशैलीची साक्ष देतो. श्रोते म्हणजे प्रत्यक्ष शिवगणच. त्यांना ‘सावध होवोनि निरूपणीं आतां । ऐका टीका परमरहस्याची' (१.२५) अशी विनंती ते करतात आणि लगेच आपला तोल गेला म्हणून ओशाळतात. शिवगण कधी असावध असू शकतात? परंतु आपण तसे बोलून चुकलो. आपल्या अज्ञानामुळे त्यांच्यावर हा अन्याय झाला अशी जाणीव त्यांना होते. हा आपला पिसेपणाच झाला असे वाटून, मग ते संकोचून श्रोत्यांची क्षमा मागतात:-
तरी अन्याय क्षमा कीजें । पितयासारिखे साहूनि जाईजें ।
मज अपत्यातें कृपादृष्टीनें पाहिजें । शिवगणीं तुम्ही ।। १.२८
आणि यानंतर श्रोतेरूपी शिवगण रुसले असतील अशा भावनेने मन्मथस्वामी परोपरीने त्यांची समजूत काढतात. मन्मथस्वामींचा हा परिहार जरा जादाच होतो आहे असे वाटून की काय, श्रोते ‘आतां परिहार देसीं किती । शिव काय बोलिलें पार्वतीप्रति । तें निरोपी आतां'' (१.३४) असे सांगून त्यांना मूळपदावर आणतात.
मूळ ‘संस्कृत परमरहस्या'त नसलेला असा हा ग्रंथकार-श्रोतृसंवाद मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितीचा द्योतक आहे.

वीरशैवांचा आचरण-कोश

मन्मथस्वामींच्या स्वतंत्र निर्मितीची, कवित्वाची पुष्कळ चर्चा करता येईल. परंतु ‘परमरहस्या'ची मुख्य निर्मितिप्रेरणा, जनसामान्यांना वीरशैव तत्त्वविचार व आचार सुगम करून सांगणे, ही आहे. ‘परि जडजीव तरती तुमचिया प्रसादें' (१.३३) असे मन्मथस्वामींनी शिवगणस्वरूप श्रोत्यांना उद्देशून म्हटले ते याच अर्थाने. ज्ञान हे बुद्धिगम्य असून डोळस असते, परंतु निष्क्रिय असते. ते सक्रिय होते ते आचरणामुळे. आचारशून्य ज्ञान मनुष्याला लिंगांगसामरस्याची- मोक्षाची- प्राप्ती करून देऊ शकत नाही, हा विचार मन्मथस्वामींनी अंध-पंगु-दृष्टान्त देऊन स्पष्ट केला आहे. पांगळा डोळस असतो, पण चालू शकत नाही. आंधळा चालू शकतो, पण त्याला दिसत नाही. दोघे एकत्र आले तर पांगळा दिशा दाखवू शकतो आणि त्या दिशेने आंधळा पांगळ्याला घेऊन जाऊ शकतो. त्याप्रमाणे डोळस ज्ञान आणि सक्रिय आचार यांचा समन्वय ज्याच्या जीवनात होतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते, असे मन्मथस्वामींनी स्पष्ट केले आहे. ज्ञान सक्रिय असावे आणि आचरण डोळस असावे, असे त्यांना सूचित करायचे आहे. वीरशैवांनी धर्माचरण करताना ते अंधपणे करू नये, तर डोळसपणे करावे, असा मन्मथस्वामींचा आग्रह आहे. सांप्रदायिक संकल्पना समजून न घेता, केवळ इतरांचे पाहून केलेले आचरण निष्फळ ठरते, असे त्यांचे प्रतिपादन आहे (१४.१०८).
आचरण डोळसपणे कसे करावे हे स्पष्ट करण्यासाठीच मन्मथस्वामींनी ‘परमरहस्या'ची रचना केली आहे. म्हणूनच ‘परमरहस्य' हा वीरशैवांचा आचरण-कोश ठरला आहे. ज्योत पेटवायची असेल तर तेल आणि वात एकत्र हवी, नाद उमटवायचा असेल तर वाद्य आणि हात एकत्र आले पाहिजेत, बीज अंकुरायचे असेल तर भूमी आणि मेघ यांचा संबंध घडायला हवा; त्याप्रमाणे मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञान आणि क्रिया यांच्यात समन्वय हवा, असे मन्मथस्वामींचे प्रतिपादन आहे:-
तेलवातीविण कैसें प्रकाशे ज्योति । वाद्यें वाजविल्याविण नाद काय उमटती ।
मेघभूमीविण निपजती । धान्यबीज काई ।। ८.५१
यालागीं क्रियाज्ञानाविण । न प्रकाशें चैतन्यघन ।
म्हणोनि न विसंबती सज्ञान । उभयांसीं जाण पां ।। ८.५२
एवढे सांगून मन्मथस्वामी थांबत नाहीत, तर ज्यांनी आपल्या जीवनात ज्ञान आणि क्रिया यांचा समन्वय केलेला आहे, असा वीरशैव पुरुष आदर्श म्हणून ते श्रोत्यांसमोर उभा करतात. या दृष्टीने वीरशैव (३.२१-४५), भक्त (८.८९-११७), प्राणलिंगी/जंगम (१५.१०१-१७१) यांची लक्षणे जिज्ञासू वाचकांनी अवश्य पाहावीत.
गुरू, लिंग, जंगम ही वीरशैवांची तीन आराध्ये एकरूप असून त्यांचा तीर्थ-प्रसाद वीरशैवाने श्रद्धापूर्वक नित्य सेवन केला पाहिजे असा धर्मदंडक आहे. पादतीर्थाचे महत्त्व, पादतीर्थ कोणाचे घ्यावे, कोणत्या रीतीने घ्यावे याचे सविस्तर विवरण मन्मथस्वामींनी दुस-या अध्यायात केले आहे. पादतीर्थसेवनात राजा असो वा रंक, कोणालाच सवलत नाही. ‘आचारमार्गाचे ठायी । राव रंक सारखाचि पाही' (२.४४) असे त्यांनी बजावून सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर वीरशैवांच्या पंचपीठांपैकी एका पीठाकडून दीक्षा घेतलेल्या भक्ताने अन्य पीठांच्या आचार्यांविषयी व शिवाचार्यांविषयी भेदभाव न बाळगता, त्यांचेही तीर्थ घेतले पाहिजे, असे ते स्पष्ट सांगतात:-
ही परसूत्राची मूर्त । याचें कैसें सेवावें तीर्थ ।
म्हणे तो नोव्हे शिवभक्त । लिंगधारी वा जंगम ।। २.३३
जंगम देखूनि भावें वंदावें । माझें तुझें बगीचें न म्हणावें ।। ९.१०
जंगमलांछन देखोनि नयनीं । आपुली परावी बगी न धरी मनीं ।। १२.३४
बगी म्हणजे सूत्र. पर्यायाने पीठ, सिंहासन. रंभापुरी पीठ (वीरसिंहासन), उज्जयिनी पीठ (सद्धर्मसिंहासन), केदार पीठ (वैराग्यसिंहासन), श्रीशैल पीठ (सूर्यसिंहासन) आणि काशी पीठ (ज्ञानसिंहासन) अशी वीरशैवांची पंचपीठे असून प्रत्येक पीठाचे सूत्र-गोत्र भिन्न असते. यांपैकी एखाद्या पीठाच्या शाखामठावरील शिवाचार्याकडून वीरशैवाने लिंगदीक्षा घेतलेली असते. म्हणजे प्रत्येक वीरशैव कोणत्या तरी पीठाचा दीक्षित असतो. असे असले तरी केवळ आपल्या पीठाच्याच नव्हे, तर अन्य पीठांच्या आचार्यांचा, शिवाचार्यांचा आणि शिवयोगी जंगमांचा त्याने परकेपणा न बाळगता आदर-सत्कार केला पाहिजे, असा वरील ओव्यांचा आशय आहे.
गुरू, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, विभूती, रुद्राक्ष व मंत्र ही वीरशैवांची अष्टावरणे असून पादोदक (तीर्थ) या आवरणाचा मन्मथस्वामींनी सविस्तर ऊहापोह केला आहे. अन्य आवरणांचेही यथोचित स्पष्टीकरण त्यांनी केलेले आढळते. लिंगधारण, गुरु-जंगमाविषयीची श्रद्धा, त्यांच्या तीर्थ-प्रसादाचे सेवन, विभूति-रुद्राक्षधारण आणि पंचाक्षरी (नम: शिवाय) वा षडक्षरी (ॐ नम: शिवाय) या मंत्राचा जप ही वीरशैवांची आचार-वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक वीरशैवाने प्रमादरहित होऊन, श्रद्धापूर्वक वीरशैवाचाराचे पालन केले पाहिजे, असा मन्मथस्वामींचा आग्रह आहे. त्यांनी आचरणावर दिलेला भर पाहिल्यावर ‘परमरहस्य' हा वीरशैवांचा आचरण-कोश आहे, असे निस्संदेहपणे म्हणता येते.

मराठी संतसाहित्याशी सुसंवादी भाषाशैली

मन्मथस्वामींनी मराठी संतसाहित्याच्या परिभाषेत वीरशैव तत्त्वज्ञान सांगितले आहे, हे ‘परमरहस्या'चे एक वैशिष्ट्य ठरावे. ‘लिंग' म्हणजे शिव आणि ‘अंग' म्हणजे जीव, शिव-जीव यांची एकरूपता म्हणजे ‘लिंगांगसामरस्य'- अशी वीरशैवांची परिभाषा आहे. षडलिंगांचे विवेचन करताना त्यांनी महालिंग, प्रसादलिंग, जंगमलिंग, शिवलिंग, गुरुलिंग, आचारलिंग अशी; आणि षट्स्थल विवरिताना भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य अशी वीरशैव-परिभाषा योजिली आहे. परंतु सामान्यत: बद्ध-मुक्त, ब्रह्म-आत्मा-वस्तू, प्रकृति-पुरुष, मोक्ष अशी सर्वपरिचित वेदान्ताची परिभाषाच त्यांच्या रचनेतून डोकावू लागते. ‘शिव हा सूक्ष्मचिदचिद्शक्तिविशिष्ट असतो आणि जीव हा स्थूलचिदचिद्शक्तिविशिष्ट असतो'- अशी वीरशैव परिभाषा, वीरशैव तत्त्वज्ञान समजून घेऊ पाहणा-या मराठी भाविकांना क्लिष्ट आणि रुक्ष वाटण्याचा संभव आहे, हे मन्मथस्वामींना जाणवले असावे. म्हणून श्लोकानुवाद करताना ते सिद्धान्ताची (वीरशैव तत्त्वज्ञानाची) परिभाषा योजितात आणि श्लोकार्थाचा विस्तार करताना वेदान्ताची परिभाषा योजितात. ‘परमरहस्या'चा सूक्ष्म अभ्यास करणा-या जिज्ञासू वाचकांच्या हे ध्यानात येईल. ‘लिंगांगसामरस्य' असा शब्दप्रयोग न करता ते मोक्षसंकल्पनेचे कसे बहारदार वर्णन करतात हे पाहण्यासारखे आहे:-
गंगा सागराशीं मिळाली । ती पुन्हा न परते सागरुचि झाली ।
तैसीं चित्तवृत्ति समरसलीं । पूर्णानंदीं शाश्वत ।। ४.६
ऐक्यस्थल या वीरशैव-संकल्पनेचे वर्णन त्यांनी मराठी संतसाहित्याशी सुसंवादी अशा शब्दांत कसे केले आहे ते पाहा:-
तें परब्रह्मचि मुसावलें । भक्तिसुखालागीं अवतरलें ।
वीरशैव नाम पावलें । ऐक्यस्थळ तें ।। १२.१०८
अशी अनेक स्थळे ‘परमरहस्या'त दृष्टिगोचर होतात. याचा अर्थ असा की, मन्मथस्वामींनी संस्कृत ‘परमरहस्या'चा केवळ शब्दानुवाद केला नाही, तर त्यातील वीरशैव तत्त्वज्ञान मराठी संतसाहित्याच्या मुशीत घालून ते आधी संस्कारित केले आणि मग मराठी वीरशैवांच्या पुढे ग्रंथरूपात ठेवले. मन्मथस्वामी केवळ भाषांतरकार नाहीत, तर सर्जनशील भाष्यकार आहेत. मराठी माणसाच्या गुणवैशिष्ट्यांशी व मर्यादांशी ते परिचित आहेत. मराठी लोकांना वीरशैव तत्त्वज्ञान किती प्रमाणात पचेल याची त्यांना जाण आहे, आणि या ग्रंथाच्या प्रसार-प्रचारातून किती परिवर्तन घडेल याचेही त्यांना भान आहे. म्हणून जो वीरशैव वारक-यांच्या कीर्तन-भजनात शांतिसुख शोधीत होता त्याच्यासाठी, त्याला परिचित असलेल्या भाषेतच वीरशैव तत्त्वज्ञान सांगण्याची आवश्यकता होती. असे केले नसते तर परब्रह्म-आत्मा-मोक्ष अशा भाषापरिघात वावरणा-या मराठी वीरशैवांना वीरशैव तत्त्वज्ञान परके वाटण्याचा संभव होता. मन्मथस्वामींनी द्रष्टेपणाने हे जाणले आणि मग अधूनमधून ज्ञानेश्वरीसदृश शब्दप्रयोग करीत, वेदान्त-परिभाषेशी जवळीक साधत त्यांनी वीरशैव तत्त्वज्ञान मराठीत आणले. म्हणून, मूळ श्लोकात नसतानाही त्यांनी
येणेंपरी भजनभक्ति करितां । सहज वस्तुकळा ये हातां ।
मग स्वयें होय वस्तुतां । परि भजन न सोडिजें ।। ७.३७
असे भजनभक्तीचे माहात्म्य गायिले आहे. ज्ञानेश्वरी-ओव्यांची आठवण करून देणा-या ओव्याही ते सहज लिहून गेले आहेत. काही उदाहरणे अशी:-
म्हणोनि अंतरीं ज्ञानें शुद्ध झाला । बाहेरी क्रियेनें क्षाळिला ।। १०.१२७
लिंगें बोलविल्या वेदु बोले । लिंगें हालविल्या सूर्य चाले ।
लिंगें हालविल्या वायु हाले । सत्तामात्रें ।। १४.५१

वीरशैव संकल्पनांचे स्पष्टीकरण

असे असले तरी मन्मथस्वामींनी वीरशैव संकल्पना नेमक्या शब्दांत स्पष्ट केलेल्या आहेत. लिंगार्चनविधी (९.५०-५९), इष्टलिंग, प्राणलिंग व भावलिंग यांचे पूजन (११.४६-५८), षडलिंगांचे वर्णन (११.८६-११७), इष्टलिंगधारण व त्याची स्थाने (११.१२१-१२८), षट्स्थले (१२.२४-११०) ह्या विषयांचे विवरण त्यांनी नेमकेपणाने केले आहे. इष्टलिंग हेच वीरशैवाचे सर्वस्व, आराध्य असते, म्हणून त्याने इष्टलिंगाशिवाय अन्य स्थावरलिंगांचे पूजन करू नये, असे आपले स्पष्ट मतही त्यांनी नोंदविले आहे (१०.१७४). वीरशैवाच्या शरीरावर दीक्षासंस्कार झाल्यामुळे त्याचे स्थूल शरीर (मांसपिंड) दग्ध होऊन ते मंत्रशरीर (मंत्रपिंड) झालेले असते. त्यामुळे जे शरीर ज्ञानरूपी अग्नीत दीक्षासंस्कारप्रसंगी आधीच दग्ध झालेले असते, ते मरणोत्तर अग्नीत घालून दग्ध करू नये, असे स्पष्टीकरण मन्मथस्वामी देतात:-
जें दग्ध झालें तें काय जाळावें । जें पाक झालें तें काय शिजवावें ।
तैसें ज्ञानाग्नीनें दग्ध स्वभावें । त्यासीं दग्ध करूं नये ।। ५.७३
एकदा शिजवलेले अन्न पुन्हा शिजविले जात नाही, एकदा जाळलेली वस्तू पुन्हा जाळली जात नाही. म्हणून ज्ञानाग्नीत तत्त्वत: दग्ध झालेले वीरशैवाचे शरीर मृत्यूनंतर अग्नीत जाळले जात नाही. ते जमिनीत ठेवले जाते, पण तेही समाधि-अवस्थेत बसवून आणि हातावर लिंग देऊन, झोपवून नव्हे. लिंगार्चनेचे नित्य व्रत ज्याने जीवनभर आचरिलेले असते अशा वीरशैवाची मरणोत्तर शारीर स्थिती लिंगार्चनरत असणे स्वाभाविकच होय.

समारोप

असा मन्मथस्वामींचा हा ‘परमरहस्य' ग्रंथ वीरशैवांनी शिवागम व वेद यांसारखा पूज्य मानून संग्रही ठेवला पाहिजे. शोभेचे पुस्तक म्हणून नव्हे, तर पारायणग्रंथ म्हणून. श्रीधरस्वामींच्या ‘शिवलीलामृता'ची वीरशैवांनी आजवर पारायणे केली ती त्या ग्रंथात भगवान शिवाचे गुणसंकीर्तन असल्यामुळे. तो ग्रंथ सामान्य शैवांप्रमाणे वीरशैवांनाही प्रिय वाटला. परंतु आता मात्र वीरशैवांनी सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे करून आपल्या स्वत्वाची आणि धर्माचाराची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी ‘परमरहस्य' हा आदर्श ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे मन्मथस्वामींची वाङ्मयी मूर्ती होय. या ग्रंथातून मन्मथस्वामी आपल्याशी बोलत राहतात, संवाद करतात, आपल्या मनातील शंका-कुशंकांचे सहजपणे निरसन करतात आणि तळहातावर आवळा ठेवून दाखवावा त्याप्रमाणे वीरशैव तत्त्वविचार व आचार सुगम करून सांगतात. आईला आपल्या लेकराच्या भवितव्याची चिंता असते तशी मन्मथस्वामींना मराठी वीरशैवांची वाटते. त्यांच्या चिंतेतून आणि वीरशैवोद्धाराच्या चिंतनातूनच ‘परमरहस्या'ची निर्मिती झाली. त्यांचे वत्सल मातृरूप त्यांच्या साहित्यातून ठायीठायी प्रकट झाले आहे. त्यामुळेच आपण त्यांना ‘मन्मथमाउली' असे संबोधतो. त्यांचे माउलीपण सार्थ ठरले आहेच, पण त्याबरोबर आपले लेकुरपणही सार्थ ठरावे यासाठी ‘परमरहस्या'चा प्रसार-प्रचार केला पाहिजे. हा ग्रंथ विकत घेऊन आपल्या स्नेही-सुहृदांना भेट म्हणून दिला पाहिजे. त्याबरोबरच मन्मथस्वामींनी सांगितलेले वीरशैवाचरणही निष्ठेने केले पाहिजे. ग्रंथसमाप्ती करताना मन्मथस्वामींनी ‘हा परमरहस्य ग्रंथ जें पाहाती । तें शिवरूप स्वयें होती ।' (१७.९०) अशी ग्रंथवाचनाची फलश्रुती सांगितली आहे. तसेच ‘शिवगणीं परिसावा प्रीत्यर्थ । म्हणे मन्मथ कर जोडोनि' (१७.१०४) अशी हात जोडून, हा ग्रंथ प्रेमाने वाचावा, अशी विनंतीही केली आहे. मन्मथस्वामींची विनंती वीरशैवांनी ऐकायची नाही तर कोणी ऐकायची?
या ‘परमरहस्या'चे वैशिष्ट्य असे की, हा ग्रंथ शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांप्रमाणे मुद्रित करण्यात आला आहे. ‘परमरहस्या'चे शुद्धलेखन जुन्या नियमांप्रमाणेच असायला हवे. हा ग्रंथ अनुच्चारित अनुस्वार, तत्सम शब्दांची -हस्वान्त रूपे इ. शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांप्रमाणे छापला आहे. हे कार्य सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. रेवणसिद्ध राचप्पा मगाई यांनी माझ्यासमवेत अत्यंत परिश्रमाने पूर्णत्वास नेले आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथातील संस्कृत श्लोकांचे शुद्धीकरणही संस्कृतज्ञ पं. शिवाप्पा खके यांच्याकडून करून घेतले आहे. हे सर्वजण मन्मथभक्तांच्या धन्यवादास पात्र आहेत.
मन्मथस्वामींच्या ‘परमरहस्या'चे आणि अन्य वीरशैव संतसाहित्याचे पुन:पुन्हा प्रकाशन करून हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. संतसाहित्याचे प्रकाशन कोणीही करू शकतोे, त्यासाठी कोणाच्या अनुमतीची गरज नसते. आपले तत्त्वज्ञान आणि विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत अशी ज्या ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा असते तो ग्रंथ, ‘अमक्यानेच छापावा, तमक्याने छापू नये' असे म्हणायचा अधिकार कोणालाही नसतो. त्यामुळे ‘परमरहस्य' घरोघरी पोहोचविण्याचा जे कोणी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या कार्याचे सर्व वीरशैवांनी मुक्त मनाने स्वागत केले पाहिजे. शेवटी
... हा शिवाचारी शिवभक्तीं ऐकावा ।
ऐकोनि जीवीं धरावा । तैसाचि करावा आचारु ।। १७.९२
...‘परमरहस्य' शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक श्रवण करून त्याला आपल्या हृदयात अढळ स्थान द्यावे आणि ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आचरण करावे... ह्या संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामींच्या शब्दांची आठवण देऊन प्रस्तावना पूर्ण करतो. 

***

Sunday, September 24, 2017

शिवसंत लक्ष्मण महाराजांची अभंगगाथा


डॉ. अशोक कामत

प्राध्यापक व प्रमुख, 
संत नामदेव अध्यासन व संशोधन केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे

***
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात आष्टी हे छोटेसे गाव, धोतरजोड्यासाठी आणि वीरशैव संत लक्ष्मण महाराज यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे महाराजांनी पाच हजारावर मराठी भक्तिरचना करून समाजजागरणाचे थोर कार्य केले. ‘श्री लक्ष्मण गाथा’ लोकसहकार्याने मोठ्या थाटामाटात २१ मे २००१ रोजी आष्टी येथे दहा हजार भाविकांच्या उपस्थितीत प्रकाशित झाली. या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक वीरशैव मठांचे अधिपती उपस्थित होते. वीरशैव वाङ्मयाचे वीस अभ्यासक चर्चा-संवादासाठी एकत्र आले होते. त्यांनी भाविक-उपासक-साधक-गावकरी समाजाला ‘लक्ष्मणगाथे’चे पारमार्थिक वैभव, वाङ्मयीन सौंदर्य आणि सामाजिक नीति-विशेष उलगडून दाखविले.
या प्रकाशनासाठी आष्टीचे मूळ रहिवासी आणि पुण्यातील नामवंत सुवर्णकार श्री. कृष्णकांत राजाराम अष्टेकर हे दानशूर हिंदू दत्त-विठ्ठलभक्त-उपासक आणि प्रा. डॉ. शेषनारायण देवाप्पा पसारकर हे शिवभक्त वीरशैव संशोधक-अभ्यासक एकत्र आले. त्यांनी संतसाहित्य सेवाकार्याचा एक नवा प्रेरक वस्तुपाठ सर्वांसमोर समन्वयशील दृष्टीने ठेवलेला आहे. त्या निमित्ताने ...
***

मराठी संतपरंपरा आणि वीरशैव
महाराष्ट्राच्या समन्वयशील संतपरंपरेत वीरशैव संतमंडळाचे कार्य लक्षणीय आहे. नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इत्यादी धर्मसंप्रदायांबरोबरच वीरशैव मराठी संतकवींनीही मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी चांगला हातभार लावला आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्‍वरांनी (११३२-११६७) मूळच्या उदारमतवादी वीरशैव संप्रदायाची पुनर्बांंधणी मोठ्या उत्साहाने केली. ते स्वत: ब्राह्मण, व्युत्पन्न पंडित आणि राजदरबारीही प्रतिष्ठित. आपल्या शिवानुभव मंटपात विविध ज्ञातिसमाजांच्या स्त्री-पुरुषांना एकवटून त्यांनी देह हेच देवाचे मंदिर आणि ‘कायकवे कैलास’ अर्थात श्रमपूजा हीच ईश्‍वरसाधना हा सिद्धान्त मांडला. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. भक्तीचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध करीत लिहिण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष आचारातून भक्तीचे सामर्थ्य स्पष्ट केले. त्यानंतर विसाखेचरकृत ‘शडुस्छळि’ हा मराठी ग्रंथ वीरशैव-दर्शनावर प्रकाश टाकणारा दिसतो.
तुकारामांचे ज्येष्ठ समकालीन मन्मथस्वामी हे आद्य वीरशैव अभंगकार. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा लाभली. शिवलिंंग, लिंगेश्‍वर, बसवलिंग, महादेव, लक्ष्मण महाराज, शिवदास, गुरुदास, चन्ना, बाळाबुवा कबाडी, शंकर मृगेंद्र, शिवगुरुदास, बसवदास, भावंडीबाई अशी एक मोठी परंपराच वीरशैव मराठी रचनाकारांची आहे. या परंपरेत लक्ष्मण महाराज हे आंग्लाईच्या आरंभी विपुल, वैविध्यसंपन्न आणि मुख्यत: समन्वयशील मराठी रचना करणारे म्हणून सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात.

लक्ष्मण महाराज
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडनजिकच्या साखरखेर्डा मठाचे पलसिद्ध महाराज यांचा लक्ष्मण महाराजांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यामुळे रचनेसाठी प्रेरणा मिळाली, अशी पारंपरिकांची श्रद्धा आहे. पलसिद्धांच्या संजीवन समाधीचे वर्ष इ. स. १०५८ मानले जाते. त्यांना जगद्गुरू, परमहंस, मरुळाचार्य, भूरुद्र अशी चार विशेषणे लावली जातात. प्रत्येकासाठी काही ऐतिहासिक कारण-प्रमाणही मिळते. साखरखेडर्याच्या मठाची परंपरा किमान हजार वर्षांमागे जाते. तो मठ उज्जयिनी पीठाची एक शाखा मानला जातो. उज्जयिनीचे मूळ आचार्य ‘मरुळाराध्य’. त्यांच्या हाती पलाश दंड दाखविला जातो. लक्ष्मण महाराजांनी पलसिद्ध चरित्र लिहिले. त्यातून बसवपूर्व काळातही महाराष्ट्रात वीरशैव प्रभाव मिळू शकतात.
कृष्णाप्पा रऊळगावकर आणि बजाबाई हे लक्ष्मण महाराजांचे आईवडील. ते लिंगायत. शके १७३० मध्ये महाराज जन्मले. बालभक्त होते. अंगाला रक्षा फासून दगडधोंड्यांची पानाफुलांनी पूजा करण्याचा खेळ खेळत. शाळाशिक्षणाकडे लक्ष नसे. ‘ओम् नम: शिवाय’ जप सतत करीत. काही काळ घरचा दुकानदारी व्यापार सांभाळला. विवाह केला. मग विरक्त होऊन साखरखेर्डा येथे प्राचीन श्रीपलसिद्ध मठात जाऊन आध्यात्मिक अध्ययनसाधनेत निमग्न झाले. गुरुकृपेमुळे कवी झाले. नंतर तीर्थयात्रा करून उदंड अनुभव संपादन केला. ओवीबद्ध सिद्धेश्‍वर चरित्र-- पलसिद्धचरित्राची-- रचना केली. पुढे वडील गेले. आष्टीहून आई, पत्नी, बंधु असे परिवारजन भेटीला आले. त्यांनी सुखदु:खाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा उत्तरादाखल ‘शोक करावा कोणाचा? अवघा बाजार मायेचा। लक्ष्मणा आप्त शिव। परब्रह्म महादेव॥’ असा अभंग त्यांनी सर्वांना ऐकविला. त्यांची ती विरक्त दशा सर्वांनाच बोध देणारी ठरली. सार्‍यांनी आष्टीला येण्याचा आग्रह केला. लक्ष्मण महाराज शके १८०० भाद्रपद वद्य दशमी समाधीतिथी पर्यंत आष्टीस राहिले.

काव्यसंपदा
अभंग, पदे, कथात्मक रचना, भूपाळ्या, लोककाव्य मिळून त्यांची ४२५६ अभंगरचना मिळते. १२५३ ओव्या आहेत. १०८ हिंदी पदे मिळतात. या हिंदी कवितेवर अर्थात्च मराठवाडी दक्षिणी हिंदीचा प्रभाव आढळतो. हिंदु-मुसलमानांचे ऐक्य साधणारी ही रचना आहे.
लक्ष्मण महाराजांच्या या प्रासादिक अभंगकाव्यात आपल्या वीरशैव धर्मसंप्रदायाच्या वैशिष्ट्यांचे जतन त्यांनी केले. पण इतर मतांविषयी, अन्य उपासकांच्या आराध्याविषयी देखील उत्कट शब्दांत आदरभाव व्यक्त केला आहे. परस्परांच्या मतांतील आणि पर्यायाने अनेकत्वातील एकत्वाचा बोध घडविणे हे संतकर्तव्य त्यांनी दृष्टीपुढे ठेवले. त्यांनी वारकरी संतांचे काव्य आणि वारकरी आचारविचार अभ्यासला. त्यातील काळानुरूप वैशिष्ट्ये स्वीकारली. अन्य प्रदेशांतील पंथसंघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील वीरशैव आणि वारकरी अथवा अन्य पंथांतील सौहार्द लक्षणीय ठरले ते लक्ष्मण महाराजांसारख्या आणि एकनाथ महाराजांसारख्यांच्या समतोल दृष्टीमुळे! म्हणूनच असे म्हटले गेले:--
जगी झाले होतील अनंत। पंत महंत बुद्धिमंत। परि लक्ष्मणाऐसा संत। विरळाचि असे॥

गाथेची व्याप्ती
‘श्री लक्ष्मण गाथे’चे संपादक डॉ. शे. दे. पसारकर यांनी आपले संपादन-कार्य अतिशय नेटकेपणाने केले आहे. अभ्यासपूर्ण आणि साक्षेपी प्रस्तावना हे या संपादनाचे ठळक वैशिष्ट्य होय. मंगलाचरण, सद्गुरू, शिव, आत्मनिवेदन, उपदेश, गंगामाहात्म्य, स्तुतिपर अभंग, कथात्मक, स्फुट, ओवीबद्ध सिद्धेश्‍वर माहात्म्य आणि सिद्ध-गुरू-परमेश्‍वर इत्यादी स्तोत्रे अशी अभंगांची पद्धतशीर विभागणी केलेली आहे. एकूण अभंगांचे क्रमांक सलग असून अखेरीस सर्व अभंगांची प्रथमचरणसूत्री शास्त्रीय पद्धतीने करून ती जोडलेली आहे. त्यामुळे गाथेतील कोणताही अभंग पटकन मिळू शकतो.

भवानी, अंबामाता, रुद्र, विश्‍वनाथ, शिवशंकर, भीमाशंकर, सिद्धेश्‍वर, खंडेश्‍वर, नगरेश्‍वर, घृष्णेश्‍वर, दत्तात्रेय, वीरभद्र, व्यंकटेश, मल्हारी, हनुमंत, नरसिंह अशा विविध देवदेवतांच्या शंभरावर आरत्या इथे आहेत. त्यात शंभुमहादेवाच्या अधिक आहेत. संतसज्जनांच्या आहेत. शैव आणि वैष्णव अशा दोहोंना प्रिय असणार्‍या देवदैवतांच्या आहेत.
आरत्याखेरीज भूपाळ्या, अष्टके, आर्या, ज्योतिर्लिंगविषयक पदे, कथात्मक पदे आणि कापडी-बाळसंतोष-पिंगळा-वासुदेव-जोगवा-गोंधळ अशी लोककाव्यात्मक स्फुट अभंगरचना गाथेत (३३११--४१६०) सुमारे साडेआठशे आहे.
शिवमहिमा, शिवपाठ, शिवगण, शिवयोगी इत्यादी शिववर्णन व प्रशंसापर अभंग (अ. २५२-७३५) पावणेपाचशेच्या घरात आहेत. कथात्मक अभंग, स्फुट रचना, स्तुतिपर अभंग, इत्यादीत शिवविषयक अभंग येतात. उपदेशपर रचनेतही शिवभक्ती दिसते.
आत्मनिवेदनपर रचनेत ईश्‍वरदर्शनाची उत्कंठा, करुणा, सलगी, प्रेमकलह, प्रेमनिष्ठा, शिवजीवैक्य, अद्वैत (अ. ७३६-१३०५) असे सुमारे पावणेपाचशे अभंग आहेत.

म. बसवेश्‍वर-वंदना
महात्मा बसवेश्‍वरांनी वीरशैव पंथाची पायाभरणी केली असे एक मत आहे, तर पंचाचार्यांनी ती फार पूर्वीच केली आणि मूळच्या उदारमतवादी संप्रदायाची पुन्हा एकदा कालानुरूप उभारणी करण्याचे ऐतिहासिक कार्य बसवेश्‍वरांनी केले, असे दुसरे एक संतुलित मत आहे.
बसेवश्‍वर मंगळवेढ्यात वावरले. त्यांची कर्मभूमी पंढरीनजिक राहिली. त्यांचा काळ आणि कार्य ध्यानी घेता त्यांचा प्रभाव महानुभावपंथीय चक्रधरस्वामी आणि नाथपंथीय योगीराज ज्ञानदेव यांचेवर पडला असे मानण्यास अडचण असू नये. पण बसवेश्‍वरांना समकालीन राजदरबारी स्वकीयांनी, कर्मठ-धर्मठांनी विरोध केला. पुढेही त्यांची उपेक्षा झाली. मराठी परंपरेत साधा बसवेश्‍वरनिर्देशही कुठे दिसून येत नाही. मराठी वीरशैव संतवाङ्मय मन्मथोत्तरकालीन आढळते. त्यातही बसवेश्‍वरांचा उल्लेख ओझरता येतो. लक्ष्मण महाराजांनी पूर्वसंतांचे स्तुतिपर वर्णन केलेले आहे. त्यात सिद्धपुरुष म्हणून आचार्य रेवणसिद्ध (अ. २४३६-२४४६), आचार्य पंडिताराध्य (अ. २४४७-२४५७), आपले परमगुरू पलसिद्ध (अ. २४८०, ९८ चरण), अल्लमप्रभू (अ. २४८१-२४९१) या थोर वंदनीय शैव वीरांची प्रशंसा त्यांनी गायिलेली आहे. पुढे बसवेश्‍वरविषयक अभंग क्र. २४९२ ते २५३८ असे तब्बल सेहेचाळीस आहेत.
‘बसव’ अक्षर जपाने पापसंहार होतो, कारण ‘बकार’ हा शब्द बद्धउद्धारक तर ‘सकार अंतरी कार्य साधे’ असे आहे. ‘बकार’ शब्दात वासनेचे मूळ मिळते. त्यामुळे बसव-जप ‘मायापापविमोचक, कार्यसिद्धीदायक’ असा आहे. (अ. २४९२)
शिवयोगी ध्याती बसवलिंगाप्रती। मायापाश भ्रांती नुरे तेथे॥
लक्ष्मण म्हणे ब्रह्मरूप होती। बसवलिंगाप्रती शरण व्हा हो॥ (अ. २४९३)
बसवेश्‍वर हे शिवाचे आत्मा, अनादी प्रभुत्व आहेत, साक्षात् शिवच आहेत, ‘बसवेश्‍वर तोचि ईश्‍वर’ आहेत, ‘वीरशैवामाजी शूर। आहे शैवांचे माहेर’, ‘कृपामूर्ती आणि सिद्धांचे माहेर’ आहेत, अशी स्तुतिसुमनांजली परोपरीने उधळतात.
‘कल्याणी अवतार घेतला प्रभोने। धर्मरक्षण केले ताते।’ हे बहुधा ते ‘बसवपुराणी प्रसिद्ध हो।’ म्हणून जाणतात. ‘बसवण्णाचे भक्त सर्वदा विजयी’ किंवा ‘बसव गणांचा अधिकारी जाणा’ म्हणणारे लक्ष्मण महाराज बसवेश्‍वरांनी ‘अनुभवमंटपा’द्वारे समाजजागरण कसे केले, ‘कायकवे कैलास’ असे अभूतपूर्व भक्तिदर्शन प्रकट करून त्यांनी शिवशरण-शरणसिंह क्रांतिप्रयत्न कसे केले, त्याचे परिणाम काय झाले, याबद्दल काही लिहीत नाहीत. हे असे का व्हावे? उलगडा होत नाही.
असेच सोलापूरच्या श्रीसिद्धरामेश्‍वरांचे भक्तवर्णन (अ. २५३९-२५६२) विस्ताराने ते करतात. त्यातही ‘सोलापुरी सिद्धराम। केवळ परमात्मा निष्काम’ शिवयोगी, शिवज्ञानी - केवळ स्वानंदाची खाणी, ज्ञानाचे आगर, स्वानंदधाम, ज्ञाननिधी -- राबतात सर्व सिद्धी, योगामाजी प्रवीण अशी प्रशंसा नानाप्रकारे मिळते. पण सिद्धरामांच्या सामाजिक कार्याचे वर्णन मिळत नाही.

मन्मथस्वामीविषयक जाण
‘ब्रह्मज्ञानी मन्मथस्वामी’ हे ‘वीरशैव सिद्धपुरुष’. त्यांनी ‘सखा केला नीलकंठ’. ‘शुद्ध बुद्ध नित्य मुक्त’ राहून ‘निवांत मन्मथस्वामींनी ‘पावन करितो दीनाला।’ असा ‘भक्तिपंथ स्थापिला’ (अ. २५८० ते २५९०) इत्यादी लक्ष्मण महाराजांनी केलेले अनेक उल्लेख त्यांची वीरशैव सांप्रदायिक अचूक जाण आणि निष्ठाही व्यक्त करतात.
कर्नाटक-महाराष्ट्रातील परिस्थितीत असणारे अंतर आणि एकूण मराठी समाजाचे प्रश्‍न ध्यानी घेऊन मन्मथस्वामींनी स्वधर्मबांधवांना ‘निजू नका जागा जागा। आपुल्या स्वधर्माने जागा।’ असे निक्षून सांगून ‘सोडोनि शिवातें दुजियाते ध्याती। त्यांचे तोंडी माती जन्मोजन्मी।’ असा खणखणीत इशारा दिला. त्यांनी कन्नड वचनपरंपरा न स्वीकारता वारकरी पंथीयांप्रमाणे ओवी-अभंगांतून शिवभक्तीची अभिव्यक्ती केली. कीर्तनपरंपरा जोपासली. भजनीमंडळे उभी केली. हरिपाठाप्रमाणे ‘शिवपाठ’ तयार केले. एक प्रकारे इथल्या मराठी मातीशी विशेष अनुबंध राखून आपली शिवसाधनाही केली. मायमराठीची जपणूकही केली. तुकारामोत्तर काळातील मराठी अभंगरचना वारकरी कीर्तनात नाकारली गेल्यामुळे जी मराठीची हानी झाली, ती काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न वीरशैव मराठी संतांनी केला. त्यात समतोल, समन्वयशील काव्यरचना करणार्‍या लक्ष्मण महाराजांचे योगदान फार महत्त्वाचे ठरते.

समन्वयशील वृत्ती हवी
लक्ष्मण महाराज मूळचे शिवभक्त. त्यांची गुरुपरंपरा शिवोपासकांची. ज्या मठमंदिरात त्यांची जडणघडण झाली आणि ज्या ज्ञातिसमाजाने त्यांना आधार आणि आदर दिला, तोदेखील कट्टर शिवपूजक. पण महाराज सहजपणे राम, कृष्ण आणि विठ्ठलविषयक रचना करतात. ‘शिव तोचि राम जाणा। राम तोचि शिव माना॥’ अशी अभेददृष्टी व्यक्त करतात. त्यांची गाथा अनुभवसिद्ध आहे. सर्वसामान्य मुमुक्षू साधकापासून सिद्ध पुरुषापर्यंत सार्‍यांचे आध्यात्मिक मनोरथ पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न दिसतो. तो उदार विचारसरणीमुळे आणि सुबोध प्रासादिक भाषेमुळे अधिक प्रभावी वाटतो.
‘काय भुललासी मतिमंदा। शरण जाय त्या गोविंदा।’ असे सांगत ते इशारा देतात. ‘द्रव्य जोडिले कोट्यानुकोटी। हाती न ये बा लंगोटी॥’ आप्तसोयरे सांगाती कायम येत नाहीत. म्हणून ‘लक्ष्मीकांत सखा करी’ असा सल्ला त्यांनी दिला आहे. ‘लक्ष्मण म्हणे व्हा सावध। ग्रंथ पाहा दासबोध।’ अशा स्वच्छ शब्दात ते व्यावहारिक ज्ञानकोश म्हणून प्रसिद्ध असणारा रामदासांचा ग्रंथराज वाचण्यासाठी आवाहन करतात. त्यांच्या एकूण रचनेवर रामदासी वक्तृत्वशैली, विशिष्ट शब्दांची आवृत्ती करून विषयविस्तार करीत प्रभावी रीतीने मांडण्याची पद्धती यांचा प्रभाव आढळून येतो.

शब्दज्ञानाने नाश
संतभक्तांनी नेहमीच जीवनानुभवाला महत्त्व दिले. ते विश्‍वाचा विचार करतात. सृष्टीचे मननचिंतन करतात. अनुभूतीला प्राधान्य देतात. त्यांनी शब्दपांडित्याकडे दुर्लक्ष केले. केवळ घटपटाचे तर्कट करीत विचार मांडणारे तर्कपंडित आणि राजदरबारी मानाने मिरविणारे पंडित त्यांना कधीच महत्त्वाचे वाटले नाहीत. संत लोकदरबारात राहिले. तर्कापेक्षा प्रेमाची वाणी त्यांनी स्वीकारली. लोकांच्या सुखदु:खात सहभागी होऊन लोकभाषेतून ती व्यक्त करणे आणि आत्मज्ञानाबरोबर त्यांना स्नेहमैत्रीने आत्मभान घडविणे हे त्यांनी लोककार्य म्हणून आनंदाने स्वीकारले. किंबहुना त्यासाठीच ते काही काळ लोकांतात राहिले. एरव्ही ते नित्य निजानंदात मग्न होते. लक्ष्मण महाराजांची ही उक्ती या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे:-- 
शब्दज्ञानियाते काय लाभ झाला। भांडताचि गेला जन्म व्यर्थ॥
वृषभाचे पाठी शर्करेची गोणी। वाहताचि कष्टी झाला पशू॥
आपल्या पोळीवर तूपसाखर घेणारे श्रीमंत अनेक असतात. त्यांना लौकिक सुखे काही काळ मिळत जातात. सर्वसामान्य माणसे भक्तिज्ञानाअभावी पशूप्रमाणे सार्‍या सुखानंदाला पारखी होतात. जे ज्ञानसंपन्न भक्तसाधक असतात, ते मात्र निरंतर निजानंदाचा सोहळा अनुभवतात. म्हणून महाराज याच अभंगात पुढे म्हणतात:--
श्रीमंत लोक भक्षिती शर्करा। पशुप्रती चारा तृण प्राप्त॥
अन्नाचे पर्वत नेत्राने पाहिले। तरी काय धाले पोट त्याचे॥
लक्ष्मण म्हणे अर्थ घेती भक्त। निजानंदे तृप्त निरंतर॥ (अ. १६४४)
अशा रीतीने लोकसमाजाच्या व्यवहाराचे अर्थपूर्ण निरीक्षण करीत त्यातून विशुद्ध वर्तन-व्यवहारासाठी चपखल उदाहरणे घेऊन लक्ष्मण महाराजांनी प्रभावी रीतीने आपली वाणी उच्चारली. लोकप्रबोधन घडविले.

मनोबोधाचे अभंग
समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्‍लोक’ अथवा मनोबोधाच्या धर्तीवर काही रचना गाथ्यात मिळते. ती अतिशय सुबोध, प्रासादिक आणि आशयघन आहे. उदा.:--
मना तुचि अनिवार। तुझा मारा आहे थोर।
मना तुम्ही मोठे ठकविले। महाज्ञाते भ्रष्टविले॥
मनाचा अनावरपणा असा साध्या शब्दांत सांगून मानवी जीवनावर मनाचाच ‘मारा’ वा बळजबरी कशी होत असते आणि मोठमोठे ज्ञानी मनाच्या कमकुवतपणामुळे पथभ्रष्ट कसे झाले, अनेक थोर आणि मान्यवर त्यांच्या मनाकडूनच ठकविले-फसविले गेले, हे सांगून पुढे ते ‘मनोदेवा’लाच विनम्र होऊन प्रणिपातपूर्वक अशी प्रार्थना करतात:--
मना तुम्हा नमस्कार। मी अनाथ हो किंकर।
स्वस्थ्य रहा तुम्ही मना । नका छेडू लक्ष्मणा॥ (अ. १७०४)
लक्ष्मण महाराजांचे फारसे शिक्षण झालेले नव्हते. पण भरपूर वाचन मात्र त्यांनी केले होते. त्यांची मराठी भाषा सुगम, सुबोध आणि सबोधही आहे.
उपदेशपर रचनेद्वारे त्यांनी सामान्य साधक, साधारण माणूस यांचेबरोबर साधु, योगी, ज्ञानी, संत इत्यादीचे आचार-व्यवहार कसे असायला हवेत याचा बोध घडविला आहे.

स्वधर्माचे प्रयोजन
ज्ञानदेवांनी आपल्या ‘भावार्थदीपिके’त स्वधर्माची उकल अतिशय चांगल्या रीतीने केली होती. त्यांना ‘स्वधर्मा’तून प्रत्येकाचे कार्यकर्तव्य सांगायचे होते. लक्ष्मण महाराजापुढे हा भाव आहेच. याशिवाय काळचक्रामुळे जो परधर्मीय सांस्कृतिक आघात स्वदेश, स्वभाषा आणि स्वबांधव यांवर झाला त्याचा प्रतिकारही त्यांना करावयाचा आहे. ते म्हणतात:--
स्वधर्म लोपी तो जाणावा चांडाळ। स्वधर्माचे बळ सर्वाप्रती॥
ब्रह्मा विष्णू रुद्र वेदसिद्ध मुनी। म्हणती स्वधर्माने चालावे हो॥
इथे ब्रह्मा-विष्णु-महेशाचे ऐक्य तर सांगितले आहेच, पण त्याबरोबर वेदसिद्ध ऋषिमुनींचाही उल्लेख आहे. इथे सांगितलेला धर्म कोणताही विवक्षित धर्म वाटत नाही. तो सीमित मर्यादित नाही. तो सनातन भारतीय आहे, जो ईश्‍वरतत्त्वाला प्राधान्य देतो. महाराज पुढे लिहितात:--
अवतार होती धर्म हो स्थापिती। परधर्मी गती कैसी होय॥
ज्याचा त्यासी धर्म अनादि चालला। परधर्म घाला मोठा आहे॥
आमच्या देशात वेळोवेळी देवांनी आणि नरनारायणांनी अवतार घेऊन विशुद्ध धर्माचे रक्षण केले आणि कालानुरूप त्याची पुन:स्थापना केली. परधर्माचे आक्रमण झाले तरी हे ब्रीद राखले गेले. परधर्माचा आलेला नवा ‘घाला’ अर्थात् घाव मोठा आहे. त्याच्यावर मात करून स्वधर्मरक्षणासाठी लक्ष्मण महाराज म्हणतात:--
लक्ष्मण म्हणे स्वधर्म आपुला। रक्षी तो देवाला फार प्रिय॥
असे आगळेवेगळे धर्मरक्षण त्या इंग्रजी आमदानी अवतरण्याच्या काळात लक्ष्मण महाराजांनी केले. त्यामागे स्वदेश, स्वभाषा, स्वसमाज आणि स्वसंस्कृतीवरील अनन्य निष्ठा आहे. मूर्तिभंजक आणि अतिरेकी, अत्याचारी, परधर्मीय आक्रमकतेविरुद्ध सौम्य प्रतिकारही आहे.

हरिहर एक, भेद नाही
संत नामदेवरायांनी म्हटले होते. ‘शिव तोचि विष्णू, विष्णू तोचि शिव’, ‘हरिहरा भेद नाही’, हरिहर आले खेवा’ अर्थात् शिव आणि विष्णू एकेठायी नांदत असतात. ‘जय जय रामकृष्ण हरि’ असाच वारकरी बीजमंत्र आहे. सगुण-निर्गुण नामरूपाचे ऐक्य ही भक्तीची विशुद्ध बैठक मराठी संतांनी विशद केली. लक्ष्मण महाराज हीच ‘बैसका’ ठेवून म्हणतात:-
शिवाते निंदिती विष्णूते पूजिती। भेद ती हो भक्ती, आम्हा दिसे॥
हरिहर एक, भेद तिथे नाही। द्वैताचे नाही काम येथे॥
विष्णू-शिवाचे, हरि-हराचे अद्वैतच आहे. जे हे जाणीत नाहीत ते ‘भेदभक्ती’ करतात, भक्तीच्या नावावर संघर्ष उत्पन्न करतात. भक्ती हीच मुळात अभेद सांगते. अद्वैताचा पुरस्कार करते. महाराज पुढे सांगतात:--
ब्रह्माण्ड व्यापार चालावा म्हणून। त्रयमूर्ती आपण झाले देव॥
ब्रह्मा विष्णु रुद्र त्रिमूर्ती सगुण। करिती रक्षण नाना युवती॥
लक्ष्मण म्हणे भेदाते ग्रासून। करावे भजन एकचि ते॥
लक्ष्मण महाराजांनी अशा अनेक अभंगांतून अनाग्रही, अभेद भक्तीचे प्रतिपादन केले. भजनांतून जर अशी समन्वित अनुभूती लाभली तर आनंदाला सीमा राहात नाही. महाराजांच्या अशा उपदेशांनीच भक्तिसाधनेच्या क्षेत्रात सामंजस्य वाढले. वारकरी--वीरशैव मोठ्या संतोषाने एकत्र नांदत राहिले.

समारोप
लक्ष्मण महाराजांसारख्या साधक-सत्पुरुषालाही ‘पंढरीचा प्रेमा’ वाटला. ‘भवनाशनी पंढरी। पाहू चला हो झडकरी॥ पूर्णब्रह्म तो श्रीहरी। भीमातटीं शोभतसे॥’ (अ. २६६९) ही त्यांची पांडुरंगाविषयींची ओढ अन्य वीरशैवांनाही पुढे वाटत राहिली. ही त्यांच्या समन्वयदृष्टीची सार्थकता म्हणावी लागते. गाथेचे संपादक डॉ. शे. दे. पसारकर यांचा हा अभिप्राय या संदर्भात फार बोलका ठरतो:--
‘‘आपापल्या संप्रदाय-वैशिष्ट्यांचे जतन दोन्ही संप्रदायांनी केले, परंतु ते करताना कटुता किंवा असहिष्णुता त्यांनी निर्माण होऊ दिली नाही. परस्परांच्या मतांचा आदर करीत, अनेकत्वातील एकत्व जाणून घेत दोन्ही संप्रदायांची वाटचाल सुरू होती. दक्षिणेतील धर्मसंगराच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील वीरशैव आणि वारकरी संप्रदायातील सौहार्द लक्षणीय आहे.’’
हे अद्भुत सांस्कृतिक सौहार्द सांगणारी श्रीलक्ष्मण महाराजाची गाथा सुसंपादित स्वरूपात समाजापुढे ठेवल्याबद्दल डॉ. शे. दे. पसारकर यांचे अभिनंदन करायला हवे.

***

Saturday, September 2, 2017

(विभूतिवैभव, अंक ९५)



विदर्भातील वीरशैव संप्रदाय

पार्श्‍वभूमी व स्वरूप


डॉ० अशोक गंगाधर मेनकुदळे

एम्०ए०, पीएच्०डी०

Friday, September 1, 2017

(विभूतिवैभव, अंक ९७)

ज्ञानदेवांचे अनोखे भावविश्‍व


वेलु गेला गगनावेरी

स्वाती साखरकर कराळे

Wednesday, August 30, 2017



(विभूतिवैभव, अंक १०१)

श्री १००८ जगद्गुरू
डॉ० चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी
वेदान्ताचार्य, पीएच्०डी०, डी०लिट्०

अंगषट्स्थलांतर्गत माहेश्‍वरस्थल

अष्टमूर्तिनिरसनस्थल

जिज्ञासू सद्भक्तांनो,

दर्शनशास्त्रात भगवत्तत्त्व सर्वत्र दाखविण्याची एक परंपरा आहे. भगवत्तत्त्व अन्यत्र नसून एकाच ठिकाणी आहे असे सांगणारीही दुसरी परंपरा आहे. भगवत्तत्त्व सर्वत्र आहे ही परंपरा माहेश्‍वरस्थलातील साधकाला विरोधी ठरते. म्हणून येथे तिचे निरसन केले आहे. भारतीय दर्शनशास्त्रात पृथ्वीपासून आत्म्यापर्यंत ईश्‍वराच्या आठ मूर्ती मानल्या जातात.

पृथिव्याद्यष्टमूर्तित्वमीश्‍वरस्य प्रकीर्तितम्।_
तदधिष्ठातृभावेन न साक्षादेकभावत:॥
(श्रीसिद्धान्तशिखामणी, १०.४९)

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते; सूर्य, चंद्र आणि आत्मा या ईश्‍वराच्या अष्टमूर्ती होत. अर्थात् या ईश्‍वराच्या आठ आकृती आहेत. आपल्या देशात जडाची पूजा होते आणि चैतन्याचीही पूजा होते. जड व चेतन यांत ईश्‍वरत्व समान आहे हे दाखवण्यासाठी जडाची पूजा सांगितली आहे. ज्योतिर्लिंगे बारा आहेत. त्याप्रमाणे पंचमहाभूते ही पंचलिंगे मानली जातात. दक्षिण भारतात ही पाच भौतिक लिंगे प्रसिद्ध आहेत.

पृथ्वी, जल इत्यादींना ईश्‍वर मानणारी परंपरा का आहे? अत्यंत सूक्ष्म तत्त्व स्थूल दृष्टीच्या मनुष्याला समजावून सांगणे कठीण असते. जे आपल्या दृष्टीला दिसते त्यामध्ये प्रथम भगवत्तत्त्वाचे प्रतिपादन केले पाहिजे. जे स्थूल दृष्टीला दिसत नाही आणि ज्याचा साक्षात्कार होणे अवघड आहे त्यामध्ये भगवत्तत्त्व दाखवल्यावर लोकांना पटत नाही. पंचमहाभूते ही अनुभवगोचर आहेत. पृथ्वीवर आपण राहतो, जलामुळे आपले जीवन आहे, अग्नीमुळे आपण जिवंत आहोत, वायूमुळे आपण श्‍वसन करतो, आकाशात आपला निवास आहे, सूर्य, चंद्र आपल्याला प्रकाशमान करतात आणि आत्म्यामुळे सारे व्यवहार घडतात. स्थूलातील स्थूलात ईश्‍वर आहे असे सांगण्याची परंपरा यामुळे निर्माण झाली.

वर्षप्रतिपदेला चंद्राची कोर पाहिली तर ती जशी वृद्धिंगत होत जाते तसे आपले आयुष्य, विद्या, धन वृद्धिंगत होत जाते, असा एक समज आहे. ही प्रतिपदेची कोर अत्यंत सूक्ष्म, एखाद्या रेषेसारखी असते. ती दुसर्‍याला दाखवताना एखाद्या झाडाच्या फांदीसमोर ‘तिच्या आसपास पाहा’ असे सांगून दाखवावी लागते. यालाच ‘शाखाचंद्रन्याय’ म्हणतात. सूक्ष्म वस्तू दाखवण्यासाठी प्रथम स्थूल वस्तू दाखवावी लागते. त्याचप्रमाणे सर्वव्यापक चैतन्याला दाखवण्यासाठी प्रारंभिक अवस्थेत ‘पृथ्वीच ईश्‍वर आहे’ असे सांगावे लागते. म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. सकाळी अंगणात सडा घालून त्यावर रांगोळी घालतात. ही पृथ्वीचीच पूजा होय. सकाळी उठल्यानंतर बिछान्यावरून खाली जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीला नमस्कार करण्याची एक परंपरा आहे:-

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादाघातं सहस्व मे।

पृथ्वी ही विष्णूची पत्नी आहे. तुला मी नमस्कार करतो, कारण आता दिवसभर तुझ्या अंगावर पाय ठेवून वावरायचे आहे, मला क्षमा कर. पृथ्वीत ‘क्षमा’ हा गुण आहे. म्हणून तिला ‘क्षमया धरित्री’ असे म्हणतात. ती सारे काही सहन करते. पृथ्वीला भगवत्तत्त्व मानून तिची पूजा केली जाते. गंगादी नद्यांची अर्थात् जलाची पूजा करतात. स्वयंपाक करण्याआधी चुलीची पूजा करण्याची पद्धती होती. त्यानंतर अग्निपूजा करून स्वयंपाक केला जात असे. अगरबत्ती इत्यादी सुगंधी द्रव्ये जाळून वायूची पूजा करतात आणि मौन धारण करणे हीच आकाशाची पूजा होय. शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून त्याला विश्रांती देण्यासाठी मौन धारण केले जाते. सूर्यचंद्रांची पूजा तर नित्य होत असते. आत्म्याची पूजाही आपण शरीरपोषण करून एकप्रकारे करीत असतो.

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य व आत्मा ही परमेश्‍वराची रूपेच आहेत. परंपरेने त्यांची पूजादेखील केली जाते. परंतु माहेश्‍वरस्थलातील साधकासाठी या अष्टमूर्तीच्या पूजेचा निषेध केलेला आहे. जर अष्टमूर्तीची पूजा त्याने केली तर त्याच्या लिंगनिष्ठेला बाधा येऊन त्याचे मन विचलित होण्याची शक्यता आहे. आठ ठिकाणी केली जाणारी पूजा जर मनोभावाने एकाच ठिकाणी केली तर पूजेचे फल लवकर मिळते. म्हणून माहेश्‍वरासाठी आचार्य सांगतात की, पृथ्वी आदी अष्टमूर्ती म्हणजे साक्षात् शिव नव्हे तर ठिकाणी शिव अधिष्ठातृभावाने वास्तव्य करतो. पृथ्वी ईश्‍वर नव्हे, तर पृथ्वीत ईश्‍वर आहे. अशा प्रकारे अष्टमूर्तीत ईश्‍वराचे अधिष्ठान आहे. शिवालयात गेल्यावर शिवलिंगाचे पूजन हे मुख्य कर्म आहे. परंतु मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण पायरीला नमस्कार करतो. नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो. मंदिराच्या भिंतीला नमस्कार करतो. मंदिराच्या भिंतीला पाय लागला तरी चूक झाली या भावनेने नमस्कार करतो. घराच्या भिंतीला पाय लागला तर नमस्कार का करीत नाही? एवढेच नव्हे तर काही लोक राग आल्यावर इतरांना मारता येत नाही म्हणून घरातल्या भिंतीवर लाथा घालतात. मंदिर आणि घर यांत अंतर कोणते? तर मंदिरात शिवाचा निवास असतो आणि घरात जीवाचा. ईश्‍वराच्या वास्तव्यामुळे मंदिरदेखील ईश्‍वरासारखे पूज्य, वंदनीय मानले जाते. त्याचप्रकारे पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, सूर्य व चंद्र यांच्यात ईश्‍वराचे अधिष्ठान आहे म्हणून ते पूज्य आहेत. परंतु ते प्रत्यक्ष ईश्‍वर नव्हेत.

प्रपंच हे कार्य आहे, त्यावरूनच आपण त्याच्या कारणाचे अनुमान करीत असतो. अनुमान हे असे प्रमाण आहे की वस्तू प्रत्यक्ष दिसत नसली तरी तिचे ज्ञान आपण मिळवू शकतो. अरण्यात धुरांचा लोट दिसला तर तेथे अग्नी आहे असे आपण अनुमान करतो. अग्नी आपल्या दृष्टीला दिसत नाही. तरी ‘यत्र यत्र धूम: तत्र तत्र वन्हि:।’ म्हणजे जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो, या न्यायाने आपल्याला त्याचे ज्ञान होते. याला आधार कोणता? तर आपले स्वयंपाकघर. अलीकडे धूर नसलेल्या चुली म्हणजे स्टोव्ह, गॅस इत्यादीमुळे हे विधान थोडे बदलावे लागेल. परंतु चूल जेव्हा लाकडे घालून पेटवतात तेव्हा तेथे हमखास धूर असतो. म्हणून धूर तेथे अग्नी असलाच पाहिजे. घरातला हा अनुभव अरण्यात उपयोगी पडतो. धूर हे कार्य आणि अग्नी हे कारण. अग्नी नसेल तर धूर राहणार नाही. त्याप्रमाणे एवढा विशाल प्रपंच हे कार्य असेल तर त्याचे कारणदेखील असलेच पाहिजे, असे अनुमान-प्रमाणाने सिद्ध होते. कारणाशिवाय कार्य कधी होत नाही. टेबल-खुर्च्या झाडामधून तयार होऊन पडत नाहीत. त्यांची निर्मिती करणारा कोणीतरी सुतार असतो. म्हणून एवढे महान ब्रह्मांड निर्माण करणारा कोणीतरी विलक्षण निर्माता असला पाहिजे. तो आपल्यापेक्षा महान आहे. आपण पृथ्वी निर्माण करू शकत नाही. वायू, अग्नी, आकाश निर्मू शकत नाही. फार तर दगडमाती घेऊन एखादे घर, मंदिर निर्माण करू शकतो. परंतु दगड-माती आपण निर्माण करीत नाही. म्हणून पृथ्वी, वायू इत्यादी ईश्‍वर का नाहीत? कारण ते एक कार्य आहे. कार्य करणारा त्यापेक्षा विलक्षण आहे. वस्त्रे आणि वस्त्रे निर्माण करणारा विणकर हे वेगळे असतात. टेबल-खुर्ची आणि ते घडविणारा सुतार हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचभूते आणि त्यांची निर्मिती करणारा हे वेगळे आहेत. घट आणि कुंभार यांच्यात भिन्नत्व असते. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य-चंद्र हे त्यांच्या निर्मात्यापासून- ईश्‍वरापासून भिन्न असतात.

पृथ्वी आदी अष्टतत्त्वे मग ईश्‍वराची काय आहेत? तर ती त्याची शरीरे आहेत. शरीर आणि आत्मा हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी तत्त्वे आणि ईश्‍वर यांचा संबंध असून ते परस्परांपासून भिन्न आहेत.

शरीरभूतादेतस्मात् प्रपंचात् परमेष्ठिन:।
आत्मभूतस्य देवस्य नाभेदो न पृथक्स्थिति:॥ १०.५२

शरीर व आत्मा एक प्रकारे भिन्न आणि एक प्रकारे अभिन्नदेखील आहेत. शरीर आत्मा नव्हे आणि आत्मा शरीर नव्हे. परंतु शरीराशिवाय आत्म्याला प्रकट होता येत नाही. जीवात्म्याचे सारे व्यवहार शरीराद्वारेच घडतात. म्हणून पृथ्वी आदी अष्टतत्त्वे आणि ईश्‍वर हे भिन्न आहेत आणि अभिन्नदेखील आहेत. अर्थात् त्यांच्यात भेदाभेद आहे. ते साक्षात् शिवस्वरूप नाहीत.

येथे एक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य व चंद्र ही सात तत्त्वे ईश्‍वरापासून भिन्न आहेत हे पटू शकते. परंतु आत्मा हा तर ईश्‍वरांश आहे, तो ईश्‍वरापासून भिन्न कसा असेल?

अचेतनत्वात् पृथ्वादेरज्ञत्वादात्मनस्तथा।
सर्वज्ञस्य महेशस्य नैकरूपत्वमिष्यते॥ १०.५३

जे चेतन असते ते स्पष्टपणे प्रतीत होत नसते. जीवात्म्यात जसे चैतन्य अभिव्यक्त होते तसे ते पृथ्वीत होत नाही. सामान्यत: पृथ्वी जड मानली जाते. यद्यपि तिच्यात देखील चैतन्य आहे, परंतु ते गूढ असल्यामुळे त्याची प्रचीती येत नाही. म्हणून आपण पृथ्वीला जड मानतो. याचप्रकारे अन्य महाभूतांना जड मानतो. परमात्मा चेतन आहे आणि पृथ्वी आदी महाभूते अचेतन आहेत. चेतन आणि अचेतन यांच्यात सामरस्य असू शकत नाही. पाण्यात पाणी मिसळते. दुधात दूध मिसळते. परंतु दोन भिन्न वस्तू समरस होऊ शकत नाहीत. दुधात पाणी मिसळले तरी दूध व पाणी वेगळे करता येते. हंसपक्षी दूध व पाणी वेगळे करतो असे म्हणतात. हंसपक्षी आज सापडणार नाही. परंतु दुधात थोडे मीठ टाकले किंवा लिंबू पिळले तरी दूध आणि पाणी वेगळे करता येईल. म्हणून दोन भिन्न वस्तू वरवर पाहता मिसळलेल्या दिसल्या तरी त्या एकरूप होत नाहीत. त्या वेगळ्या करता येतात. पृथ्वी आदी महाभूते आणि परमात्मा हे समरस होऊ शकत नाहीत. जड असल्यामुळे पृथ्वी आदी परमात्मा नाहीत.

आता प्रश्‍न राहिला आत्म्याचा. आत्मा तर चेतन आहे. महावाक्यात तर आत्म्यालाच परमात्मा म्हटले आहे. ‘तत्त्वमसि श्‍वेतकेतो।’ अर्थात् तूच ब्रह्म आहेस, तूच परमात्मा आहेस. मग आत्मा परमात्मा का नाही? तर जीवात्मा अज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. अज्ञ याचा व्यावहारिक अर्थ येथे अभिप्रेत नाही. कोणताही मनुष्य स्वत:ला अज्ञ समजायला तयार नसतो. परंतु प्रत्येकाच्या आत अज्ञान निरंतर वास करते. एखाद्याला वडिलाचे नाव विचारले तर तो सांगू शकेल. मग पुढचा प्रश्‍न- आजोबाचे नाव काय? तो सांगेल. पणजोबाचे नाव काय? खापरपणजोबाचे नाव काय? त्याला सांगता येईल. परंतु त्यापुढे विचारत राहिलो तर त्याला सांगता यायचे नाही. त्याला सांगता येत नाही याचा अर्थ त्याला त्याचे ज्ञान नाही, म्हणजेच अज्ञान आहे. असे अन्य कोणत्याही विषयाबद्दल विचारीत राहिलो तर केव्हा ना केव्हातरी स्वत:चे अज्ञान मान्य करावे लागते. बरेच लोक स्वत:ला अज्ञानी मानत नाहीत. परंतु केव्हातरी त्यांचे अज्ञान सिद्ध होते. आपण समोरच्या व्यक्तीला पाहू शकतो. परंतु आपल्या पाठीमागे कोण आहे त्याला पाहू शकत नाही. अर्थात् आपल्या पाठीमागचा परिसर आपल्यासाठी अज्ञातच असतो. इंद्रियापुढे जो विषय येतो त्याचे ज्ञान आपल्याला होते. इंद्रियापलीकडे जे आहे त्याचे ज्ञान सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडे आहे. योगीपुरुषांना अतींद्रिय वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. दृष्टी जेथपर्यंत पोहोचते तेवढे ज्ञान आपल्याला मिळते. दृष्टीपलीकडे जे आहे ते ज्ञान होत नाही. काही साधना केल्यानंतर ते होऊ शकेल. योगीपुरुषांना तर पूर्वजन्माचे देखील ज्ञान होते. बौद्धांच्या परिभाषेत या ज्ञानाला ‘जातिस्मरण’ म्हणतात. धारणाशक्तीला मागे मागे ढकलत नेले तर पूर्वजन्मांचे ज्ञान होणे अशक्य नाही.

सकाळपासून आपण सतत कर्मे करीत असतो. संध्याकाळी जर कोणी आपल्याला विचारले की, तुम्ही सकाळपासून काय काम केले? तर क्षणभर स्तब्ध राहून आपण स्मरण करतो. नंतर सांगतो की, सकाळी उठून ईश्‍वराला नमस्कार केला किंवा कोणाला शिवी दिली इत्यादी. समजा विचारले, काल सकाळी उठल्यावर काय केले? परवा सकाळी उठल्यावर काय केले? असे कोणी विचारीत गेला तर चार-पाच दिवसांच्या पलीकडे आपण काही सांगू शकणार नाही. एवढेच सांगू की, आता काही आठवत नाही. याच जन्मात पाच-सहा दिवसांपूर्वीचे स्मरण आपल्याला राहत नाही. कारण आपण सारखे विसरत जातो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण असते. ते सारखे आपल्या स्मरणाला झाकून टाकत असते. बुद्धीवर अज्ञानाचे पटल असल्यामुळेच प्रत्येक जीवात्मा अज्ञ आहे, अज्ञानी आहे असे म्हटले जाते. या जन्मातलेच ज्ञान त्याला नसते तर पूर्वजन्माचे, त्याच्या पूर्वजन्मांचे त्याला ज्ञान कसे असेल? म्हणून जीवात्मा अज्ञ आहे.

जीवात्मा हा परमात्मा का नाही? तर तो अज्ञ असल्यामुळे. अज्ञ जीवात्मा आणि सर्वज्ञ परमात्मा हे एकरूप असत नाहीत. परमात्म्यात समरस होण्यासाठी जीवात्म्याला सर्वज्ञ व्हायला हवे. सर्वज्ञ परमात्माच अल्पज्ञ होऊन जीवात्मा झाला, असे सिद्धान्त सांगतो. बल्बचा प्रकाश सर्वदूर पसरतो, परंतु त्यावर एखादे भांडे झाकले तर? त्याचा प्रकाश फक्त भांड्यापुरता सीमित होईल. त्याप्रमाणे सर्वज्ञत्व, सर्वकर्तृत्व हे भाव आणवादी मलांनी आवृत्त झाल्यामुळे सर्वज्ञ आत्मा अल्पज्ञ झाला, सर्वकर्ता ईश्‍वर अल्पकर्ता झाला. आपल्याला सारे ज्ञान नाही, आपण सारे काही करू शकत नाही. जेवढी आपली बुद्धी तेवढे आपले ज्ञान. जेवढी आपली शक्ती तेवढेच आपले कार्य. स्वत:च्या मनात काय आहे हे आपण थोडे जाणू शकतो. इतरांच्या मनात काय आहे ते जाणता येत नाही. एखाद्या मनुष्याने थोडी साधना केली तर तो फार तर काही लोकांच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकेल. परंतु सर्वांच्या मनातले भाव जाणू शकत नाही. परमात्मा मात्र सर्वज्ञ असल्याने सर्व जाणू शकतो. एकाच वेळी हजारो भक्तांनी प्रार्थना केली तरी ती ईश्‍वर जाणतो. कबीरांनी म्हटले आहे:-

मुल्ला हो के बाँग पुकारे अल्ला तो क्या बहरा है?।
मुंगीके पाव घुंगरु बजे वो भी अल्ला सुनता है॥

यांचे तात्पर्य असे की, कितीही हळुवारपणे तुम्ही ईश्‍वराशी संवाद केला तरी तो ऐकू शकतो, त्यासाठी ओरडण्याची जरुरी नाही. तो सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. तो सर्वत्र आहे.

यत्र यत्र जीव: तत्र तत्र शिव:।

जेथे जीव आहे तेथे शिव आहे. उपनिषदांत म्हटले आहे:-

द्वा सुपर्णा सयुजा सखाया
समानवृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति
अनश्‍नन्नन्योऽभिचाकशीति॥

जीवात्मा आणि परमात्मा अनादिकालापासून मित्र आहेत. त्यांच्यात कृष्णार्जुनाप्रमाणे सख्यभाव आहे. जो सखा असतो तो सुखदु:खात संगत करतो. जीवात्म्याचा खरा सखा परमात्माच आहे. जीव जीवाचा सखा होतो ते स्वार्थासाठी.

आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति।

बृहदारण्यकोपषिदात याज्ञवल्क्य महर्षी सांगतात, प्रपंचातील प्रेमव्यवहार स्वार्थमूलक असतो. नि:स्वार्थ प्रेम कोणी कोणावर करीत नाही. ईश्‍वराचे प्रेम मात्र नि:स्वार्थ असते. आपल्याकडून त्याला काहीच नको आहे. तुम्ही पूजा केली नाही म्हणून त्याची पूजा होत नाही असे नाही. तुम्ही नैवेद्य दाखविला नाही म्हणून तो उपाशी राहत नाही. तो नित्यतृप्त आहे. त्याला नैवेद्य दाखवायचा तो त्याच्यासाठी नव्हे तर आपल्यासाठी. आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आपण त्याला नैवेद्य दाखवतो. ईश्‍वर त्यातले काही खात नाही. ‘तुझ्याकडे हात माझ्याकडे भात’ अशी मराठीत म्हण आहे. हाताने ईश्‍वराला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य खाणारे दात मात्र आपल्याजवळ असतात. ईश्‍वराला तुमचा भात नको, भाव हवा. त्याला तुमच्याकडून काही नको, तुम्हालाच त्याच्याकडून काही हवे असते. ईश्‍वरचिंतन करून तुम्ही कर्म करीत राहिलात तर तुम्हाला काही कमी पडत नाही.

एकदा गुरूने शिष्याला उपदेश केला, “ईश्‍वर हाच तुझा खरा सोबती आहे. त्याचे निष्ठेने भजन कर, चिंतन कर. त्यामुळे तुला काही कमी पडणार नाही. स्वत:च्या खाण्यापिण्याचीही काळजी करू नकोस.”

शिष्य एका मंदिरात जाऊन भजन करीत बसला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले. तिसरा दिवस उजाडला. पोटात भुकेची आग पेटली. तरी गुरुवचनावर विश्‍वास ठेवून त्याने भजन सुरूच ठेवले. गावातल्या लोकांनी त्याची अवस्था पाहिली. काही जण त्याच्याकडे जेवण घेऊन गेले. त्याला जेवू घातले. लोकही मोठे हुशार असतात. आपल्याकडून भजन-पूजन होत नाही, हा बिचारा भजन करतोय तर निदान त्याला अन्नपाणी देऊन त्याचे थोडे पुण्य आपल्या पदरात पडावे अशा उद्देशाने ते त्याला जेवण देऊ लागले.

गावातल्या एका मनुष्याच्या घरी काही ग्रहपीडा होती. तिच्या शांतीसाठी एका ज्योतिषाला त्याने विचारले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, “ग्रहशांतीसाठी एखादे कांबळे किंवा बकरी दान कर. त्यातही निर्जीव कांबळ्यापेक्षा सजीव बकरीचे दान जास्त योग्य. ज्याच्याजवळ काही नाही अशाला दान करणे फलदायक असते.”

त्या गृहस्थाला वाटले की मंदिरात भजन करणार्‍या महाराजाजवळ काहीच नाही. तोच दानाला जास्त योग्य आहे. म्हणून त्याने महाराजांना बकरी अर्पण केली. आतापर्यंत त्याच्याजवळ संसाराची काहीच सामग्री नव्हती. फक्त ईश्‍वर आणि तो दोघेच होते. आता दोघांमध्ये एक बकरी आली. हा पूजेला बसला की बकरी ओरडायची. तिला भूक लागायची, तहान लागायची. लोक महाराजांना जेवण आणून द्यायचे. परंतु बकरीच्या चार्‍यासाठी महाराजांना फिरावे लागे. थोडे गवत आणायचे, पाणी पाजायचे यात त्याचा वेळ जाऊ लागला. पुढे तर बकरी मोठी होत गेली तेव्हा तिला जास्त खायला लागायचे. हळूहळू महाराज बकरीचीच सेवा करू लागले, ईश्‍वराची सेवा थांबली. बकरीवर प्रेम बसले. गृहस्थाला मुलाबद्दल प्रेम वाटते त्याप्रमाणे.

एके दिवशी तो पूजेला बसला आणि बकरी पळून गेली. ‘माझी बकरी, माझी बकरी’ म्हणत तो सर्वत्र शोध घेऊ लागला. त्याला अनिवार दु:ख झाले. ‘बकरी बकरी’ म्हणत धावताना त्याचे गुरू समोरून आले. त्यांनी त्याची अवस्था पाहिली म्हणाले, “अरे, तुला ती मी ईश्‍वराचा सखा व्हायला सांगितले होते. तू तर बकरीचा सखा झालास!”

बकरी पळून जाऊ शकते आणि मरू शकते. परंतु ईश्‍वर मात्र कधी पळून जात नाही आणि मरत देखील नाही. म्हणून आपला खरा सखा ईश्‍वरच आहे.

‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया’. एका वृक्षावर दोन पक्षी बसलेलेे आहेत. एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा त्याला प्रकाशित करतो आहे. फळ खाणारा पक्षी म्हणजे जीवात्मा आहे तसाच परमात्मादेखील आहे. तो सर्वज्ञ असल्याने जीवात्म्याची प्रार्थना ऐकून त्याची पूर्ती करतो. जीवात्मा हा शरीरापुरता मर्यादित आहे. म्हणून तो अज्ञ, अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीव आणि सर्वज्ञ ईश्‍वर, अल्पकर्ता जीव आणि सर्वकर्ता ईश्‍वर यांच्यात अभेद असू शकत नाही. जीवाचे अल्पज्ञत्व, अल्पकर्तृत्व नष्ट झाले की तो जीव राहत नाही तर शिव होतो.

ही स्थिती माहेश्‍वरासाठी अजून दूर आहे. कारण तो दुसर्‍या पायरीवरच आहे. अजून त्याला चार पायर्‍या चढायच्या आहेत. तो परमात्म्याशी समरस होऊ शकत नाही. म्हणून येथे सांगितले आहे की, पृथ्वी आदी सात तत्त्वे अचेतन असल्यामुळे आणि जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे ही आठ तत्त्वे ईश्‍वर नाहीत. परमात्मा या पलीकडचा आहे. या तत्त्वांत परमात्म्याचे अधिष्ठान आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व आत्मा या अष्टमूर्तीपेक्षा परमात्मा भिन्न आहे असे मानणार्‍या माहेश्‍वराला ‘अष्टमूर्तिनिरासक’ म्हटले जाते. पुढे पृथ्वी आदी ईश्‍वररूप आहेत हे सांगणार आहेत. परंतु हातावरील इष्टलिंग जोपर्यंत ईश्‍वररूप दिसत नाही, तोपर्यंत सर्व ब्रह्मांड ईश्‍वररूप दिसणार नाही. ज्याला इष्टलिंगात देव पाहता येत नाही त्याला ब्रह्मांडात ईश्‍वर कसा पाहता येईल? म्हणून प्रथम इष्टलिंगातच ईश्‍वर आहे अशी दृढ भावना झाल्यानंतर मग तिचा परीघ वाढत जातो. मंदिरातल्या शिवलिंगात आपण प्रथम ईश्‍वर पाहतो, नंतर मंदिर पूज्य मानतो. ज्या गावात मंदिर आहे ते गाव, मग प्रदेश, मग देश आणि विश्‍व हे सारे ईश्‍वररूप दिसू लागते. काशीला आपण पवित्र मानतो. कारण तेथे भगवान विश्‍वेश्‍वराचे नित्य वास्तव्य असते. सीमित भावना विकसित होत गेली की पूर्ण ब्रह्मांड ईश्‍वररूप दिसू लागते. परंतु त्याआधी ही भावना एकाच ठिकाणी स्थिर करणे आवश्यक असते. ईश्‍वर इतरत्र कोठेही नाही, तो फक्त इष्टलिंगातच आहे या भावनेचे दृढीकरण करण्यासाठीच आचार्यांनी अष्टमूर्तिनिरसनस्थलाचे प्रतिपादन केले आहे, एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत.

॥ॐ शांति: शांति: शांति:॥

जन्म हा अखेरचा
अनुवाद/संपादन : शे० दे० पसारकर
(पृ० २२१-२२६)

***

Saturday, August 26, 2017

बेंगळुरू येथील धर्मसमन्वय सभेत ज. पंचाचार्य व विरक्त धर्मगुरूंचा एकमुखाने उच्चार

लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैव धर्माचेच पर्यायनाम


बेंगळुरू, दि. २३-

 येथील विजयनगरमधील म. बसवेश्‍वर सुज्ञानमंटपामध्ये जगद्गुरू पंचाचार्य आणि निरंजन पीठाचे होस्पेट व मुंडरगी येथील दोन जगद्गुरू आणि ५०० पेक्षा अधिक शिवाचार्य व निरंजनमूर्ती यांनी एकत्र विचार करून वीरशैव लिंगायत हे वेगवेगळे नसून ते एकच आहेत आणि लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून ते वीरशैवधर्माचेच एक पर्यायनाम आहे, या विचाराचा एकमताने पुरस्कार केला. या सभेत श्रीरंभापुरी जगद्गुरू, प्रसन्नरेणुक वीरसोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीउज्जयिनी जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे सान्निध्यस्थानी विराजमान होते.

काही लोक वीरशैव आणि लिंगायत असा भेद करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा डाव वीरशैव लिंगायत समाजाने नीट समजून घेतला पाहिजे. वीरशैव व लिंगायत हे वेगळे नसून एका नाण्याच्याच त्या दोन बाजू आहेत. आपण सर्व एकच आहोत ही भावना प्रबळ असली पाहिजे. ज. पंचाचार्यांनी या धर्माची
स्थापना केली असून म. बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात वीरशैव धर्मदीक्षा घेऊन या धर्माचा प्रचार-प्रसार केला आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण वचनसाहित्यात एकाही ठिकाणी ‘लिंगायत’ या शब्दाचा उच्चार केलेला नाही. त्यांनी ‘वीरशैव’ हाच शब्द सर्वत्र योजिलेला आहे. ‘मी आधी शैव होतो, आता वीरशैव झालो’ असे एका वचनात स्वत: म. बसवेश्‍वरांनी म्हटले आहे. अशा म. बसवेश्‍वरांनाच धर्मसंस्थापक ठरविण्याचा प्रयत्न काही लोक राजकीय हेतूसाठी करीत आहेत. हे कदापि शक्य होणार नाही, असे विचार या सभेत जगद्गुरू पंचाचार्य व सर्व शिवाचार्य यांनी व्यक्त केले.

४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बदामी, जि. बागलकोट) येथे सर्व गुरू आणि विरक्त मठाधिपती लक्षावधी उपस्थित भक्तांसमोर वीरशैव लिंगायत एकत्वाचा उच्चार करणार आहेत. या कार्यक्रमात पंचपीठांच्या जगद्गुरूंशिवाय बेंगळुरू कोळ्ळद मठाचे शांतवीर स्वामीजी, मुंडरगी संस्थानमठाचे अन्नदान स्वामीजी, शिवयोग मंदिर संस्थानचे अध्यक्ष व होस्पेट मठाधीश्‍वर ज. संगनबसव स्वामीजी आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशांतील सर्व पट्टाधिकारी व निरंजन मूर्ती उपस्थित होते. या सभेत ९ ठराव पारित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे:-

१. वीरशैव लिंगायत हा सनातन धर्म असून कोणीही कोणत्याही प्रकारे या धर्मामध्ये फूट पाडू नये याची गुरू व विरक्त महाराजांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.

२. कोणत्याही एका वर्गाला स्वतंत्र धर्माची मागणी करण्याचा अथवा घोषणा करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला नाही. ही कायदेशीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.

३. अखिल भारतीय वीरशैव महासभेने ‘वीरशैव लिंगायत एकच आहेत’ असा ठराव केला असून त्याचे ही सभा स्वागत करीत आहे.

४. वीरशैव लिंगायत हे उद्योगशील असल्यामुळे ते ७३ प्रकारचे विविध उद्योग करतात. त्यामुळे त्यांच्यात पोटभेद निर्माण झालेले आहेत. या सर्वांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून १२ ते १५ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावेत.

५. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात एक विद्यार्थी निलय स्थापन करून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची व भोजनाची सोय करण्यात यावी.

६. सार्वजनिक व शासकीय सेवांमध्ये यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. करणार्‍या वीरशैव लिंगायत विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे.

७. ज. पंचाचार्य, म. बसवेश्‍वर व हानगल कुमारस्वामीजी यांची जयंती गुरू व विरक्त स्वामीजींनी एकत्रितपणे वर्षातून एक दिवस मोठ्या प्रमाणात साजरी करावी.

८. वीरशैव लिंगायत धर्मातील विविध पोटजातींमधील गरजू व बद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरू व विरक्त स्वामीजींनी आर्थिक साहाय्य करावे. शक्य झाल्यास त्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे.

९. ४ सप्टेंबर २०१७ रोजी शिवयोग मंदिर (ता. बागलकोट, जि. बदामी) येथे भव्य मेळावा आयोजित करून वीरशैव व लिंगायत एकच आहेत याचा पुनरुच्चार करण्यात यावा.

वरील सर्व ठराव एकमताने पारित करण्यात आले.

***
बसववचनांचा सुलभ अनुवाद

बसवबोध


स्वाती साखरकर कराळे
एम०एस्सी०, एम०एड्०,  बी०ए० (मराठी)

घनगर्द भरलेलं आभाळ नेहमी अमृताचा वर्षाव करतं, तर जमिनीच्या उदरात असंख्य बीजं लपलेली असतात. पण अंकुर फुलतील कसे? आणि अशातच पावसाचा आभाळापासूनचा सुरू झालेला प्रवास जमिनीजवळ येऊन थांबतो अन् जमिनीच्या उदरातली बीजं अंकुरांतून फुलायला लागतात.

मानवी जीवनाचंही असंच आहे. त्याच्या अनाकलनीय अशा हृदयात अध्यात्माची, उत्सुकतेची, जाणिवेची अनेक बीजं निद्रावस्थेत असतात. पण संतवचनांचा अमृतस्पर्श एकदा का या बीजांना झाला की त्या स्पर्शाने  बीजांचे अमृतवेलीत रूपांतर होते. वीरशैव धर्मात संतांनी अनेक वचनांचे अमृतकुंभ जगाला भरभरून दिलेले आहेत. त्या अमृताचे थेंब सामान्यातून सामान्य जीवांपर्यंत पोहोचावे यासाठी तेवढ्याच आत्मीयतेने कार्य करणारे संतसाहित्यकार, अभ्यासक समाजात आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असावाच.

‘बसवबोध’ हे म० बसवेश्‍वरांच्या वचनांचे पुस्तक एखाद्या अमृतकुंभाप्रमाणे डॉ० इरेश स्वामी यांनी आपल्यासमोर आणले आहे. किती घ्यावं तेवढं कमीच, असा अनुभव प्रत्येकालाच हे शब्दरूपी अमृत प्राशन करताना येणार हे निश्‍चित!

बाराव्या शतकातील म० बसवेश्‍वरांची वचने सर्व जगाला आजच्या घडीला सुद्धा मार्ग दाखविणारी आहेत. चंदनाने कपाळ सुशोभित करताना नकळत माथ्यापर्यंत पोहोचलेली बोटंही सुगंधित होतात, असंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल. अध्यात्माचा सुगंध असलेली ही चंदनरूपी वचने सर्वांनाच सुगंधित करतील.
हे पुस्तक हाती आले आणि वाचता वाचता डॉ० स्वामी यांची या लेखनामागची सात्त्विक पार्श्‍वभूमी लक्षात आली की, संपूर्ण मानवजातीला मानवकल्याणाची, धर्माची, नैतिकतेची जाणीव या वचनांतून व्हावी. जगाला मानवकल्याणाचा मार्ग दाखविणारे, अध्यात्मातून विज्ञानवादाचे दर्शन घडविणारे, उच्चनीचता समूळ नष्ट व्हावी, स्त्रीपुरुष-समानतेचा गौरव व्हावा अशी उच्च विचारसरणी असलेले समाजातील आद्य प्रवर्तक म० बसवेश्‍वरांची वचने, त्यांचा मराठीत भावानुवाद व त्यावरील भाष्य या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.
धर्म म्हणजे काय, धर्माचं मूळ काय, शिकवण काय हे सहजतेने मांडणारे वचन...

दयविल्लद धर्मयावुदय्य । दयवे बेकु सर्व प्राणिगळल्लि ।
दयवे धर्मद मूलवय्य । कूडल संगय्यनंतल्लदोल्लनय्या॥

दया नसणारा तो धर्म कोणता, दया पाहिजे सर्व प्राण्यांविषयी,
दया धर्माचं मूळ आहे, दया नसेल तर कूडलसंगय्य कसा प्रसन्न होईल?
अशा वचनावर अनुवादानंतर डॉ० स्वामी यांनी केलेलं भाष्य सुरेख आहे.
शरणांच्या भालप्रदेशी शोभून दिसणारी विभूती हा शरणांचा सुरेख, स्वाभाविक अलंकारच. त्या विभूतीचे महत्त्व सांगणारे वचन...

नीरिगे नैदिलेये शृंगार । समुद्रक्के तेरेय शृंगार ॥
नारिगे गुणवे शृंगार । गगनक्के चंद्रमने शृंगार ॥
मानवजन्माचं उद्दिष्ट हे ईश्‍वर प्राप्त करून घेणं असलं पाहिजे. भौतिक सुख हे शाश्‍वत समाधान देत नाही, हे सांगताना म० बसवेश्‍वर म्हणतात...

समुद्रदोळगण सिंपिनंते बायि बिडुत्तिद्देनय्य
नीवल्लदे मत्तारु यन्नवरिल्ल नोडय्य
कूडलसंगमदेव
नीवल्लदोळ कोंबुवरिल्ल नोडय्य

अशी अनेक वचने या पुस्तकात वाचायला मिळतात. वचनांवर भाष्य करताना डॉ० स्वामींचं लेखन सहज मनाला भिडतं. भाष्य करताना डॉ० स्वामी स्वत: त्या वचनांशी किती समरस झाले याचा प्रत्यय वारंवार भाष्य वाचताना, त्यात दिलेल्या सामान्यांना पटेल अशा उदाहरणांवरून येतो. प्रत्येकापर्यंत भावार्थ पोहोचविण्याचा डॉ० स्वामींचा प्रयत्न खूपच प्रशंसनीय वाटतो. त्यातील सहजता मनाला भावणारी आहे.
‘बसवबोध’ हे पुस्तक सर्व वाचक-भक्तांचे प्रबोधन करणारे, त्यांच्या सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक जाणिवा प्रगल्भ करणारे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखणे, म० बसवेश्‍वरांच्या सुरेख, सात्त्विक रूपाचे दर्शन घडविणारे आहे.

या पुस्तकातील वचने, भावानुवाद, भाष्य यांतील शब्दांची, वाक्यांची मांडणी सुटसुटीत आहे. शेवटी समाविष्ट केलेला भाग- मंगळवेढा येथील बसव साहित्य संमेलनातील डॉ० इरेश स्वामी यांचे अध्यक्षीय भाषण, म० बसवेश्‍वरांची शिकवण, सुभाषिते इत्यादी सुद्धा प्रेरक आहे.

प्रत्येकाने वाचावे, संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. म० बसवेश्‍वरांच्या वचनांना समाजापर्यंत नेणार्‍या या कार्यासाठी डॉ० स्वामींचे शतदा आभार. त्यांच्या लेखनकार्यास शुभेच्छा!

बसवबोध
डॉ० इरेश सदाशिव स्वामी,
विविधा प्रकाशन,
‘विद्या’, १२, ब्रह्मचैतन्य नगर,
विजापूर रस्ता, सोलापूर ४१३ ००४
चरभाष ९३७१०९९५००